Thursday, December 19, 2024

वैज्ञानिक दृष्टिकोन हाच जगण्याचा पाया असायला हवा.

वैज्ञानिक दृष्टिकोन हाच जगण्याचा पाया असायला हवा. – जेट जगदीश

निरीक्षण, तर्क, कारणमीमांसा, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!

डॉ. जयंत नारळीकरांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’ ची सविस्तर व्याख्या केलेली आहे, ती अशी... ‘वैज्ञानिक दृष्टिकोन ही शारीरिक व मानसिक अवस्था होय की, ज्याद्वारे योग्य कृतीला दिशा मिळून जीवन जगण्याच्या पध्दती सुलभ होतील. मानवी प्रगतीच्या मार्गातील लहानमोठे अडथळे दूर करण्याचा तो एक शास्त्रशुध्द विचार आहे. सजीव, घटना, पध्दती या सर्वांबद्दल केलेली विधाने सत्य की असत्य योग्य वा अयोग्य हे निरीक्षण करून अनुभवाद्वारे चिकित्सक बुध्दिने त्याची कारणमिमांसा करूनच मान्य अगर ग्राह्य धरायची, अन्यथा नाही आणि या विशिष्ट दिशेने प्रेरित होऊनच कार्यरत राहण्याची कष्टसाध्य साधना यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात.’

एवंच वैज्ञानिक दृष्टीकोन माणसाला विवेकी बनवते. असा माणूस कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला तयार असतो. लोकांशी सौहार्दाने वागायला देवाधर्माची गरज त्याला लागत नाही. कारण विवेकामुळे ऋजुता हा त्याचा स्थायीभाव बनतो. तसेच तो प्रत्येक गोष्टीचा साधकबाधक विचार करून मगच निर्णय घेतो, त्याचबरोबर त्याचे होणारे परिणाम स्वीकारायलाही तयार असतो. अपयश आले तर परखड आत्मपरीक्षण करून स्वतःच्या चुका दुरुस्त करतो. थोडक्यात चुका स्वीकारायला घाबरत नाही. परिणामी तो स्वतःची प्रगती तर साधतोच पण त्याच वेळेस समाजालाही आपल्या विचारांनी प्रगतीपथावर नेतो. एकदा का वैज्ञानिक दृष्टीकोनाने माणूस जगायला लागला की, एवढे बदल त्याच्यात घडतात.

म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली माणसे विवेकवादी असतात, त्यामुळे ती सदाचारी असतातच. पण एक लक्षात घ्यायला हवे की, नैतिकता, सदाचार ह्या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत. कारण भारतात जी नैतिकता समजली जाते असेल ती अमेरिकेत असेलच असे नाही. एवढेच कशाला चोरांच्या दोन टोळ्या एकमेकांशी प्रामाणिक असतात म्हणजे त्या आपसात नैतिकता पाळतात. पण तुमच्यामाझ्या दृष्टीकोनातून चोर मुळातच अनैतिक असतात. म्हणजे त्यांची नैतिकता ही आपल्यासाठी अनैतिकता झाली. ह्याचा अर्थ नैतिकता ही सापेक्ष संज्ञा झाली. विज्ञान मात्र नुसत्या पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण निसर्गात एकाच नियमाने जाणारे असते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली माणसे काळाबरोबर पावले टाकत काळाचा शोध घेणारी प्रगतीशील माणसे असतात.

तर्कशुद्ध विचार व विश्लेषण करण्याची रीत हा विज्ञानाचा गाभा आहे. कोणी व्यक्ती, ग्रंथ, विचारप्रणाली सांगते म्हणून मी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, तर जी बाब प्रयोगाने सिद्ध करता येते, जी तर्काच्या आधारावर टिकते, तीच मी स्वीकारेन हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांमध्ये रुजविणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे, असे भारतीय संविधानाचा अनुच्छेद ५१क आपल्याला सांगतो. एकविसाव्या शतकातही आपल्या देशात देवदासीसारख्या परंपरा टिकून आहेत. जात्याभिमानाच्या किंवा चेटूक केल्याच्या विकृत कल्पनांमधून येथे हत्या, नरबळीच्या घटना घडतात. ग्रहण, मासिक पाळी यांसारख्या नैसर्गिक घटनांबद्दल सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या मनात आजही जुनाट कल्पना ठाण मांडून आहेत.  या सर्व बाबी आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नसल्याच्याच द्योतक नव्हेत काय?

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले. संशोधन, नवी ज्ञाननिर्मिती यांचा वेग आधी मंदावला, नंतर थंडावला. हे वास्तव आपण मान्य केले तर आपण वृथाभिमानाच्या सापळ्यात सापडणार नाही. त्यासाठीही वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला मदत करील.

वैज्ञानिक पद्धत पूर्वग्रहरहित असते, पण वैज्ञानिक हा हाडामांसाचा माणूस असल्यामुळे तो पूर्वग्रहदूषित असू शकतो, त्याला प्रलोभने भुलवू शकतात, स्वार्थ तर्कदुष्टतेकडे नेऊ  शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. विज्ञानाचा विकास हा वैचारिक खुलेपणाच्या अवकाशात व विवेकाच्या चौकटीत होत असतो. त्याचा गाभा मानवकेंद्रित व सर्वजनहित हा आहे, हे भान राखले तरच आपली वाटचाल अंधश्रध्देकडून विज्ञानाकडे होऊ शकेल.

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी आवश्यक काय? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढायला हवा असे वाटत असेल तर –
1. विज्ञान ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ हे निषिद्ध मानते.
2. विज्ञानात अंतिम सत्य नसते, पण त्याचाच शोध सतत चालू असतो.
3. प्रत्येक शोध लागेपर्यंत विज्ञान त्याचा उलगडा करते, तेवढेच ते सत्य, तेवढ्यापुरतेच सत्य. त्या पुढचा शोध लागला की सत्य बदलते. शोधाचे महत्त्व कमी होत नाही पण विज्ञान उलगडण्याचा एक टप्पा पुढे जातो.
4. एखादी घटना वैयक्तिक असली तरी तिचा सार्वत्रिक पडताळा घेता येत असेल तरच विज्ञान ते सत्य मानते.
5. चिकित्सक डोळस प्रमाणित rational  दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.
6. कुटुंब व्यवस्था – जिथे घरातल्या सर्वांचा विचार करीत नाहीत, कोणातरी वडीलधार्‍याच्या हुकुमाप्रमाणे कौटुंबिक व्यवस्था चालते, तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस पोषक रचना नाही.
7. समाज रचना – समाजरचना खुली हवी – एकमेकांच्या मतांचा आदर करणारी हवी.
8. आर्थिक स्थिती – समाजाची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तर, जीवनावश्यक सर्व गरजा भागत असतील तरच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस पोषक वातावरणाची निर्मिती समाजात होते.

थोडक्यात काय तर...
1. वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. 
2. असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. 
3. वैज्ञानिक दृष्टिकोनाला कोणताही विषय आदरणीय किंवा पूज्य वाटत नसून ते वास्तव आहे तसे स्वीकारण्याला तो प्राधान्य देतो.
4. वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाला नैतिक वागण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला आणि आपण कुठे चुकलो याचे परखड आत्मपरीक्षण करायला शिकवतो.
5. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत नाही.

ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?


ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?
– जगदीश काबरे.

प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गुढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना .... समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलीतगात्र... भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तत्कालीक हितसंबंधाच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामूनच आणलेलं असतं? तसं असेल तर असे हितसंबंध जोपासण्यात काय हशील आहे? कारण ह्या हितसंबंधातून वैयक्तिक आयुष्य जरी भरभराटीला येत असले तरी त्यामुळे संपूर्ण समाजाचं किती नुकसान होत असतं! परिणामी मानवाच्या प्रगतीलाच खीळ बसत असते, हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला हवं.

फलज्योतिषासंबंधी विचार करतांना हा मुद्दा प्रकर्षाने जाणवत राहतो. भविष्याबद्दलचे कुतूहल समजू शकते. पण त्यासाठी निसर्गातील ग्राहगोलांना वेठीस धरणं समजू शकत नाही. भविष्यकाळ उज्वल व्हावा म्हणून प्रयत्न केलेले समजू शकतात. पण त्या प्रयत्नांच्या जोडीला नशीब, देव-देव यांचा आधार घ्यावा लागणं; हे समजू शकत नाही. विचारांची पायवाट काढायची असली तरी ती अखेर फलदायी ठरणारी असते, हे आपल्याला कळतं. पण त्याच वेळेस कष्टांना घाबरून भावनाशीलतेच्या आहारी जात ज्योतिषांच्या हातातलं बाहूलं बनणं समजू शकत नाही. या विसंगतीपूर्ण वागण्यामागची कारणं निव्वळ भविष्याविषयीची अनाकलनीयता असते की, आत्मविश्वासाचा अभाव? आपण एकाच वेळेस 'आपला हात जगन्नाथ' म्हणत 'प्रयत्नांती रगडीता वाळूचे कण त्यातून तेलही गळे' असा प्रयत्नवादाचा जयघोष करत असतो, तर त्याचवेळेस दुसरं मन मात्र आपला हात ज्योतिष मार्तडांच्या हातात देवून भाग्य उजळण्याची पळवाट शोधत असतं. ह्याचं एक कारण असंही असू शकेल की, माणसाचं मन विचारांपेक्षा भावनेच्या आहारी सहज आधीन होतं. कारण भावनाशीलता ही माणसाला आभासी का होईना पण तात्काळ चिंतामुक्त करते. मनाला हवी तशी उत्तरं शोधते. तर बुद्धीनिष्ठता मनाला सतत बोचणी लावत असते. सतत विचार करायला प्रवृत्त करते. स्वाभाविकच मानवी मन हे सोयीच्या भावनांना बळी पडतं. आणि हे बळी पडणंच माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देतं. मन कमकुवत करतं. हळूहळू अशी वेळ येते की, माणूस विचार करणंच टाळायला लागतो. विचार करणं म्हणजे डोक्याला नसती कटकट वाटायला लागते. परिणामी एवढ्यातेवढ्या गोष्टींना मानवी मन घाबरू लागते. मग प्रयत्नाची वाट चोखाळण्याऐवजी माणूस सुखाचा शॉर्टकट शोधायला धावतो आणि अंधश्रद्धेचा बळी ठरतो. बुवा-बाबांना, कर्मकांडांना, देवदेवतांना आणि ज्योतिषांना... हे चक्र त्याच्यामागे शुक्लकाष्ठासारखे मग चालूच राहाते. या चक्रात आपण पिळून निघतोय असं मात्र त्याला कधीही वाटत नाही, हे विशेष. कारण तोपर्यंत त्याच्या मनाने प्राक्तन, नशीब, दैव, भोग ह्या सर्वांचा असा घट्ट हात पकडलेला असतो की, हेच शब्द त्याला पूर्वजन्मीचे कर्म असं वाटायला लावून सगळं सहन करायला शिकवत असतात. हीच खरी माणसाच्या आयुष्याची शोकांतिका असते. गगनाला गवसणी घालण्याची विजूगिषू वृत्ती बाळगणारा माणूस दुसऱ्या बाजूनं मात्र असा गर्भगळीत झालेला, नियतीच्या हातातलं वाहूलं बनलेला दिसतो. ह्या दैवदुर्विलासाला काय म्हणावं!

एकीकडे आपला विज्ञानावर विश्वास असतो. पण त्याचबरोबर वैज्ञानिक कसोट्या न लावता काही गोष्टी आंधळेपणानं सत्य म्हणून स्वीकारण्याकडेही आपला कल असतो. ज्योतिषशास्त्राला आपले सांस्कृतिक संचित समजून आणि भृगुसंहितेला प्रमाण मानून आपण जन्मकुंडली, हस्तरेषा, ललाटरेषा यांचे वाचन करून आपला भूतकाळ व भविष्यकाळ शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा आधार खरोखरच भरभक्कम आहे का? तो शास्त्रीय कसोट्यांवर टिकणारा आहे का? की आपल्या कमकुवत मनला तात्पुरता समाधान देणारा आहे? हा विचार आपण कधी केलाय का? ह्या आधाराची जरा चिकित्सा केली तर त्यातून काय निष्पन्न होते? म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे शास्त्र असेल तर ते शास्त्रीय कसोट्यांवर का टिकत नाही?

शास्त्रीय आधार म्हणून जन्मकुंडली मांडताना ज्योतिषी अचूक जन्मवेळेचा आग्रह धरतात. आता जन्मवेळ नेमकी कोणती मानावी? मुलाचं डोकं दिसायला लागते ती वेळ? की मूल पूर्णपणे जगात प्रवेश करते ती वेळ? की ते पहिला श्वास घेऊन ट्याहॅ करते ती वेळ? की सर्वात प्रथम स्त्रीवीज आणि पुंबीजाचं मिलन होतं ती वेळ? की या मिलनानंतर ज्या क्षणी त्या पेशीमध्ये जीव निर्माण होतो ती वेळ? (या दोन्ही वेळा कुणालाही सांगता येणे कठीण!) ह्या प्रश्नांच्या उत्तराची एकवाक्यता अजूनही भल्या भल्या ज्योतिषमार्तंडामध्येही आढळत नाही. मग अशा प्रकारे तयार झालेली जन्मकुंडली ही शास्त्रीय मानायची काय?

बरे ते असो. कुंडलीतील ग्रहमानानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी होणे जर अटळ असेल तर त्या अमुक एक प्रकाराने ग्रहशांती, उपासतापास इत्यादी कर्मकांड केल्यावर त्या टळू शकतात यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? याचा अर्थ अशा अटळ घडामोडींवर ताबा मिळवण्याइतपत माणसाचा आत्मविश्वास जर आहे तर तो ह्या कर्मकांडाशिवाय का वापरू शकत नाही? माणूस जर लाखो किलोमीटर अंतरावरील ग्रहांवर आपल्या मंत्रशक्तीने आणि अनुष्ठानांनी हुकूमत चालवून त्यांना वठणीवर आणू शकतो, तर एवढा प्रबळ माणूस आज दुःखात का? गरिबीत का? असे प्रश्न पडण्याच्या ऐवजी आत्मविश्वास गमावलेला तो प्राक्तनाचा भोग, पूर्वजन्मीचे पाप म्हणत आपल्याच नशिबाला दोष देत असतो.

जरा डोळसपणे विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की, ह्यात ग्रहताऱ्यांचा काहीही दोष नाही. प्राक्तन आणि पूर्वजन्माचा तर नाहीच नाही. हया सगळ्या दुःखाचं मूळ आहे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती! त्याचाच तो परिपाक आहे. सत्ताधाऱ्यांना आणि भटाभिक्षुकांना जनसामान्यांवरील आपली पकड ढिली करायची नसते. हे जनसामान्य जर असेच दुःखात पिचत राहिले, आत्मसविश्वासहीन जगले, अंधश्रद्धेच्या गर्तेतच फिरले, कुठल्या तरी भयगंडांनी पछाडलेले असले, रोटीरोजीच्या चिंतेने ग्रस्त असले, तरच त्यांची सत्तास्थाने टिकून रहातील. त्यासाठी त्यांना देवाचा, ज्योतिषाचा बागुलबुवा उभा करणे भागच असते. जर सर्वसामान्य जनता विचार करू लागली, जागृत झाली, प्रश्नांची चिकित्सा करू लागली तर ह्यांचे चालायचे कसे? उत्पन्नाचं – तेही सहजगत्या मिळवून देणाऱ्या साधनाला एवढ्या सहजासहजी सोडायचं कसं? म्हणूनच ज्योतिष हे शास्त्र आहे असं आपल्या मनावर वर्षानुवर्षे ह्या तथाकथित विद्वानांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी ठसवलं आहे. ठेविले अनंते तैसेची रहावे। दित्ती असो यादे समाधान||' असे पढवून द्या हितसंबंधीयांनी उपासतापास, भविष्य सुखासमाधानात जावे म्हणून कर्मकांडाचे फसवे समाधान देण्याचे कार्य,  नियमितपणे इमानेइतबारे चालवले आहे, हे आता तरी आपण लक्षात घेणार आहोत काय?

फार वर्षांपूर्वी माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा त्याला आपली पृथ्वी कशी आहे? सूर्य काय आहे? चंद्र काय आहे? आकाशातील तारे म्हणजे काय? पाऊस कसा पडतो? असे अनेक प्रश्न पडत होते. त्या त्या वेळच्या त्याच्या उत्क्रांत अवस्थेप्रमाणे तो त्यांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करीत होता. ह्या उत्तरांमध्ये काळानुरूप बदलडी होत गेले. पण हे बदल सहजासहजी झालेले नाहीत. धर्माच्या, कर्मकांडाच्या नावाखाली ह्या बदलांना विरोध होत राहीलाच. पण परिस्थितीच्या आणि नवज्ञानाच्या प्रचंड रेट्यामुळे हा बदलही होतच राहिला. त्याला धर्ममार्तंडही रोखू शकले नाहीत.

म्हणूनच सुरवातीच्या काळात ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनात अर्थ प्राप्त झाला आहे, त्यांचे ऋण म्हणून, त्याच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पूजाअर्चाचा जन्म झाला. पण ह्या कृतज्ञतेचे रूपांतर कालांतराने कर्मकांडात आणि माणसाला भविष्याच्या भयगंडात टाकण्यात झाले. आज सूर्य, चंद्र, तारे आदी काय आहेत हे आपल्याला कळले नाही. पाऊस कसा पडतो तेही उमगले आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची पूजाअर्चा वा इतर कोणतेही कर्मकांड केले नाही तरी ते नियमितपणे त्यांच्या शास्त्रीय नियमानुसारस त्यांची कर्मे करीतच राहाणार आहेत. मग कुंडलीत सूर्य, चंद्र, आर्दीना स्थान देण्यात काय बरे अर्थ आहे? त्यांच्या पोटी कृतज्ञता असणे वेगळे आणि त्यांचा आधार घेऊन ज्योतिष्यांनी सामान्य माणसाला घाबरवून सोडणे वेगळे.

मूळात जन्मकुंडलीत सूर्य, चंद्र, राहू व केतू ह्यांना स्थान देऊन आणि त्यांना ग्रह मानून आपण आपले अज्ञानच प्रकट करीत असतो. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' हे आता शालेय विद्यार्थी सहज सांगू शकतात. पण फलज्योतिषात मात्र 'पृथ्वीभोवती सूर्य फिरतो' असे आजही समजतात. म्हणजे शिक्षितांना बरोबर विरुद्ध अर्थ सांगून आपण लोकांना मागास ठेवत आहोत याचेही ज्योतिष्यांना भान नाही. सूर्य हा तारा आहे. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. राहू व केतु हे चंद्राची भ्रमणपातळी आणि पृथ्वीची भ्रमणपातळी यांच्यामध्ये सुमारे साडेपाच अंशाचा कोन असल्याने ते दोन भ्रमणमार्ग जिथे छेदतात ते छेदनबिंदू आहेत. त्यांना आपण शास्त्रीय परिभाषेत शरदसंपात आणि वसंतसंपात बिंदू म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहातो, तिला ह्या कुंडलीत स्थानच नाही. लाखो किलोमीटर अंतरावरील हे ग्रहतारे जर मानवावर, त्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात तर तो माणूस ज्या पृथ्वीवर जन्मला त्याच्या भोवतालची परिस्थिती काहीच परिणाम करू शकत नाही? ह्याला कुंडलीतील फोलपणा म्हणावा नाही तर काय? उलट एका अर्थाने ह्या पृथ्वीवरील ज्या प्रदेशात तो जन्मला तो प्रदेश, त्याचा परिसर, तेथील राजकीय परिस्थिती, तेथील समाजकारण हे सर्व खऱ्या अर्थाने त्यांच्या भविष्यावर परिणाम करणारे घटक असतात. म्हणजे एका अर्थाने कुंडलीतील लहानशा चौकटीत कोंडून बिचाऱ्या ह्या ग्रहताऱ्यांवर आपण उगीचच अन्याय करीत असतो.

आकाशातील ग्रहताऱ्यांचा व त्यांच्या परिभ्रमणाचा मानवी जीवनावर बरावाईट परिणाम होतो, पण किती? अगदीच नगण्य. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रांना भरती-ओहोटी येते, म्हणून मणासावरही ग्रहांचा परिणाम होतो, असा त्यांचा दावा असतो. वरवर पाहता ते जरी खरे दिसत असले तरी, बारकाव्याने विचार केल्यावर तो युक्तिवाद फसवा आहे हे लक्षात येते. कारण गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वास्तुमानाशी निगडीत असते आणि ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. एक साधा प्रश्न विचारा की, बशीतल्या पाण्याला भरती-ओहोटी आलेली दिसते का? याचा अर्थ ती डोळ्यांनी दिसत नसली तरी नगण्य असते. त्याचप्रमाणे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे वस्तुमान ग्रहाताऱ्यांपेक्षा बशीतल्या पाण्यासारखे नगण्यच असणार. मग एवढ्या दूर अंतरावरचे ग्रह कणाऐवढ्या लहान माणसावर परिणाम करतात हे मानणे हास्यास्पद नाही काय?तसेच तो एकाच वेळी जन्मलेल्या एकाच अक्षांशावर जन्मलेल्या अथवा एकाच दवाखान्यात एकाच क्षणी जन्मलेल्या बालकांवर सारखाच व्हायला हवा. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचे भविष्य वेगवेगळे घडलेले दिसते. जसे सूर्यचंद्राचा पृथ्वीवरील होणाऱ्या भरती ओहोटीवर एकसारखाच परिणाम सर्वत्र दिसतो तसेच मानवाच्या बाबतीतही आणि प्राण्यांच्या बाबतीतही सर्वत्र एकसारखेच घडायला हवे. पण तसे घडताना दिसत नाही. दुसरे म्हणजे ग्राहताऱ्यांचा परिणाम होत असेल तर तो सगळ्याच ग्रहताऱ्यांचा व्हायला हवा. कुंडलीतील मर्यादित चौकटीत मनःपूतपणे कोंबून बसवलेल्या मूठभर ग्रहांचाच का होतो? ह्या अट्टाहासाला काय म्हणावे बरे?

जन्म कुंडलीत किंवा राशीचक्र मांडण्याविषयी जी ज्योतिषविषयक पायाभूत गृहीतके आहेत त्यात प्रचंड अज्ञान सामावलेले दिसते. ग्रहांची स्थिती जशी विशिष्ट वेळी दिसते तशी ती नसते. कारण ग्रहांचे मानवी दृष्टीला होणारे ज्ञान हे त्या ग्रहाच्या अंतरानुरूप बदलत असते. सूर्य दिसायला सुमारे सव्वाआठ मिनिटांचा कालावधी लागतो, तर शनी दिसायला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे आपण पहातो ते एकप्रकारे शिळे आकाश असते. त्यामुळे ग्रहस्थिती हाच मुळात भ्रम आहे. कारण तेवढ्या काळात गुरू, शनि आदी ग्रहांची जागाही बदललेली असते.

दुसरे असे की, काही ग्रह हे विशिष्ट स्थानी उच्चीचे आणि निचीचे मानले जातात. उदा. रवि सिंहाचा स्वामी आहे पण तो मेषेत उच्चीचा तर तुळेतील दहाव्या अंशात निचीचा मानला जातो. ह्या उच्च-नीच राशी आणि त्यांचे स्वभाव ठरविले कोणी आणि कोणत्या नियमांनी? ग्रहांच्या पार्श्वभागी असणारी रास त्याचे सबलत्व काढून त्याला जर दुर्बल बनवू शकते तर ग्रहांपेक्षा राशीच परिणामकारक ठरू शकत नाहीत काय? मग कुंडलीतील ग्रहस्थानांना कोणता अर्थ उरला?

पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सहा महिने दिवस व सहा महिने रात्र अशा दिनमानात दिवस काढावे लागतात. आणि वर्षातून काही काळ तर तेथे आकाशस्थ ग्रहज्योती दिसतच नाहीत. उत्तरधुवावर दक्षिण गोलार्धातील वा विषयवृत्तावरील ग्रहतारे दिसूच शकत नाहीत. मग कोणत्या परिणाम ह्या माणसांवर होतो? कारण त्या माणसांच्या कुंडल्याच ह्या ज्योतिषातील नवग्रहांशिवाय तयार होऊच शकणार नाहीत. की त्यांना जन्मकुंडल्यांची गरज नाही? याचा अर्थ त्यांना भविष्यच नाही काय?

निसर्गनियमानुसार तीच ती ग्रहस्थिती विशिष्ट कालावधीत नियमितपणे पुनःपुन्हा येत असते. तर मग महान व्यक्तीच्या बाबतीत जन्मतिथी आणि जन्मवेळेची वारंवारता का आढळत नाही? महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध, कबीर यांसारख्या महात्म्यांच्या जन्मवेळी असणारी ग्रहस्थिती जेव्हा कधी येईल तो क्षण पकडून नेमके त्याच वेळी शस्त्रक्रिया करून शेकडो बालकांना जन्म देण्याइतपत विज्ञान पुढे गेलेले असताना, ज्योतिषमार्तंड अशा वेळा काढून जगाला कल्याणकारी ठरणाऱ्या विभूतींची पैदास करण्यासाठी का बरे सहाय्यभूत ठरत नाहीत? ह्या सत्कर्माबद्दल त्यांना सारे जग दुवा देणार नाही काय? त्यांच्या आयुष्यभराची कायमची ददात मिटेल.

पण आपले ज्योतिषी बसले आहेत मंगळ आणि शनीच्या राशीवर! बिच्चारे!! मंगळ आणि शनीविषयीची शास्त्रीय माहिती यांच्या गावीही नसते. तांबूस रंगाचा दिसणारा मंगळ हा किती विलोभनीय दिसतो! शनीची कडी कधीतरी तुम्ही दुर्बिणीतून पाहिली आहेत काय? हा त्या बिचाऱ्या शनीच्या मागे ह्या ज्योतिषांनीच साडेसाती लावली आहे. मंगळ आणि शनी तर निमूटपणे सूर्याभोवती परिभ्रमण करताहेत. पण आपण मात्र त्यांना अस्पृश्य आणि दलीत करून टाकले आहे... आपल्या कुंडलीत! ह्या वेडगळपणाला काय म्हणावे? या ना त्या ग्रहाचा खडा अंगठीच्या कोंदणात बसवून आपण या अफाट मोठया प्रहांना लगाम घालू शकतो अशी समजूत फक्त बुद्धी गहाण टाकलेली माणसेच करून घेऊ शकतात. ह्या खड्यातून धन होते ते फक्त सोनारांची आणि ज्योतिषमार्तंडांची!

स्वतःच्या अपयशाबद्दल स्वतःखेरीज दुसऱ्या कुणाला तरी जबाबदार धरणे हे सर्वांनाच सोयीचे असते. म्हणूनच ग्रहांना वेठीला घरणे पोटार्थी ज्योतिष्यांना भावते. गूढ चिन्हे, आकडेमोड व अगम्य खाणाखुणा करून विद्वतेचा आव आणत हे सगळे ज्योतिषी एकजात संदिग्ध आणि मोघम भाषा वापरत असतात. आता हेच पाहा ना, पृथ्वीवर दररोज अनेक उत्पात घडत असतात. त्यामुळे त्यांचा भविष्यकथन कुठे ना कुठे तरी ते लागू पडणारचं असतं. त्यासाठी धूमकेतू आणि ग्रहणाची काय आवश्यकता आहे? थोडासा लोकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास झाला की झालं. पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी जेव्हा ज्योतिषाचे दुकान उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूला काही शंका विचारल्या. त्यावेळेस त्या गुरूने जोशींबुवांना गुरुमंत्र दिला की, 'तुम्ही ग्रंथाद्वारे सांगायला गेलात की मेलात. इथे कामी येतं ते शब्दजंजाळच! समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आणि भविष्य सांगायचं... तेही बरंच सांगायचं आणि त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. अहो, हा धंदा आहे... यात वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके तुमचे भविष्य बरोबर.' यावरून काय ते समजा. एकंदरीत काय तर ज्योतिषशास्त्र हे अनुमान लावण्याचे शास्त्र आहे. दहा प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तरे द्यायची झाल्यास एकाही प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण जसे सगळी उत्तरे होय किंवा नाही अशा प्रकारे लिहितो, मग त्यातील कधी सात बरोबर येतील, तर कधी पाच, तर कधी तीनच, असं आहे ज्योतिषशास्त्राचं.

आज स्वातंत्र्य मिळवून 74वर्ष झाली तरी शालाबाह्य मुलांची संख्या पाहता भारतीयांच्या हातावर शिक्षणाची रेषा मोठ्याप्रमाणात उमटलेलीच नाही. जपानमध्ये ६ ऑगस्ट १९४६ साली हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून एका क्षणात लाखो लोक जळून खाक झाले. ह्या सर्वांच्या कुंडल्यांतील ग्रहयोग काय एकच होते? दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि चीनमध्ये शिक्षणाचा आणि सुबत्तेचा प्रसार झाला याचे कारण काय तेथील प्रत्येकाच्या हातावर शिक्षण आणि धनरेषा होत्या म्हणून? की आपल्याच देशातील सगळ्यांची ग्रहदशा विपरीत आहे म्हणून आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे? हे कोणत्या तर्काच्या आधारावर पटावं?

आजपर्यंत ज्योतिषाला वैज्ञानिक निकष लावण्याचे प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केलेत. ज्योतिष्यांनी केलेले दावे खरे ठरतात का ते पाहाण्याचे परिश्रमही वैज्ञानिकांनी घेतले आहेत. पण वैज्ञानिक विषयाला लागणारा पाया, या विषयाला म्हणजे ज्योतिषाला लाभलेला नाही हेच चिकित्सेअंती सिद्ध झाले आहे. 1974 साली 192 शास्त्रज्ञांच्या सही सकट - ज्यात काही नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञही होते - एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात फलज्योतिषावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून टीका केली होती. शेवटी असे म्हटले होते की, ज्योतिष हे शास्त्र नाही.

या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, भविष्य हे माणसांच्या प्रयत्नांच्या कसोटीवर घडवता येते. ज्योतिषांच्या ग्रहशांती मुळे नव्हे. त्यासाठी गरज असते ती आत्मनिग्रहाची, चिकित्सेची आणि जिद्दीची. फलज्योतिष मात्र कमकुवत मनाला आणखी दुर्बल करते, भ्याड बनवते, तात्पुरते समाधान दिलेच तरी ते फसवे असते. म्हणून शहाण्या माणसांनी ज्योतिषांच्या नादी लागून स्वतःला भविष्याच्या गर्तेत लोटून देवू नये, हेच खरे. प्रयत्नांची आणि कष्टांची कास धरली तरच आजची परिस्थिती बदलू शकेल यावर विश्वास असणे जास्त महत्त्वाचे आहे. तेच आपल्या भविष्याला खरे आकार देणारे असते.

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य

*'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य' या शीर्षकाचा एक लेख आणि आता खोट्या माहितीने भरलेला व्हिडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियामधून पसरवला जातो आहे. त्यावर हे संदर्भासहित दिलेले उत्तर मोठ्या प्रमाणात वायरल करायला हवे.* –JK

लेखात आणि व्हिडिओत म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली.
सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो.
1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो.
2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असेलही कदाचित. पण अशा लोकांची संख्या निश्चितच शंभरच्या आतच असेल. पण लेख लिहिणारे लेखक म्हणतायत की एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता. जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे.
3) साहजिकच त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) छद्म विज्ञानाचा आधार घेत वैज्ञानिक शब्दांचे बुडबुडे फोडणाऱ्या खोट्या आहेत. त्या गोष्टी घडल्याच नाहीत.
4) सदर लेखामध्ये सांगितलेली घटना खरी असती तर लेखामध्ये समाधी उखडण्यासाठी आलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु लेखामध्ये त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
5) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते...की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून निर्माण केली. वरील बुद्दिभेदी खोटी घटना पूर्णपणे द्वेषातून आकसापोटी लिहली आहे...
6) हभप मामासाहेब दांडेकर, ज्यांचा या लेखात उल्लेख आलेला आहे त्यांचा मृत्यू जुलै 1968 रोजी झालेला आहे. मग 1972 साली हभप मामासाहेब दांडेकर यांची या प्रयोगात उपस्थिती दाखवणे हा खोटेपणाचा आणखी एक पुरावाच आहे. त्यांच्या मृत्यूच्या नोंदीचा पुरावा खालील लिंकमध्ये आहे. जिज्ञासूंनी लिंक उघडून खात्री करून घ्यावी. 
https://www.facebook.com/shrikantjoshiofficial/posts/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AC-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A5%AF-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE/710133681906593/
7)सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेला लेखकांना एकही पुरावा जोडता आला नाही. त्यांनी बातमीच्या सत्यतेसाठी एखाद्या वृत्तपत्राची बातमी तरी पुराव्यासाठी उपलब्ध करुन द्यायला हवी होती. खरं तर अशा बुद्धिभेदी कथा रचून बदनामी करणे हेच या लेखाचे उद्दिष्ट दिसत आहे.

*सरतेशेवती माहितीसाठी...*
📌महाराष्ट्र अंनिसची चतुःसूत्री...
1)शोषण, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाना विरोध करणे...
2)वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार,प्रसार आणि अंगीकार करणे...
3)धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणे...
4)समविचारी संघटनाना जोडून घेणे...
📌संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या आणि अशा सर्व संतांनीच अभंगातून आणि प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला आहे. अंनिस याच संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करते...
📌 तोडफोड करणे, विध्वंस करणे अशी अंनिसची कार्यपद्धती कधीच नव्हती आणि नाही...
📌तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात की,
*सत्य सत्यें देतें फळ|*
*नाहीं लागतची बळ||*
याचपद्धतीने आपणासमोर सत्य मांडले आहे. अवैचारिक विरोधकांनी मुद्दाम पसरवलेल्या बुद्धीभेदी प्रचाराला बळी पडण्याआधी...
_मित्रहो... एकदा विचार तर कराल...?_
*अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते...*

महिलांनी कुंकू का लावावे? अर्थात कुंकवाची उठाठेव...

महिलांनी कुंकू का लावावे? अर्थात कुंकवाची उठाठेव म्हणजेच कुंकवाच्या अफवा... (^m^) (^j^) (मनोगते)

'महिलांनी कुंकू का लावावे?' या फेसबुक आणि व्हॉटस्अँपवर धर्मअंध हिंदुत्ववाद्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या पोस्ट्स बद्दल...

सर्व प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की त्यांनी ही फेक स्टोरी बनवली आहे. कारण चारही वेदांमधे व उपनिषदात कुठेही स्त्रियांनी कुंकू लावावे असा उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अनेक शतकानंतर लिहिले गेलेल्या रामायण या ग्रंथात देखील दशरथ गेल्यानंतर त्यांच्या 3 ही पत्नीनी कुंकू पुसले असे लिहिल्याचा कुठेही उल्लेख रामयणाच्या जुन्यातल्या जुन्या प्रतीत आढळत नाही. तसेच त्यावेळच्या उत्तर भारतातील आर्य संस्कृतीत कुठेही कुंकू अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्मात कर्मकांड वाढीला लागल्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थानावर टाकण्यासाठी त्याकाळच्या पुरोहितांकडून कुंकू या सौभाग्य लेण्यांवर भर देण्यात आला.

त्यासाठी छद्म विज्ञानाचा आधार घेऊन पिट्यूटरी ग्लैंड, एक्यूप्रेशर ही माहिती देखील भारतीयांना होती असे भासवण्यात आले. पण असा उल्लेख आयुर्वेदशी सम्बंधित चरक, सुश्रुत वग़ैरे कुठल्या ही ग्रंथात नाहिये. एक्यूप्रेशर ही चीनी वैद्यकीय विद्या आहे जी त्याकाळी भारतात पोहोचलीच नव्हती. कुंकू लावण्याची सुरुवात ही द्रविड़ियन संस्कृतित दक्षिण भारतात झाली. तिथे देखील जी सिद्धपैथी आहे त्यात कुंकू लावल्याने कुठे पिट्यूटरी ग्लैंड सक्रिय होते आणि एक्यूप्रेशर सारखा परिणाम होतो वैगैरे एका शब्दानेही उल्लेख नाही.

जर त्याचे वैद्यकीय फायदे हेच कारण राहिले असते तर परम्परेने पुरुषांनी देखिल रोज कुंकू लावलेले दिसले असते. बरे, कुंकवाचे आरोग्यविषयक फायदे क्षणभर गृहीत धरले तरी एवढं कुंकू परायण आणि यज्ञ करूनही भारतात मलेरिया, रक्तक्षयासारख्या कितीतरी रोगांपासून लोक मोठ्यप्रमाणात मरतच होते.  त्या काळी या विविध रोगांवर योग्य वैद्यकीय उपचार नसल्यामुळे सर्वसाधारण आयुर्मार्यादा कमीच होती. आधुनिक विज्ञानातील शोधांमुळेच मानवी आरोग्य वाढीला लागले. हे विज्ञानाचे उपकार विसरून उलट कुंकवाचेच छद्म विज्ञान तयार करून हे धर्मअंध हिंदुत्ववादी, लोकांना संभ्रमात टाकण्याचे काम मात्र इमानेइतबारे करत आहेत.

आजच्या आधुनिक युगात कुंकू लावावे किंवा नाही हा प्रश्न महिलांवर सोडून द्यायाला हावा. मुळात त्याचा संबंध नावऱ्याच्या जीवनाशी जोडून स्त्रीला त्यात अडकवण्यात आले आहे. कुंकवाने दोघांपैकी कोणाचेही आयुष्य वाढत तर नाहीच पण बाईच्या कपाळावर कालांतराने कायमचा डाग वा खड्डा जरूर तयार होतो. कुंकू लावण्यासाठी खोटे किस्से आणि कथांची निर्मिति सनातनसारख्या कट्टर व धर्मांध हिंदुत्ववादी संघटना पराकाष्ठा  करताहेत. धार्मिकता व प्राचीनतेच्या गूढतेच्या आकर्षणाचे वलय चढवल्यामुळे सामान्य लोक मात्र या कुंकवाच्या छद्म सिध्दांताला बळी पडताहेत.

याच पुरुषी मानसिकतेने भाजप सरकारने कुंकवाला GST तून वगळले; पण स्त्रियांच्या सृजनतेचा आविष्कार असलेल्या मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनस् वर मात्र 12% GST लावून स्त्रियांच्या स्वच्छतेच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. यालाच ते 'सबका साथ, सबका विकास', असे समाजताहेत! विचार करा आणि या पुरुषप्रधान मानसिकतेचा कडाडून विरोध करून विवेकाचा आवाज बुलंद करा...

आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती?

आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती? –जेट जगदीश

सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या पॅथीत ॲलोपॅथी ही काल सुसंगत आहे असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ऍलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. पण ज्यांना ऍलोपॅथीला ॲडमिशन न मिळाल्यामुळे नाईलाजाने आयुर्वेदिक डॉक्टर व्हावे लागते अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी ते मग आयुर्वेद हे ऍलोपथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देन आहे, अशा बढाया मारू लागतात. पण खरी अंदर की बात अशी असते की, ऍलोपथीला ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ऍलोपॅथीवर खार खात असतात.🤦मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते. त्यात त्यांना सध्या संघोट्या हिंदुत्ववादी भाजपेई सरकारची साथ मिळाली आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखेच झाले...

खरेतर आयुर्वेदात काही औषधे काही रोगांवर खरेच गुणकारी आहेत. पण त्या औषधांच्या शास्त्रीय कसोट्यांवर चाचण्या न घेतल्यामुळे हजार-दोन हजार वर्षापूर्वीच्याच जुन्यापुराण्या ठोकताळ्यावर ती औषधे दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्या पूर्वजांचे प्राचीन ज्ञान यापलीकडे कुठलाही ठोस परिणाम जनतेसमोर दिसत नाही. अशा वेळेस जे स्वतःला आयुर्वेदाचार्य म्हणवतात त्यांनी अशा सगळ्या औषधांना सर्व शास्त्रीय चाचण्यांमधून तावूनसुलाखून प्रमाणित करणे आवश्यक नाही काय? जोपर्यंत आयुर्वेदातील औषधे ही शास्त्रीय चाचण्यांना सामोरे जात नाहीत तोपर्यंत तरी आयुर्वेद हे जडीबुटीचे शास्त्र असे समजले जाईल, हे आयुर्वेदाच्या खंद्या समर्थकांच्या कसे लक्षात येत नाही? यामुळे नुकसान तर आयुर्वेदाचेच होते ना? 

म्हणूनच मला एक कळत नाही की, या आयुर्वेदशास्त्रात आजपर्यंत आयुर्वेदाचार्य म्हणवणारे अनेक ढुढ्ढाचार्य निर्माण झाले. त्यातील क्वचितच कुणी शेकडो वर्षांपूर्वीच्या या चिकित्सा पद्धतीत संशोधन करून काही नवीन भर घातली आहे असे झाले नाही. उलट पुरातन कालीन ऋषी-मुनीनी त्यांच्या निरीक्षणाने जी काही चिकित्सा पद्धती तयार केली तीच त्यांनी 'बाबा वाक्यं प्रमाणं' म्हणून पुढे चालू ठेवली. यातील एकानेही का बरे प्रयोगसिद्ध वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून योग्य त्या नोंदी ठेवत...चाचण्या घेत आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीची विश्वासाहार्यता वाढवली नाही? बुद्धिप्रामण्यापेक्षा शब्दप्रमण्यावर का भर दिला?

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे आपल्याकडे विज्ञान म्हटल्यावर दोन हजार वर्षांपूर्वी भारतात असलेली विमाने आणि ज्योतिषशास्त्राने मिळवलेली ग्रहांदरम्यानची अचूक अंतरे असे सध्या वातावरण आहे. आयुर्वेद कसा थोर आहे, हे सांगताना अनेक थकत नाहीत. गेल्या ५० वर्षांत भारतीयांचे आयुर्मान जवळपास दुप्पट झाले व त्याला कारण आधुनिक विज्ञान आहे, आयुर्वेद नाही. आपण केलेल्या प्रयोगाचं डॉक्युमेंटेशन न केल्यामुळे आयुर्वेदातील अनेक शोध त्या त्या माणसांबरोबर संपले आहेत. अशाप्रकारे आयुर्वेद मागास ठेवण्यात त्यांचा हातभार लागला आहे. आपले संशोधन जर जागतिक स्तरावर पुढे यायचे असेल तर त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून डॉक्युमेंटेशनचे महत्व असतेच. म्हणून जोपर्यंत आपण वैज्ञानिक पद्धतीचा नीट उपयोग करत नाही तोपर्यंत आपण केलेल्या लहानसहान नवीन संशोधनाचा दुसरा कोणीतरी फायदा घेत रहाणारच. अशा लहान गोष्टींना मोठ्या करून जगामध्ये आपण शोध लावला असे दाखवले जाणार. हे टाळण्यासाठी तरी आपल्या संशोधक डॉक्टरांनी वैज्ञानिक डॉक्युमेंटेशनची सवय लावणे आवश्यक आहे असे वाटते.

अशी सवय नसणे हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहे. कारण विज्ञान हे कधीच साचलेले डबके नसते किंवा त्यात अंतिम सत्य असे काही नसते; तर तो एक सतत वाहणारा ज्ञानाचा प्रवाह असतो. या अर्थाने विज्ञान हे निरंतर असते. कालचे सत्य आज असत्य ठरून – म्हणजेच त्यातील त्रुटी लक्षात येऊन नवीन सत्य जन्माला येते. अशाप्रकारे दर क्षणाला त्यात नवीन नवीन शोध लागत असतात आणि माणसाची प्रगती होत असते. 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. कारण ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले.
आयुर्वेदही शेकडो वर्षांपूर्वी जे होते ते तसेच राहिले आहे. मग अशा साचलेल्या डबक्यात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती, हा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य वाटू नये.

गणपती विसर्जनाचे थोतांड


गणपती विसर्जनाचे थोतांड -जेट जगदीश.

आस्तिक लोक आपल्याच देवाची जेवढी विटंबना करत असतात तेवढी नास्तिकांनीही कधी केलेली नसते. ज्या देवाला अंधभक्त आस्तिक दहा दिवस मनोभावे पूजतात त्याच देवाला अकराव्या दिवशी गटारात बुडवून दूषित पाण्यात वस्ती करायला भाग पाडतात. अशा वेळेस त्यांच्या भावना दुखावत नाहीत. पण कोणी नास्तिकाने चिकित्सक टीका केली तर मात्र त्यांच्या भावना हूळहूळायला लागतात आणि 'आमच्या भावना दुखावल्या' म्हणून ते कोल्हेकुई करू लागतात. ही आहे यांची उच्च संस्कृतिक भक्ती!👎
गटारातील दूषित पाण्यात विसर्जित केलेल्या गणपतीचे फोटो पाहील्यानंतर काही भक्तगण मला शहाणपणा शिकवायला लागले की, "अहो नास्तिक, तुम्हाला धर्मातले काही कळते काय? जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा तिच्यात चैतन्य निर्माण होते आणि जेव्हा उत्तरपूजा केली जाते तेव्हा तिच्यातील चैतन्य नाहीसे होते. मग त्या गटारातील मूर्त्यांमध्ये चैतन्य नसल्यामुळे आमच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येतच नाही."

त्यावर मी म्हटले, "एकतर प्राणप्रतिष्ठा केल्यावर चैतन्य येते आणि उत्तरपूजा केल्यावर चैतन्य जाते असे कोठेही सिद्ध झालेले नाही. कारण मुळात चैतन्य येणे आणि जाणे हा मनाचा खेळ आहे. भट ब्राह्मणाने दक्षिणेच्या रूपाने स्वतःच्या पोटाची खळगी भरावी म्हणून निर्माण केलेले कर्मकांड आहे." 

"बरे, एक वेळ गृहीत धरून चालू की उत्तरपूजा केल्यावर गणपतीच्या मूर्तीतील चैतन्य जाते. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. मग माझे भक्तगणांना असे आव्हान आहे की, जसे पंढरपूरच्या भटाने तीर्थकुंडात लघुशंका करून लोकांना तीर्थ पाजले तसेच तुम्ही या चैतन्य गेलेल्या गटारातील मूर्तीवर लघुशंका करावी आणि ते तीर्थ म्हणून प्राशन करावे. आहे हिम्मत?"🤔

गणपतीची उत्तरपूजा केल्यानंतर त्यातील चैतन्य नाहीसे होते म्हणून ते गटारात असले तरी भक्तांच्या भावना दुखावत नाहीत असे त्यांचे तत्वज्ञान असते. याच न्यायाने मग त्यांचे आप्तस्वकीय जर मृत्यूमुखी पडले तर त्यांच्यात चैतन्य नसल्यामुळे ते प्रेताला असेच गटारात फेकून देतील काय?🤔 

यावरून देव मानणे किंवा न मानणे हा आस्तिकांचा सोयीचा मामला असतो, हेच सिद्ध होत नाही काय?

तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्यात प्राण फुंकून चैतन्य निर्माण करणारे आणि उत्तरपूजा करून प्राणहरण करत गणपतीतील चैतन्य नष्ट करणारे ब्राह्मण हे देवाचे बापच झाले म्हणायचे!👎

म्हणून लक्षात घ्या की, मूर्तीपूजेचे कर्मकांड सब झूठ है। भटूरड्या ब्राह्मणांनी आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे.

म्हणून संवेदनशील माणसांना गणपतीच्या विसर्जनानंतर सुबक सुंदर मूर्तींच्या तोडक्या-मोडक्या मुर्त्या झालेल्या पाहून मूर्तीच्या विटंबनेने त्यांचे मन विदीर्ण होते. इतर कुठल्याही धर्मातील मूर्त्यांची अशाप्रकारे विटंबना झालेली कोणाला दिसले आहे काय? तरी ते धर्म कनिष्ठ आणि हिंदू धर्म श्रेष्ठ! असे समजणे म्हणजे आत्मवंचनाच होय. मुर्त्यांची विटंबना होऊ नये म्हणून अंनिस गेली कित्येक वर्षे प्रचार करत धर्म सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी...
१) शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवा. 
२)पीओपीच्या मूर्ती बनवू नका.
३) हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे. तेव्हा गोमयाने(शेणाने) गणपतीची मूर्ती बनवून त्याच मूर्तीचे विसर्जनानंतर खत म्हणून झाडांना देणे योग्य राहील.
४) मूर्ती लहान बनवा. म्हणजे घरातल्या बादलीत लहान मूर्तीचे विसर्जन केल्यावर ते पाणी तुम्ही झाडांना घातले तर जास्त चांगले राहील.
५) निर्माल्य कलशातच निर्माल्य टाका. 
६) नैसर्गिक रंग वापरा. कारण रासायनिक रंगामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन शेवटी त्याचा त्रास माणसालाच भोगायला लागतो.
७) मूर्ती दान करा. 
८) नद्यातील वाहत्या पाण्यात विसर्जनाचा हट्ट सोडून मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करा.
९) मूर्तीचे विसर्जन न करता पुढच्या वर्षी तीच मूर्ती पुन्हा वापरा.
१०) मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवा. कारण तो जर निसरडा असेल तर अपघात घडू शकतात.
११) धातूची मूर्ती गणपती उत्सवात वापरा. म्हणजे पाण्यात विसर्जन करून तीच मूर्ती पुन्हा वापरता येईल. 

असे अनेक उपाय गेली कित्येक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुचवत आलेली आहे. त्याला काही प्रमाणात आता चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. तरीही धर्मांधतेचे राजकारण करणारे हिंदुत्ववादी आणि डोकं गहाण ठेवलेले अंधभक्तच विरोध करत असतात. आजही सनातन संस्था म्हणते की, वाहत्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करणे हे शास्त्र संमत आहे. मग पाण्याचे किती का प्रदूषण होईना; त्याचे त्यांना सोयरसुतक नसते. प्रदूषित पाणी पिऊन माणसे मेली तरी त्यांना चालते. 

वरील सुचवलेले उपाय अंधभक्तांना करायचे नसतात. त्यांना विरोध करायचा आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिंदुद्वेषी म्हणून बोंबा मारायच्या, एवढेच त्यांचे काम असते. म्हणून आमच्या धर्मात ढवळाढवळ करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असे म्हणत आमच्या भावना दुखावल्या म्हणून भटाळलेले उफराट्या काळजाचे अंधभक्त शहाजोगपणे कोल्हेकुई करत असतात. पण गटारातील दूषित पाण्यात बुडवलेल्या मोडक्या-तोडक्या गणपतीच्या मुर्त्या पाहून त्यांच्या भावना दुखावत नाहीत. यावरून त्यांचा मेंदू किती बधिर झालेला आहे हे स्पष्ट होते.🤦

बहुजनांनो आता तरी जागे व्हा आणि ब्राह्मणीकावा ओळखून देवाधर्माच्या नावाखाली निर्मिलेल्या अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडा.🙄

मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'.

*मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'. (^m^) (^j^) (मनोगते)*

मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारपासून पद्मपुराणाच्या संदर्भानुसार महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्षात दर गुरुवारी केल जातं. परंतु या व्रताचा पद्मपुराणात कुठेही उल्लेख आढळुन येत नाही. हे व्रत भरपूर धनाची ग्वाही देतं. शिवाय त्याला फारसा खर्चही नाही. वर ते पंधरा मिनिटात आटोपतं आणि वर्षातून फक्त चार किंवा पाच वेळेसच करावं लागतं. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली अस या व्रताच आहे. हे व्रत केलं आणि पैसे मिळाले तर उत्तमच. नाही मिळाले तरी ठिकाय. असा विचार करून हे व्रत घरोघरी पोहोचलं असावं. शिवाय याची नायिका राणी सूरतचंद्रिका गेल्या जन्मात नवऱ्याचा मार वगैरे खाणारी आहे. त्यामुळे तिच्याविषयी माहेरच्या साडीतल्या अलका कुबलला किंवा आजच्या सास बहू सिरियलमधल्या सोशिक सुनांना मिळते तशी एक सहानुभूतीही आहे. हातपाय न हलवता केवळ नारळ पुजून पैसा अडका मिळण्याची काडीचीही शक्यता नसल्याने हे व्रत फोलफटासारखं कचराकुंडीत टाकून द्यायच्याच लायकीच आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे व्रत काही जुनंपुराणं बिल्कूल नाही. याची पहिली आवृत्ती 1973 सालची आहे. भट मंडळी या लहानशा पुस्तिकेला पोथी म्हणतात. या चोथा झालेल्या पोथीचा लेखक मिलिंदमाधव केळकर नावाचा ब्राह्मण आहे. तो स्वतःच असं म्हणतो की हा ‘ग्रंथ’ ‘शके १८९४’ला लिहून पूर्ण झाला. शके वगैरे म्हटल्यावर आपल्याला हे जुनं वाटतं. पण शके १८९४ म्हणजे 1962 सालं. भारत चीन युद्ध झालं आणि शम्मी कपूरच्या जंगली सिनेमातलं याहू गाणं गाजत होते ते हे साल. आता या कालपरवाच्या चोथा झालेल्या पोथीची जे कुणी प्राचीन धार्मिक ग्रंथ म्हणून पुजा घालत असतील त्यांनी यातून काय तो यथायोग्य बोध घ्यावा. केवळ पुस्तकांची तुफान विक्री होऊन त्यातुन बक्कळ पैसा मिळावा निव्वळ याच हेतूने केळकर नावाच्या ब्राह्मण प्रकाशकाने हे व्रत पुस्तक रुपाने आपल्या माथी मारले आहे. पुस्तकातल्या पूजाविधीत ही पोथी सात जणांना दान देण्याचा उल्लेख आहे. काही प्रकाशकांनी तर या वाक्याखाली रेषा मारूनही ही पोथी सात जणांना दान देण्याचा उल्लेख ठसवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शिवाय शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा द्यायलाही हे व्रत सांगते. पुस्तकाच्या विक्रीतुन भट-ब्राह्मणांची चंगळ करणारे हे व्रत म्हणजे निव्वळ थोतांड आणि थोतांडच आहे. किंबहुना आजवर ज्यांना आपण थोतांड म्हणतो, अशांनाही दर्जेदार म्हणावं इतकं ते बकवास आहे.

जर कुणाला व्रत करायची इतकीच जर हौस असेल तर त्यांनी ते दरवर्षी जानेवारी महीन्यात घालावं आणि त्या व्रतामध्ये अनाथ, गोर-गरीब आणि गरजु मुला-मुलींना यथाशक्ती शाळेची पुस्तक, गणवेश अथवा अन्नदान करावे. कारण जानेवारी महीन्यात ३ तारखेला ज्ञानगंगा "सावित्रीबाई फुले" यांची जयंती असते.

ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज

नाताळ जवळ आला की काही विकृत धर्मांधांकडून क्रिसमस ट्री संबंधी चुकीची माहिती देणारी पोस्ट व्हायरल व्हायला लागते. त्यांच्या या खोडसाळ पोस्टला उत्तर... – जेट जगदीश.

मुळात ख्रिसमस ट्री हा नाताळाच्या दिवशी केवळ सुशोभिकरणासाठी ख्रिस्ती बांधव उपयोगात आणतात. त्यापासून समाजाला काहीही धोका नाही. ख्रिसमस झाडाचे धार्मिक महत्व श्यून्य असते. ही फक्त सजावटीची प्रथा आहे. *सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'वृक्षवल्ली सोयरे वनचरे' असे दांभिकपणे म्हणणाऱ्या आणि झाडांच्या कत्तली करणाऱ्या हिंदू लोकांप्रमाणे वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून वडाची पूजा करतात तसे ख्रिश्चन लोक ख्रिसमस ट्रीच्या फांद्या तोडून कुठेही सजावट करताना दिसत नाहीत.* ख्रिसमस झाड सजवले नाही तर ख्रिसमस होत नाही, असे काही नाही. इथे अंधश्रध्देचा संबंध येतोच कुठे?

ख्रिसमसचा दिवस हा येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस असतो. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. *परशुराम, कृष्ण, राम, गणेश या काल्पनिक देवांच्या नेमक्या जन्मतारखा माहित नसूनही त्यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे ही हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा नाही. पण ज्यांच्या जन्मतारखा माहित आहेत असे प्रत्यक्षात होऊन गेलेले बुद्ध, येशूख्रिस्त, पैगंबर यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून कशाच्या आधारावर अंधश्रद्धा ठरतात?*

चर्चमध्ये घंटा बडवल्या की प्रदूषण होते. पण देवळात घंटा बडवून जोरजोराने मोठ्या कर्कश्य आवाजात आरत्या केल्या की प्रदूषण होत नाही, असे धर्मन्ध हिंदुत्ववाद्यांना वाटते काय?

तसेच सांताक्लॉज लहान मुलांसाठी एक खेळणे असते. मोठेपणी कोणीही विश्वास ठेवत नाही की, सांताक्लॉजच्या रूपाने येशू येऊन त्याच्या जवळ येऊन काही भेटवस्तू ठेवून गेला होता. मग सांताक्लॉजची अंधश्रद्धा कशी? हिंदुत्ववाद्यांचे कसे असते ना की, 'आमची ते श्रद्धा आणि तुमची अंधश्रद्धा!' असा उफराटा न्याय ते लावत असतात.

प्रत्येक झाडाचा या ना त्या प्रकारे औषधी उपयोग असतोच तसेच ख्रिसमसट्रीचेही औषधी उपयोग आहेत. हे झाड बर्फाळ प्रदेशात उगवणारे झाड आहे. बर्फाळ प्रदेशांतील झाड असल्याने मुख्य फायदा प्राणवायूच्या निर्मितिचा... विरळ वातावरणात फार उपयोगी. भरपूर उंचीची त्याची वने बर्फाळ वादळ रोखते व सपाट पातळीवर पोचू देत नाही. रेनडियर, अस्वले, लामा सारख्या शाकाहारी प्राण्यांना या झाडाचा खुराक मिळतो. त्याचे लाकूड घरे उभारण्याच्या कामात उपयोगी येते. अखेर बर्फाळ प्रदेशांत केवळ प्राणीच नव्हे तर माणसेही रहातात,... त्यांना हे झाड आसरा देते. तरीही तुम्हाला क्रिसमसच्या झाडाचे आणखी औषधी फायदे हे माहीत करून घ्यायचे असतील तर खालील लिंकवर जा आणि माहिती वाचा...

https://frugallysustainable.com/how-to-capture-the-medicinal-benefits-of-your-christmas-tree/

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे', असा संतांचा दाखला देणाऱ्यांनो, झाडांची तरी धार्मिक वाटणी करणे सोडा आता... हे झाड चांगलं का ते चांगलं अशी विभागणी करणे हा तर तुमच्या मनाचा संकुचितपणा झाला. याच संकुचितपणामुळे मासिक पाळीतील स्रीयांनी तुळशीला पाणी घातलेले चालत नाही. आणि हो, झाडाचे फायदे बघून त्या झाडाविषयी आस्था निर्माण करणं स्वार्थीवृत्तीचे लक्षण आहे. म्हणूनच तुळशीच्या झाडाचे गोडवे गाणारी हीच मंडळी 25 डिसेंबरच्या क्रिसमसला शिव्या देत 31 डिसेंबरला मात्र कुठे बसायचं, याचा विचार करित असतात. दांभिक कुठले!

यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की, एखादे झाड जास्त महत्त्वाचे आणि दुसरे कमी महत्त्वाचे असे काही नसते. असा श्रेष्ठ आणि कनिष्ठपणा असतो तो फक्त विकृत धर्मांधांच्या मनातच. त्या ऐवजी त्यांनी इतर धर्मियांच्या चालीरीतींची समीक्षा करण्याऐवजी आपल्याच धर्मातील अस्पृश्यता, स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणे, इत्यादी बाबींवर जरा लक्ष दिले तर आपल्याच समाजाच्या उद्धारासाठी ते जास्त उपयोगी ठरेल. अंधश्रद्धाना विरोध म्हणजे आमच्या सणांना तुम्ही विरोध करता म्हणून तुमच्या सणांना आम्ही विरोध करतो; हे कुठलं तर्कशास्त्र आहे? कारण अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच असते, मग ती कोणत्याही धर्माची का असेना? पण तुळशीच्या झाडावर असलेली आमची ती श्रद्धा आणि क्रिसमस ट्रीवर असलेली तुमची ती अंधश्रद्धा! असा उफराटा न्याय आहे तुम्हा विकृत धर्मांधांचा!

भावना दुखावण्याचा रोग

भावना दुखावण्याचा रोग –जेट जगदीश.

हल्ली कुणी धर्म चिकित्सा करायला लागले की, धर्मअंध लोक 'आमच्या भावना दुखावल्या.' अशी कोल्हेकुई सुरू करतात. पण भावना दुखावणे हे प्रकरण तसे चार्वाक काळापासूनचे जुनेच दुखणे आहे. 
👉तुकारामांच्या अभंगांनी जेव्हा धर्मातील भोंदूगिरी आणि कर्मकांडावर प्रहार केले, तेव्हा मांबाजी भटासारख्या लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी तुकारामांचा आयुष्यभर छळ केला आणि शेवटी सदैव वैकुंठाला पाठवले.
👉नामदेवांनी जेव्हा कुप्रथा आणि रुढींवर त्यांच्या अभंगातून ताशेरे ओढले तेव्हाही सनातन्यांच्या भावना दुखावल्या. परिणामी सनातन्यांनी केलेल्या छळामुळे त्यांना महाराष्ट्र सोडावा लागला.
👉राजाराम मोहन रॉय यांनी सतीची चाल बंद व्हावी म्हणू कायदा करण्याचा दबाव ब्रिटिशांवर आणला, तेव्हाही बंगाली ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या, आणि त्यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरवात केली. 
👉आगरकरांनी जेव्हा विधवा विवाह, केशवपन, प्रेतासंस्कार यावर तसेच अनेक रुढींवर सडेतोड टीका केली, तेव्हाही महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या. परिणामी त्यांची जिवंत प्रेतयात्रा काढण्यात आली. 
👉फुले दाम्पत्याने जेव्हा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हाही सनातन्यांच्या भावना दुखावल्या, आणि त्यांच्यावर शेणगोळे तर घरावर दगड फेकण्यात आले. एवढेच काय पण महात्मा फुलेंवर मारेकरी धाडण्याइतपत त्या नराधमांची मजल गेली.
👉स्त्रियांना समान हक्क देणारे 'हिंदू कोड बिल'चे समर्थन करणाऱ्या आंबेडकरांना सनातन्यांनी भावना दुखावल्यामुळे कडाडून विरोध केला.
👉 रो धो कर्वे यांनी समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमनाचा प्रसार करत आयुष्य वेचले, तर त्यांना स्वतःला उच्च सुसंस्कृत म्हणवणाऱ्या ब्राह्मणांनी समाजात अनीती पसरवणारा अधम म्हणून शिव्याशाप दिले.
👉दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतांना धर्मावर आणि दांभिक धर्ममार्तंडांवर घणाघात केल्याने सनातन्यांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्या हत्या केल्या गेल्या.

वरील सर्व उदाहरणांवरून हे लक्षात येईल की, प्रत्येक वेळी समाज सुधारणा करणाऱ्या सुधारकांचा सनातन्यांनी भावना दुखावल्या म्हणून या ना त्या प्रकारे नुसता छळच केला नाही तर प्रसंगी हिंस्त्र श्वापदासारखे वागून निर्ममपणे त्यांच्या हत्याही केल्या. आणि म्हणे, हिंदुत्व हे सहिष्णू आहे! सुधारकांचा छळ करणे, प्रसंगी हत्या करणे यालाच ते सहिष्णुता समजतात काय? 

तेव्हा प्रश्न पडतो की, हाच का सनातन्यांचा महान धर्म जो स्त्रिया आणि बहुजनांना माणूस म्हणूनही किंमत देत नाही! हाच का तो 'गर्वसे कहो...'वाला धर्म जो सनातन्यांना आपल्या विरोधी विचाराच्या माणसांना संपवण्यासाठी उद्युक्त करतो!! हाच का तो उच्च, सुसंस्कृत(?) धर्म जो शेकडो वर्षे बहुजनांना शिक्षण नाकारणारा, जातीयतेच्या नरकात आणि गरीबीत ढाकलणारा आहे!!!

तेव्हा 'भावना दुखावल्या' असा कंठशोष करणारे सनातनी हे विसरतात की, त्यांनी शेकडो वर्षे स्त्रिया आणि बहुजनांच्या भावना दुखावल्या, तेव्हा मात्र त्यांना तो हक्क वाटत होता. आज तुमच्या त्या नतद्रष्टपणावर होणाऱ्या टीकेमुळे थोडासा त्रास व्हायला लागला तर कोल्हेकुई सुरू केली- 'आमच्या भावना दुखावल्या म्हणून!' व्वा रे!! 

मग असल्या गळूसारख्या ठसठसणाऱ्या दूषित भावना दुखावल्या म्हणून आम्ही चिंता का करावी? उलट तो समाजविघातक गळू फोडून समाजात प्रबोधन करून समाजस्वास्थ्य निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे आम्ही समजतो.

वि दा सावरकर 'विज्ञाननिष्ठ निबंध' या पुस्तकात म्हणतात... आपल्या हिंदुसमाजातील स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दिबंदी, रोटीबंदीप्रभृति अनेक धार्मिक म्हणून मानल्या गेलेल्या रुढींपायी आज आपल्या राष्ट्राची किती अपरिमित हानि होत आहे ते दाखवून त्याचे आणि अशाच विविध प्रकारच्या धार्मिक छापाच्या भाबडे रणाचें अच्चाटण करण्यासाठी झटत असता आम्हांस असे आढळून आले, की अनेक सनातनी मंडळींकडून आमच्या सुधारक मंडळींवर जे स्थिरटकीय (स्टीरिओ टाअिण्ड) ठाम आक्षेप घेतले जातात, त्यात 'लोकांच्या धर्म भावना तुमच्या या प्रचारामुळे दुखतात; म्हणून तुमच्या ह्या सुधारणा गर्हणीय होत!' हा एक आक्षेप नेहमी येतो. त्या सुधारणा राष्ट्रहितास आवश्यक आहेत की नाहीत हा प्रश्नच जणू काय विचारात घेण्याचे कारण नाही.

तीच गोष्ट धर्मभावनांची. धर्म असेल तर त्याविषयींच्या सद्भावना दुखवू नयेत हे ठीकच आहे; पण *जर एखादा अधर्माला धर्म समजत असेल आणि जर त्या अधर्माविषयीच्या त्याच्या भावना अितक्या धर्मवेड्या असतील, की आमच्या सभ्य नि सदिच्छ अपदेशानेही त्या दुखावतील, तर अशा प्रसंगी त्या अधर्मभावना दुखविणेच खरें धर्मकृत्य ठरतें, अधर्मभावना तशा अर्थी दुखविल्यावाचून गत्यंतरच उरत नाही.* 

सावाला चोराच्या तडाख्यातून सोडविताना चोराच्या भावना दुखतात; मरू द्या त्या सावाला, असे म्हणावयाचें की काय? आपली आई वाताच्या झटक्यात खिडकीतून खड्डयात उडी मारू लागली तर तशा प्रसंगी तिच्या भावना कितीही दुखावल्या तरी त्या दुखवून तिला तशीं प्राणघातक उडी न मारू देणें हेच खऱ्या मातृभक्तीचे कर्तव्य होय, खरा पुत्र धर्म होय. तीच गोष्ट राष्ट्रभक्तीची आणि स्वधर्मभक्तीची होय. राष्ट्रहितास अत्यंत हानिकारक अशा ज्या ज्या धार्मिक रूढि तुम्हांस वा आम्हांस लोकविकृष्ट वाटतात त्यांचा त्यांचा उच्छेद करण्यासाठी झटणे हेच तुमचें वा आमचें राष्ट्रीय कर्तव्य होय.

बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती

*बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती*

आजही ज्याची तपासणी करता येईल असा खालील मुद्दा निवडून त्यासंबंधी शोध घेतला असता मूळ माहितीत अथवा दाव्यात तफावत, विसंगती, असत्य आणि विपर्यास आढळून आला.
xxxxxxxxxxxxxxxxxxxx
*१०*🌹 . गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे 'इथून पुढे  दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड  येत नाही'. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. 'वास्को द गामा' हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.
xxxxxxxxxxxxxxxxxxxx

सोमनाथ मंदिराजवळ कोणताही स्तूप नाहीये. परंतु वरील मुद्द्यात दिलेले वर्णन हे तिथल्या एका गोष्टीला लागू पडते जी *बाणस्तंभ* (Arrow Pillar) नावाने ओळखली जाते.

हा एक चौकोनी दगडी खांब असून त्याच्या चारही बाजूंवर निरनिराळ्या मुर्त्या दाखवल्या असून त्यावर काही कोरीव काम केलेले दिसते. त्या खांबावर एक पृथ्वीचा गोल दाखवला असून त्या पृथ्वीच्या गोलातून आरपार गेलेला दक्षिण दिशा दाखवणारा बाण दिसतो. त्या खांबाच्या तळाकडे खालील मजकूर कोरलेला आहे.
"आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग"
ह्याचा अर्थ इथपासून ते थेट दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणतीही जमिन येत नाही असा सांगितला जातो.

हा स्तंभ कोणी, नेमका कधी बांधला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. कार्बन डेटिंग पद्धतीने केवळ जैविक (organic) वस्तुंच्या काळाचे अनुमान काढता येते परंतु हा स्तंभ दगडी असल्यामुळे ह्या पध्दतीने त्याचा काळ, आयुष्य ठरवता येणार नाही.

Wikimapia नुसार त्या बाणस्तंभाचे अक्षांश-रेखांश 20°53'15"N   70°24'3"E आहेत [1]. बाणस्तंभावरील मजकूरानुसार त्या स्तंभापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत 70°24'3"E ह्या रेखांशावर कोठेही जमिन नाही. फार zoom न करता जर Google Maps, Wikimapia अथवा Google Earth मधे बघितले तर ते खरेही वाटते. तशा काही images internet वरच्या काही संकेतस्थळांवर दाखवलेल्यादेखील आहेत.

परंतु *बरेच zoom in करून Google Maps मध्ये 70°24'3"E रेखांशाची रेषा पकडून दक्षिण ध्रुवाकडे खालच्या दिशेने निघालो तर 49° अक्षांशाच्या आसपास फ्रान्सच्या अधिपत्याखालील Kerguelen Islands हे बेट लागतं. ह्याचे दुसरे नाव Desolation Islands आहे [2]. 70°24'3"E रेखांशाची रेषा ही ह्या बेटाच्या Courbet Peninsula ह्या प्रदेशातून जाते. आणि बेटाला केवळ किंचित स्पर्श करून गेली आहे वगैरे असे काही नाही तर ती चक्क, धडधडीत समुद्रापासून कित्येक किलोमीटर लांबून, आतून जमिनीवरून जाते.*

*त्यामुळे बाणस्तंभावर लिहिलेल्या मजकुरातील दावा चूक आहे.*

कॉंस्टंटिनोपलच्या, म्हणजे आत्ताच्या इस्तंबूलच्या, पाडावा नंतर रेशीम मार्ग हा युरोप आणि चीन यांना जोडणारा खुष्कीचा रस्ता बंद पडला. त्यामुळे युरोपातील देशांना पौर्वात्य देशांशी व्यापार करण्यासाठी दुसर्‍या मार्गाची निकड भासू लागली. त्यात आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपातून भारतापर्यंत पोचणारा पहिला युरोपियन म्हणजे वास्को द गामा. म्हणून *वास्को द गामाने भारताचा नव्हे तर युरोप पासून भारतापर्यंत पोचायचा सागरी मार्ग शोधून काढला* असे म्हंटले जाते.

संदर्भ:
1. http://wikimapia.org/4265523/Baan-stambh-Arrow-Pillar
2. https://en.m.wikipedia.org/wiki/Kerguelen_Islands

© कौस्तुभ शेज्वलकर
02jul2019

तेहतीस कोटी देव, प्रकार नव्हेत.

कोटी शब्दाचा हा नवीन अर्थ सांगणाऱ्या एका उर्मट पोस्टला मी पुढीलप्रमाणे उत्तर दिले होते ते माहितीसाठी इथे देत आहे. – उत्तम जोगदंड

प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?
या प्रश्नावर उत्तर देतांना पोस्ट-कर्त्याने ‘कोटी’ शब्दाचा अर्थ ‘करोड’ असा न घेता ‘प्रकार’ असा घेतला आहे. त्या नुसार तेहतीस ‘प्रकार’ ची नावे दिली आहेत. तसेच कोटीचा अर्थ करोड असा लावणार्‍या आपल्याच हिंदू बांधवांना ‘हिंदू धर्माला बदनाम करणारे महामूर्ख महाभाग’ असे संबोधले आहे.
जर पोस्ट कर्त्यांचे म्हणणे खरे मानले तर काही प्रश्न पडतात:  
1. कोटीचा अर्थ प्रकार व 33 प्रकारचे देव, हा शोध कुठे आणि कसा लागला? 
2. कोणत्या ईश्वराने हे 33 प्रकार (प्रत्येक प्रकाराचे कार्य कोणते?) निर्माण केले, त्याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे?
3. त्यांना प्राप्त झालेले हे एवढे अगाध ज्ञान गेली हजारों वर्षे कुठे होते? 
4. या आधीचे समस्त हिंदू पूर्वज कोटीचा अर्थ करोड असाच लावत होते. ते सुद्धा ‘महामूर्ख महाभाग’ होते काय? आणि महामूर्ख असावेतच, कारण पोस्ट-लेखकाने हा नवीन शोध लावून ते सिद्ध केले आहेच. 

खरे तर, तेहतीस कोटी देवांची नावे विचारल्यावर ती सांगता येत नव्हती म्हणून हा मारून मुटकून लावलेला शोध दिसतो आहे. आणि शिरजोरी म्हणजे कोटीचा अर्थ करोड असा घेणार्‍यांना महामूर्ख संबोधण्याचा माज हे लेखक दाखवतात.  परंतु पुढील वेबसाइटवर कोटीचा अर्थ प्रकार नसून करोडच आहे असे सनातन धर्माचा व ग्रंथांचा आधार घेऊन ठासून सांगीतले आहे. या लिंक वरील मजकूर कृपया वाचवा:   
http://hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/hindu-goddess-and-god-33-million-or-kind-116111000018_1.html 
आता मूळ पोस्ट लेखकाने व त्याचा प्रचार करणार्‍यांनी  आपली भूमिका स्पष्ट करावी व कोण मूर्ख आहे ते पण वाचन, चिंतन, मनन करून व मुळाशी जाऊन समजून घ्यावे .

समजून घ्यायचे असेल तर...

समजून घ्यायचे असेल तर... जेट जगदीश 

आम्ही जेव्हा देवाधर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी-परंपरा,नास्तिक्य तसेच धर्मसुधारणेच्या बाबत आमचे विचार मांडतो तेव्हा अनेकदा अंधभक्त हा प्रश्न विचारतात की, 'तुम्ही तुमच्या घरातल्या किती लोकांचे विचार बदलले आहेत, किती लोकांना नास्तिक केले आहे?' वरवर पाहता हा प्रश्न अगदी बिनतोड वाटतो, पण विचार केल्यावर त्यातील फोलपणा सिद्ध होतो. कसा तो खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल...

यासंदर्भात मला ल. रा. पागारकरांना सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. आगरकर हे पांगारकरांचे शिक्षक होते. एक दिवशी वर्गात पांगारकरांनी आगरकरांना प्रश्न विचारला, "सर तुम्हाला एक प्रश्न विचारू काय?" 

आगरकर म्हणाले, "विचार की, त्यात परवानगीची काय गरज?" 

पांगारकर म्हणाले, "काल श्रीमती आगरकरांना मी देवळात नाकदुऱ्या काढताना पाहिले." 

आगरकर म्हणाले, "मग?" 

पांगारकर म्हणाले, "नाही, पण सर तुम्ही देव मानत नाही ना." 

त्यावर आगरकर म्हणाले, "अरे मी म्हणजे माझी बायको नाही ना." (म्हणजे तिला तिचे स्वातंत्र्य आहे.) 

याचा मतितार्थ असा की, देवाधर्मावर टीका करणारे जर स्त्रियांना गुलाम समजत नसतील तर ते त्यांच्यावर दबाव आणू शकत नाहीत. ते समजावू मात्र शकतात, नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. कारण ते त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच सुधारक कधीही परंपरावाद्यांसारखी दादागिरीची भाषा करत नाहीत, तर लोकांना प्रथा परंपरेतील चुकीच्या गोष्टी काय आहेत ते समजावून देण्याच्या प्रयत्न करतात. त्यातून विचार करणारे बदलतात आणि कट्टर असतात ते मात्र आमच्या नावाने शंख करतात. थोडक्यात काय तर आम्ही समोरच्यावर दाबावाची भाषा न वापरता आमचे विचार स्पष्टपणे मांडतो... अंधश्रध्दांनी भरलेले धर्मातील खाचखळगे आणि खड्डे दाखवतो. अर्थात ज्यांना आमचे विचार पटत नाही त्यांचा त्या खड्ड्यात पाडण्याचा अधिकारही आम्हास मान्य आहे... कारण आमच्यालेखी हा हार-जितीचा मामला नसतोच मुली, तर हा मन परिवर्तनाचा प्रदीर्घ काळ चालणारा कार्यक्रम असतो. जो आम्ही न थकता अथक परिश्रमाने करत असतो.

माझ्याकडे जेव्हा मी नास्तिक्याकडे वळत होतो आणि घरात कर्मकांडाच्या विरोधात बोलत होतो तेव्हा माझे आई-वडील म्हणाले की, 'तू आता मोठा झाला आहेस. तुझे विचार तुला कळतात, पण आमच्या लहानपणापासून आमच्यावर असेच संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही काही आता बदलू शकत नाही. तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तू तुझा कसाही वागायला मुक्त आहेस.' याचपद्धतीने मीही मग ठरवले की, त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून तेही त्यांच्या पद्धतीने जायला मुक्त आहेत. ह्यात मी त्यांना नास्तिक बनवू शकलो नाही याचे मला दुःख वाटत नाही.

मुळात विवेकवादी नास्तिक होण्याची प्रक्रिया ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. कारण लहानपणापासून आपण ज्या धर्मात जन्मलो आहोत त्याचे संस्कार आपले आई-वडील सतत करत असतात, आणि लहानपणी झालेले संस्कार जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करून... स्वतःशी झगडून बदलत नाही तोपर्यंत ते बदलणे कठीण! पण अशाप्रकारे विचार करणारी किती मंडळी असतात? समाजात चालत आलेल्या रीतीरीवाजाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी अंगी धाडस लागते. असे धाडस सगळ्यांच्यातच असते असे नाही. असे बरेच लोक असतात की, ज्यांना समाजातील घातक रूढी-परंपरा आवडत नाहीत. पण त्याविरोधात बोलायला त्यांची जीभ रेटत नाही. कारण समाजाच्या विरोधात जायचे धाडस नसते. त्यापेक्षा 'यामुळे आपले काही नुकसान होत नाही ना' असा कातडीबचाऊ विचार करून ते गप्प राहणे पसंत करतात आणि प्रवाहपतित त्याप्रमाणे वाडवडील जे करत आहेत तेच कुळाचार पुढे करत राहतात. पण सगळ्यांनाच असे गप्प राहणे जमत नाही, म्हणून ते तेवढे बदलतात. अशावेळी त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्याप्रमाणे बदलावे अशी अपेक्षा करणे गैर आहे. कारण त्या परिस्थितीत आम्ही आमच्या परीने जेवढे प्रयत्न करायचे ते केलेलेच असतात, पण आम्ही व्यक्तिस्वातंत्र्य मानतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे 'तुम्ही तुमच्या घरातील किती लोकांना नास्तीक बनवले?' असे बोल लावणे चुकीचे आहे, असे मला वाटते.

एकांत आणि एकटेपणा

एकांत आणि एकटेपणा –जेट जगदीश (^j^)

एकांतात माणूस स्वतःशी संवाद करत असतो; तर एकटेपणा माणसाला खायला उठत असतो.

एकांतात माणूस ध्यानमग्न होऊ शकतो; तर एकटेपणात माणसाचे ध्यान अस्थिर होते.

एकांतात माणूस स्वतःला प्रामाणिकपणे जोखतो; तर एकटेपणात मात्र स्वतःला जोखण्याची प्रक्रिया खंडित होते.

एकांतात माणूस आत्मपरीक्षण करून स्वतःतील दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो; तर एकटेपणात मात्र माणसाला आपण दोषी नाहीच असे वाटत असते म्हणून तो जगाला दोषी धरत असतो.

थोडक्यात...

एकांतात माणूस आनंदात राहू शकतो; पण एकटेपणा माणसाला नैराश्याकडे (डिप्रेशनमध्ये) नेऊ शकतो.

म्हणून माणसाने एकांतप्रिय असावे; पण एकटेपणाच्या धोकादायक ग्लानीत जाऊ नये.

ईदच्या दिवशी काय घडले? तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4291

सामाजिक काम करणाऱ्या बुवाबाबांना विरोध का?

संघ स्वयंसेवक घडण्याची प्रक्रिया–जगदीश काबरे (jetjagdish@gmail.com)

1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, हे आपण सगळे जाणतोच. संघ स्थापना मुख्यत्वेकरून जगाला दाखवण्यासाठी हिंदूंच्या संरक्षणासाठी होती. पण अंतस्थ हेतू होता ब्राह्मणी वृत्तीचे संरक्षण करणे! टिळक युगाच्या अंतानंतर गांधीयुग अवतरले आणि मूठभर ब्राह्मणी नेत्यांच्या हातातील स्वातंत्र्य लढा बहुजनांच्या हातात गेला. त्यामुळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी... टिकून राहण्यासाठी अखेरची धडपड म्हणून संघाच्या स्थापनेची त्यांना गरज वाटली. पण लोकांना सांगताना मात्र 'ही सांस्कृतिक संघटना समस्त हिंदूंच्या आणि हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे असे सांगितले गेले. याचा अर्थ संघ हा जन्मापासूनच दुटप्पी राहिलेला आहे. म्हणून संघामध्ये कार्यकर्ते कसे घडवले जातात हे समजून घेणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. कार्यकर्ते बनविण्याची फॅक्टरी म्हणजे संघाची शाखा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गावोगावी शाखांची निर्मिती करणे आणि ती शाखा कशी टिकेल याची तरतूद करणे हे संघ प्रचारकांचे मुख्य उद्दिष्ट असते. लहान मुलांना खेळाच्या निमित्ताने एकत्र बोलाविले जाते. त्यांच्या मेंदूत बालपणापासूनच देशभक्तीच्या नावाखाली धर्मांधता, कट्टरता व इतर धर्मियांचा द्वेष भरला जातो. ह्या बालकाच्या आई-वडीलांना आध्यात्म, आपली महान संस्कृती, संस्कारांच्या नावाखाली गोड बोलून फसवले जाते. परंतु आपला मुलगा शाखेत जाऊन काय शिकतो याकडे कुणीच लक्ष देताना दिसत नाही. *शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हेसुद्धा संघ प्रचारकच ठरवतात. आपल्या विरोधी विचारांची पुस्तके स्वयंसेवकांनी वाचू नये व त्यांना दुसरी बाजू कधीच कळू नये, याकरिता संघ प्रचारक प्रचंड मेहनत घेत असतात. आपल्याच विचारांची पुस्तके स्वयंसेवकांना मोफत वाचायला दिली जातात. त्या स्वयंसेवकाने दुसरे काहीही वाचण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याची कृती संघस्थानावर 'अब्रह्मण्यम्' म्हणून संबोधली जाते.* समाजामध्ये वावरताना संघ स्वयंसेवकाने संघाला अपेक्षितच वागावे-बोलावे अशीच त्याच्या बुद्धीची जडणघडण केली जाते. स्वयंसेवकांचा विवेक जागृत होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

चतुरस्त्र बुद्धीचा माणूस त्यांची ही वैचारिक गुलाम करण्याची मानसिकता कधीही स्वीकारणे शक्य नाही. कारण ते स्वयंसेवकांच्या अवघ्या विचारशक्तीवरचा घाला घालत असतात. एकाच ठराविक पठडीतले वाचन स्वयंसेवकाने केले तर त्याच्या विचारांची दिशा (कसली बोडक्याची दिशा!) स्पष्टपणे ठरत जाते. संघाला हवे असलेले विचारच तो समाजामध्ये बोलताना, वागताना प्रकट करेल याची त्यांना शाश्वती असते. अन्य विचारांचे वाचन त्या स्वयंसेवकाने केले तर त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतील असेच संघवाल्यांना वाटत असते. म्हणूनच ते एकमेकांना संघविचारांचीच पुस्तके मोफत वाचू देण्यास तत्पर असतात, तसे ते करतातही. मात्र अन्य साहित्याचे वाचन त्या स्वयंसेवकाने केले तर त्याच्या विचाराला धुमारे फुटण्याचा संभव असतो. तो स्वयंसेवक आपल्या नेत्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो, हा धोका संघवाल्यांना अजिबात नजरेआड करायचा नसतो. म्हणूनच ते शक्यतो त्या स्वयंसेवकाचा विवेक जागृत होणार नाही याची कसोशीने काळजी घेत असतात.

संघात बौद्धिक स्वातंत्र्याला थारा नसतो. मात्र असे बंड करून कोणी उठू नये म्हणून त्याची काळजी तो स्वयंसेवक शाखेत आल्या दिवसापासून ते घेत असतात. संघाची होणारी वेगवेगळी शिबिरे यातून ठराविक छापाची बौद्धिके सक्तीने आणि अर्थातच शिस्तीने सर्व स्वयंसेवकांना ऐकावीच लागतात. जोशपूर्ण समूह-संमोहनाचा तो उत्तम प्रयोग प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी मोठ्या चातुर्याने खेळला जातो. तो स्वयंसेवक मग त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, बोलू लागतो आणि काही स्वयंसेवक तर लिहूही लागतात. जे बोलू लागतात त्यांना संघाचे व्यासपीठ असते, जे लिहू लागतात त्यांना संघाची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके तिन्हीत्रिकाळ उपलब्ध असतात आणि त्याचेच पुनःपुन्हा चविष्टपणे वाचन केले जाते. अशा वाचनातून आणि केल्या जाणाऱ्या चिंतनातून तो स्वयंसेवक भट्टीतून काढल्या जाणाऱ्या विटेसारखा चांगला भाजला जातो आणि तो एकदा का पक्का झाला की, मग त्याला कितीही खरे सांगा, तो थंडपणे तुमचे सत्य हाणून पाडतो. त्याची बोलण्याची धाटणी बेमालूमपणे हिटलरी छापाची होते. त्याच्या विचारांचे स्वरूपही मग अनायासे हिंसक बनत जाते. संघस्थानावर आणि शिबिराच्या ठिकाणी मिरवली जाणारी लाठी ऊर्फ त्यांचा तो सुप्रसिद्ध 'दंड' जणू राजदंडाचे स्वरूप घेऊ लागतो. मात्र त्यांची बौद्धिक दिवाळखोरी त्यांनी केव्हाच जाहीर केलेली असते.

अगदी बालपणापासून 'हिंदू' बालक आपल्या शाखेत येऊ लागला की, गप्पागोष्टी आणि खेळाच्या माध्यमातून त्याला आपलेसे करायचे, आणि त्याला 'आपण काहीतरी पवित्र कार्य करतोय' असा भ्रम दाखवून 'भगव्या झेंड्याला' सलाम ठोकायला लावायचे. असा बालक किशोरावस्थेपर्यंत पोहोचतो, तरीही त्याचे संघात जाणे चालूच राहते. तो पुढे तरुण झाला की, शक्यतो संघाच्याच माध्यमातून तयार केली गेलेली पुस्तके त्याने वाचलेली असल्यामुळे त्याला सहजगत्या मुस्लीम आणि ख्रिश्चनांविरुद्ध भडकावता येते. परिणामी अन्य चिकित्सक साहित्याचे वाचन करायला त्याचे मन धजावत नाही. त्याचा तोच ध्यास त्याच्या मनात ठाण मांडून बसतो. एकच एक जोश– 'हिंदूंचे संघटन.' या जिद्दीने आसुसलेला तरुण विज्ञानाचा विद्यार्थी असला तरीही आपल्या पुराणांची चिकित्सा करायला बिलकूल तयार होत नाही. तो कायमचा अर्धकच्चा राहतो. त्याची मानसिक वाढ खुंटल्यामुळे तो एकांगी विचार करू लागतो. 'हिंदूंवर अन्याय होतोय', 'अल्पसंख्यांकांचे लाड होताहेत', 'आर्थिक निकषाच्या आधारे सवलती द्यायला हव्यात' अशी गोंडस हाळी तो द्यायला लागतो तेव्हाच खरा तो 'शुद्ध संघोटा' बनतो. थोडक्यात काय तर, संघाने तरुणांच्या तारुण्याचे लोणचे घालण्याचा कारखाना उघडला आहे. म्हणून संघाने तरुण माणसे कुजवली हे म्हणणे एकाअर्थी खरे आहे. काही तरुणांना संघ अगदीच बेचव वाटू लागला तर असा तरुण वर्ग संघातून फुटून जाऊ नये आणि फुटला तरी तो आपल्याच कह्यात राहावा यासाठी संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था उभारल्या गेल्या. 

राजकारणाशी आमचा काही संबंध नाही' असे म्हणणारे संघोटे राजकारणावाचून जगू शकत नाहीत, ही त्यांची फार मोठी शोकांतिका आहे. तरीही ते तसे का म्हणतात याचे कारण समजणे सोपे आहे. आपला राजकारणाशी उघड संबंध आहे असे जर संघाने मान्य केले तर जी कच्चीबच्ची पोरे संघाच्या शाखेवर नित्यनेमाने जातात त्यांचे पालक त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करतील आणि संघाचा जो मजबूत पाया 'शाखा' तोच ढासळला आईल. म्हणूनच संघ उघडपणे 'आम्हाला राजकारण करायचे नाही' असे सांगतो. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, असे सांगतो. पण ज्यांना राजकारणाची आवड असते ती माणसे 'भाजप'मध्ये सामील होतात. ज्यांना विद्यार्थ्यांमध्ये काम करावयाचे आहे ते 'अभाविप'मध्ये जातात. ज्यांना कामगारवर्गात काम करून कम्युनिस्टांची कामगारवर्गावरची पकड ढिली करावयाची आहे त्या व्यक्ती 'भारतीय मजदूर संघात' सामील होतात. ज्यांना सेवाभावी व्हावेसे वाटते त्या व्यक्ती 'वनवासी कल्याण आश्रमा'त निष्ठेने काम करतात. परंतु ज्यांना काहीच करावयाचे नाही अशा व्यक्ती मात्र संघाच्या पेटीत गुरुदक्षिणा टाकून मोकळ्या होतात आणि वर्षानुवर्षे संघाच्या शाखेवर 'दक्ष-आरम्'चा निरुपद्रवी एकसुरी खेळ खेळत राहतात.

*संघात बौद्धिक स्वातंत्र्याला आणि चिकित्सेला थारा नाही. संघाच्या वेगवेगळ्या शिबिरातून एका ठराविक पद्धतीची व्याख्याने (बौद्धिके) सक्तीने स्वयंसेवकांना ऐकविली जातात. समूह संमोहनाचाच तो एक प्रकार असतो.* संघाने ज्यांना महापुरुष मानलं आहे त्यांच्याबद्दल अतिशय सकारात्मक विचारांचा मारा या बौद्धिकांमधून त्यांच्या मेंदूवर केला जातो, आणि संघाने ज्यांना शत्रू मानले आहे त्यांच्याविषयी स्वयंसेवकांच्या मनात प्रचंड विखार निर्माण होईल असा संस्कार रुजवला जातो. स्वयंसेवक मग संघाचीच भाषा बोलू लागतो, त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, वागू लागतो. या सर्व प्रक्रियेतून स्वयंसेवक अधिकाधिक कट्टर बनत जातो, कारण संघाच्या विरोधी विचाराची बाजू किंवा ज्याला विवेकाची बाजू म्हणता येईल ती दुसरी बाजू कधी त्यांना बघूच दिली जात नाही. त्यामुळे संघाचा विरोधी म्हणजे आपल्या देशाचा आणि धर्माचा विरोधी असाच ह्या स्वयंसेवकांचा ठाम समज होतो.
संघाचे स्वयंसेवक कितीही उच्चशिक्षित असोत परंतु शिक्षणामुळे त्यांच्यात पेरलेली 'धर्मांधता' संघ किंचितही कमी होऊ देत नाही. *संघ प्रतिगामी आहेच, पण सर्व उच्चशिक्षितांची बुद्धी त्यांनी आपल्या विचारांच्या प्रचार-प्रसाराकरिता आणि आपल्या पुराणमतवादाचे-संस्कृतीचे गोडवे गाण्याकरिता व आपल्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराकरिता कामात आणली आहे. सुशिक्षित हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढण्याकरिता हे त्यांचे डावपेच असतात.* देशात अनेक ठिकाणी जेव्हा दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीयांवर हल्ले होतात तेव्हा संघाचा 'हिंदुत्ववाद' कधीही वर उफाळून येताना दिसत नाही. त्यावेळी त्यांचा हिंदू धर्म खतऱ्यात येत नाही. *कुठल्याही घटनेवर जरी व्यक्ती हिंदू असली तरी त्या व्यक्तीची जात पाहून ह्यांचे हिंदुत्व पेटत-विझत असते.*

संघाची कोणी चिकित्सा करू लागले तर त्याला हे स्वयंसेवक सुचवतात की, 'एकदा शाखेत या. काही दिवस शाखेत राहा, बघा आणि मग टीका करा.' त्यांचे असे बरळणे खरे तर हास्यास्पद असते. कारण चिकित्सेला तात्विक, तार्किक, वैचारिक प्रत्युत्तर देता न आल्यामुळे 'शाखेवर या, म्हणजे सारे समजेल.' असे मोघम बोलले जाते. पण त्यावर जर असा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमानांचा द्वेष वाढवण्यासाठी मुसलमानी धर्माची चिकित्सा करता तेव्हा तुम्हाला मुसलमानांनी सांगितले की, 'तुम्ही आधी मुसलमान व्हा आणि मग आमच्या धर्माची चिकित्सा करा', तर चालेल काय? थोडक्यात काय तर दारूवर टीका करण्याआधी हे स्वयंसेवक म्हणतील, 'आधी दारू पिऊन बघा, मग टीका करा.' संघाचे उद्दिष्ट एकचालकानेतृत्व असल्यामुळे 'आम्ही आदेश द्यायचा आणि स्वयंसेवकांनी कुठलाही चांगला-वाईट विचार न करता तो पाळायचा', ही संघाची समानता! याचप्रकारे कार्य करतील असे मेंदू तयार करण्याची प्रक्रिया संघात गेली ९७ वर्षे सुरू आहे. 
हिंदूधर्माचे रक्षण म्हणजे चातुर्वर्ण्याचे रक्षण, ही गोष्ट या एकांगी वाचन करणाऱ्या तरुणांच्या लक्षात कधीही येत नाही. आणि म्हणूनच जो जो संघविरोधी तो तो हिंदूंविरोधी हा त्याचा लाडका सिद्धांत बनतो. शिवाय संघकार्य हे धर्मकार्य आहे असे समजण्यात येत असल्यामुळे अशी तरुण मंडळी मग 'बंदिस्त कोठडीत' जगायला सुरुवात करतात. त्याच त्याच पठडीत केले गेलेले वाचन त्यांना पूर्णपणे संमोहित करते आणि मग असला 'दिव्य तरुण' 'नवा भारत... हिंदुराष्ट्र' उभारण्याचे स्वप्न दिव्यदृष्टीने बघू लागतो. अशाप्रकारे संघाच्या मुशीतून घडलेला हा तरुण मग पुढे सतीप्रथेचे निर्लज्ज समर्थन करू लागतो. हिंदू स्त्रियांनी चार चार मुले जन्माला घालावीत असे अभिमानाने बोलू लागतो, फुले-आंबेडकरांचे नाव काढले की अशा संघोट्यांचे डोके ठणकू लागते. 

एकंदरीत काय तर संघाचे लोक भलेही पावित्र्याच्या, साधनशुचितेच्या कितीही गप्पा मारोत, तसे ते नाहीत हेही लोकांना आता कळू लागले आहे. या विवेचनावरून आता तुमच्या लक्षात आले असेलच की संघात गेलेल्या लहान बालकाची स्वयंसेवक म्हणून जडणघडण स्वत:चे डोके न वापरता आज्ञा पालन करणाऱ्या आणि प्रश्न न विचारणाऱ्या एक यंत्रमानव होण्याच्या पद्धतीने केली जाते ते...

सुजाण पालकत्व म्हणजे काय?


सुजाण पालकत्व म्हणजे काय? –जगदीश काबरे (jetjagdish@gmail.com)

सुजाण पालक नेहमीच आपल्या पाल्याच्या मनात 'तू सर्वार्थाने समर्थ व्यक्तीमत्व घेऊन जन्माला आला आहेस . तुझं भलंबुरं तुला नक्कीच कळतं. तुझ्या भवितव्याबद्दल साधकबाधक निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात आहे. त्यावेळी तू चुकण्याची शक्यता आहे. आणि चुका करण्याचे स्वातंत्र्य आम्ही पालक म्हणून तुला देतो; पण चुकांपासून शिकण्याचे मात्र टाळू नकोस. एकदा केलेली चूक पुन्हा करू नकोस. नविन चुका कलेल्या चालतील. कारण चुकामधून शिकणे हेच प्रगतीचे लक्षण आहे. अगदी दारूण परिस्थिती आलीच तर आम्ही तुझ्यापाठीशी आहोत. तेव्हा सर्वभौम हो. निर्णयक्षमता अंगी असू दे.' अशा भावना रुजवायचा प्रयत्न करतात.

पाल्याशी बोलताना त्याच्या चुकांची खिल्ली उडवू नका. अन्यथा पाल्य स्वत:ला कोशात बंदीस्त करून घेईल. आणि त्याच्याशी संवादच खुंटेल वा तो चुकांचे समर्थन करायला लागेल. कारण जर एखाद्याने आपली खिल्ली उडवायचा प्रयत्न केला तर आपण जसे त्याचा प्राणपणाने विरोध करतो; तसेच हे वागणे असते. जेव्हा आपण चुकतो तेव्हा स्वत:शी ते कबूल करतो. आणि समोरचा जर आपल्याशी आपुलकीने व प्रेमाने वागला तर आपण त्याच्यापाशीही आपली चुक कबूल करतो. म्हणून पाल्याशी तुसडेपणाने न वागता, त्याला तुच्छ न लेखता सहनुभूतीने मदतक्षम चर्चा करणे आवश्यक ठरते. त्यासाठी पालकांचा मुलांना स्वयंपूर्ण करण्याकडे भर असावा. 

त्याच्या अभ्यसासाठी पालकांनी जागणे, त्याचा दिनक्रम ठरवणे, परीक्षा वगैरे आली की रजा घेऊन खूप काळजी घेणे या गोष्टी खूप गोड वाटतात. पण नकळत त्यातून तो मुलगा/मुलगी मानसिकदृष्ट्या परावलंबी होण्याची शक्यता असते. नकळत तो/ती आपले काम आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम नाहीत असा संदेशही जातो. त्यामुळे जेव्हा कणखर भूमिका घेण्याची गरज निर्माण होते, तेव्हा ही मुले कच खातांना दिसतात. कारण त्यांना निर्णय घ्यायची सवयच नसते. परिणामी ते कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकत नाहीत. त्याची अवस्था गांगरल्यासारखी होते. शारीरिक अपंगत्व एकवेळ समर्थ मानसिकतेने भरून काढता येतं, पण मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याची शक्यता शून्य असते.

कधी-कधी वाटतं मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ देणं किवा देता न येणं याची उणीव पालक भरून कढण्यासाठी मुलांचा शब्दही खाली पडू देत नाहीत. त्यांचा उत्तमपालन पोषण करणे म्हणजे त्यांना हवं ते आणि सांगतील ते आणून देणं. यालाच ते प्रेम समजतात. यातून मुलांचं तात्कालिक समाधान होत असलं तरी दीर्घकालीन मात्र नुकसानच होतं. मुलांचे प्रकल्प, त्यांचा अभ्यास अशा गोष्टी पालकांनी स्वत: करून देणं, मुलांना चूक करण्याची संधी न देणं, सतत त्यांच्या पुढेपुढे करणं, यातून मुलांमध्ये एकारलेपणाची वृत्ती तयार होते. सगळ्या गोष्टी ‘रेडीमेड’ मिळवण्याची सवय लागते. एखादी गोष्ट कष्टसाध्य असते, ती मिळवायला धडपड करावी लागते हेच मुलं विसरून जातात. खरं म्हटलं तर आई-बाबा घरी नसतांना स्वत:ची सगळी कामं नीट करता येणार्‍या मुलांवर आई-बाबांचं खरं प्रेम आहे असं म्हणता येईल. खरं प्रेम जीवन सन्मानाने जगण्याचं बाळकडू देतं; परावलंबीत होण्याचं नाही. मुलांचं व्यक्तिमत्व नाकारणारी, त्यांची गरजेपेक्षा जास्त काळजी घेऊन त्यांना खुजं करणारी घरं ही ‘प्रेमळ घरं’ नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं.* सगळी मुलं स्वभावत: चांगली असतात; परंतु हा चांगुलपणा वयस्कांच्या व आसपासच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो. अशा वेळेस त्याने केलेल्या चुकांच्या जबाबदाऱ्या त्याला घ्यायला लावणं हे आपल्याला कितीही त्रास झाला तरी पालकांनी त्याला समजावून सांगितले पाहिजे. म्हणून मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाढू देणं, त्यांच्या स्वप्नांना खतपाणी घालणं, योग्य दिशा दाखवणं, पण त्या दिशेने त्यांचं त्यांनाच चालायला लावणं हेच खरं सजग पालकत्व होय. संस्कार... संस्कार ते आणखीन वेगळे काय असतात.

आपल्या मुलांना आपणच 'ओळखतो' प्रत्येक मूल वेगळं, त्याची अभ्यासाची शैली वेगळी आणि त्याला त्याच्या पालकांशिवाय कोणीही तितकंसं चांगलं ओळखत नसतं. म्हणूनच त्यावर उत्तरही पालकच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शोधू शकतात. आपण कोणीही आदर्श पालक नसतो. हळूहळू चुकांमधून शिकतच पुढे गेले पाहिजे. पालकत्व हे काही आव्हान नाही, तर एक निखळ, निर्मळ आनंद देणारी प्रक्रिया आहे. तेव्हा त्यातील कोणत्याही प्रश्नाला महाभयंकर रूप देणं टाळावं, तसेच फार क्षुल्लकदेखील समजू नये. एकदा का भावनिक साक्षरता आली की, संवाद साधणं सोपं होतं. पालक-पाल्य यांच्यामध्येच सुसंवाद असला की समस्या सहज सोडवता येतात. पण अर्थात सुसंवाद म्हणजे आपण बोलणं व मुलांनी ऐकणं नाही, तर पाल्यांचंही ऐकून घेणं, समजून घेणं व त्याप्रमाणे वागणंदेखील! मूल शाळेतून आलं की त्याच्या दप्तर फेकण्याच्या पद्धतीवरूनच आज त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे लक्षात यायला हवं आणि मग अशा वेळी पालकांनी याआधी दप्तर जागेवर ठेव, फेकलंस कशाला? हा हट्टीपणा सोडून आधी त्याला काय म्हणायचंय हे समजून घेतलं पाहिजे. त्याची त्या-त्या वेळेची गरज ओळखली की मग त्याच्याशी संवाद छान साधता येऊ शकेल.

आम्हाला बालवाडीपासून सुरस चमत्कारांनी ठासून भरलेले रामायण, महाभारत, कुराण आणि बायबल शिकवले जाते. जपानमध्ये मात्र बालवाडीच्या मुलांना 'का?' नावाचे पुस्तक शिकवीले जाते. त्यामुळे जपानमध्ये तंत्रज्ञान प्रगत झाले आणि भारतात धार्मिक कर्मकांड! अंधश्रध्दांमुळे आमच्या मेंदूला कुलूप घातले गेलेलं आहे. म्हणूनच 100 किलो वजन असणारा, 6 फुट उंच असणारा, एका बुक्कीत नारळ फोडू शकणारा, हळद-कुंकू लावालेलं छोटसं लिंबू रस्त्यात दिसलं की घाबरतो.

आम्हाला 'का?' हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही किंवा ती चौकस बुध्दी पद्धतशीरपणे खुरटवण्यात आली आहे. आम्ही गप्प बसा, प्रश्न विचारू नका, या संस्कृतीत वाढलो आहोत आणि आमच्या मुलाबाळांनाही तसेच वाढवत आहोत. हे बदलायला हवे. मुलांनी 'का?' म्हणायला शिकायाला हवे. त्यांचे आपल्याला त्रासदायक वाटणारे प्रश्न विचारणे म्हणजे उद्धटपणा नाही हे आधी पालकांनी समजून घेतले पाहिजे. म्हणून आम्हाला पालकांच्या, धर्मांधता वाढवणे म्हणजे संस्कार करणे, या समजावर टिका करावी लागते. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या वाटेत परंपरेच्या, धर्माच्या, जातीच्या आणि वर्चस्ववादी वृत्तीच्या घातक मानसिकतेचे काटे अंथरण्याचे काम युगानुयुगांपासून कोण करीत आहे हे दाखवून देण्याचे प्रामाणिक काम (लोकांच्या दृष्टीने अप्रिय काम) करावे लागते. त्यासाठी समविचारी लोकांना जोडून घेणारी आणि या अंधश्रध्दांतून बाहेर काढून दिलासा देण्याचे काम करणारी अंनिस चळवळ उभारावी लागते; जी काट्याने भरलेला रस्ता सोडून नव्या उजेडाच्या वाटेवरून चालण्याचा आग्रह धरते... त्यासाठी प्रोत्साहित करते. अंधाराच्या सनातनी अग्रदूतांना हेच कदाचित पटत नसावे म्हणून पराकोटीचा तिरस्कार या व्यक्ती करत असतात आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जावून ते संस्कारहीन पातळी गाठतात. असो.

लहानपणापासून आपल्या समाजात संस्काराच्या नावाखाली परंपरेचे अंधश्रध्देचे, देवाधर्माचे इतके डोस पाजले जातात की, ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. एखाद्या अमली पदार्थासारखा हा विषय त्यांच्या मनात आणि शरीरात भिनवला जातो. ते स्वत: काही विचारच करू शकत नाहीत. कारण त्यांना ह्या गोष्टीची बाबा, बूवा, साधू, महाराज तसेच धर्मवेडे यांनी इतकी भिती घातलेली असते की, 'इकडे आड तिकडे विहीर', 'धरलं तर चावते सोडलं तर पळते', अशी बिचाऱ्यांची अवस्था होते. अशा परीस्थितीतून तुमच्याआमच्यासारखा एखादाच विचारांनी त्या बुरसटलेल्या संस्कारांवर मात करून बाहेर पडू शकतो. पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावरही त्यांना धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते; एवढे brainwashing त्या अजाणतेपणी झालेले असते. म्हणून *मूल वाढवतांना त्याला जरी सर्व धर्मांची माहीती दिली, तरी त्याच्यावर आपल्याच धर्माचे रोपण करण्याऐवजी सज्ञान होईपर्यन्त विचार करायला वाव द्यायाला हवा. आणि तदनंतर त्यालाच ठरवू द्यावे कोणत्या धर्माचा स्विकार करायचा वा निधर्मी राहायचे ते. ह्यालाच व्यक्ती स्वातंत्र्य देणे मानतात. हेच खरे पालकत्व असे मला वाटते.*

*देण्यातला आनंद म्हणजे संस्कार 'मर्यादित मी' कडून 'विशाल मी' बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संस्कार. इतरांचा विचार करायला शिकणं, स्वार्थी दृष्टिकोन बाजूला ठेवणं म्हणजे 'विशाल मी' बनवणं होय. नम्रता, कृतज्ञता, क्षमा, करुणा, आनंद, तन्मयता या भावनांचा अनुभव पालकांनी स्वत: घेणं व तो घेत असताना मुलांना त्यात सहभागी करून घेणं म्हणजे संस्कार. इतरांना देण्यातला, आनंदी करण्याचा अनुभव मुलांना दिला की, त्याला खरा संस्कार म्हणता येईल.*

संस्काराच्या व्याख्या काळानुसार बदलत आहेत. फक्ता 'शुभं करोति म्हणणं' म्हणजे संस्कार नव्हे. असे संस्कार केले नाही तर धर्म बुडेल असा बागुलबुवा करू नये. *पालकच मुलांचे पहिले रोल मॉडेल असल्यानं पालकांच्या योग्य वर्तनातून संस्कार आपोआपच घडत जातात. त्यामुळे आपलं वागणं योग्य असेल तर चांगले संस्कार आपोआपच घडत जातील.* मुलं हट्टीपणा करतात, आपल्या म्हणण्यानुसारच सर्व गोष्टी व्हाव्यात, असा आग्रह धरतात. अशावेळी पालकांनी 'आमच्या लहानपणी असं नव्हतं' हा विचार अगोदर बाजूला ठेवावा. कारण आता आजूबाजूची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. मुलांवर माध्यमाद्वारे होणार्‍या संवेदनांच्या भडिमारामुळे त्यांचा 'अहं' फारच लवकर जागृत होतो. माध्यमाद्वारे त्यांना हव्या-नको त्या सर्व माहितीचा भडिमार त्यांच्यावर सतत होत असतो. अशा वेळी पालकांकडून मुलांना माहितीपेक्षा शहाणपण, संवेदना, सद्सद्विवेक बुद्धी वाढावी यासाठी ज्या गोष्टी त्यांना संगणक, मोबाइल, फेसबुक यासारखी माध्यमं देऊ शकत नाहीत  त्यापासून मुलांना लांब ठेवण्यापेक्षा आपणही त्यांचा विधायक वापर संवादाचं माध्यम म्हणून करून घेतला तर नक्कीच उपयुक्त ठरेल.

मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्वगुण कसे विकसित करावेत यावर पालक फारच हातघाईला येतात. खरं म्हणजे प्रत्येक मूल चांगला वक्ता झालाच पाहिजे ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे. प्रत्येक क्षेत्रात अंतर्मुख (इंट्रोव्हर्ट) व बहिर्मुख (एक्स्ट्रोव्हर्ट) असे दोन्ही प्रकारचे लोक आवश्यक असतात व ते दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे मुलांना जे आवडतं ते करू द्यावं, सतत त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत. प्रत्येकाला शिवाजी जन्माला यावा असे वाटते; पण ते आपल्याकडे नाही... दुसरीकडे. कारण शिवाजी होण्यासाठी ज्या खस्ता काढाव्या लागतात त्या काढण्याची पालकांची तयारी नसते. तेव्हा तेच उच्चारवाने तथाकथित मळलेल्या वाटेवरच्या संस्काराचे शाब्दिक बुडबुडे फोडत असतात.


किशोरवयीन मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत. मोठय़ांशी अनादरानं का वागतात, असा प्रश्न बरेचदा पालकांना पडतो. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये 'दिवास्वप्ना'चं (डे ड्रिमिंग) प्रमाण वाढल्यासारखं दिसतं. ही अनेक पालकांची अडचण असते, पण यात नैसर्गिक भागही आहे. मुलींपेक्षा मुलांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी थोडी उशिरा येते. त्यामुळे बर्‍याचदा या वयात मुली अभ्यास जास्त गांभीर्यानं घेताना दिसतात. तसेच मुलांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासमोर काही रोल मॉडेल्स ठेवली, तर त्याचा निश्‍चितपणे उपयोग होऊ शकतो. त्याच्याशी संवाद साधत त्यांची आवड लक्षात घेतली, त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या व्यक्तीशी परिचय करून दिल्यास ध्येयाकडे जाण्याची त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. पण पालकांमध्ये आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी संयम आणि सामंजस्याचा अभाव असतो असे दिसून आलेले आहे.

पालकांविषयी मुलांना आदर नाही, असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण बदलत्या काळानुसार आदराची व्याख्याही तपासून पाहायला शिकलं पाहिजे. 'भीतीयुक्त आदर' वा 'आदरयुक्त भीती' या कल्पना मागे पडल्या आहेत. धाकापेक्षा मैत्रीची भावना असावी. आदर फक्त आदरार्थी बोलण्यातून दिसून येतो, असं नाही. तर तो त्यांच्या वागण्यातूनच लक्षात येतो. पालकांनी स्वत:च्या चुका लपवून न ठेवता प्रांजळपणे कबूल केल्यास मुलांना आदर वाटतो. पण मुलांना खोटे बोलू नये सांगत असणारे पालकच जर खोटे बोलताना मुल पहात असेल तर त्याचा पालकांविषयी आदर वाढेल की कमी होईल? म्हणून मुलांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्याला मुलांचं जे वागणं आवडत नसेल ते नेमकेपणानं सांगितलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपलेही वागणे ठेवले पाहिजे. त्यांच्यावर मूर्ख, बावळट, बेशिस्त असे शिक्के न मारता 'मला तुझं अमुक वर्तन आवडलं नाही,' असं सांगणं जास्त परिणामकारक ठरते. 

एवंच आजच्या पालकांपुढे अनेक दबाव असतात, असे म्हणून पळवाट काढून चालणार नाही. उलट मी तसे म्हणेन की, जर आजच्या काळानुसार मुलांना वाढवण्याची क्षमता आपल्यात नसेल तर आपण मुळात मूल जन्माला घालावेच का? प्रश्न कठोर आहे; पण विचार करण्यालायक आहे. आपण समाज एका रात्रीत बदलू शकत नाही हे पूर्णपणे मान्य. पण समाज बदलांची प्रक्रिया आपल्यापासूनच सुरु होऊ शकते, याचा केव्हा तरी आपण विचार करणार आहोत काय? 

संघ स्वयंसेवक घडण्याची प्रक्रिया

संघ स्वयंसेवक घडण्याची प्रक्रिया–जगदीश काबरे (jetjagdish@gmail.com)

1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, हे आपण सगळे जाणतोच. संघ स्थापना मुख्यत्वेकरून जगाला दाखवण्यासाठी हिंदूंच्या संरक्षणासाठी होती. पण अंतस्थ हेतू होता ब्राह्मणी वृत्तीचे संरक्षण करणे! टिळक युगाच्या अंतानंतर गांधीयुग अवतरले आणि मूठभर ब्राह्मणी नेत्यांच्या हातातील स्वातंत्र्य लढा बहुजनांच्या हातात गेला. त्यामुळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी... टिकून राहण्यासाठी अखेरची धडपड म्हणून संघाच्या स्थापनेची त्यांना गरज वाटली. पण लोकांना सांगताना मात्र 'ही सांस्कृतिक संघटना समस्त हिंदूंच्या आणि हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे असे सांगितले गेले. याचा अर्थ संघ हा जन्मापासूनच दुटप्पी राहिलेला आहे. म्हणून संघामध्ये कार्यकर्ते कसे घडवले जातात हे समजून घेणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. कार्यकर्ते बनविण्याची फॅक्टरी म्हणजे संघाची शाखा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गावोगावी शाखांची निर्मिती करणे आणि ती शाखा कशी टिकेल याची तरतूद करणे हे संघ प्रचारकांचे मुख्य उद्दिष्ट असते. लहान मुलांना खेळाच्या निमित्ताने एकत्र बोलाविले जाते. त्यांच्या मेंदूत बालपणापासूनच देशभक्तीच्या नावाखाली धर्मांधता, कट्टरता व इतर धर्मियांचा द्वेष भरला जातो. ह्या बालकाच्या आई-वडीलांना आध्यात्म, आपली महान संस्कृती, संस्कारांच्या नावाखाली गोड बोलून फसवले जाते. परंतु आपला मुलगा शाखेत जाऊन काय शिकतो याकडे कुणीच लक्ष देताना दिसत नाही. *शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हेसुद्धा संघ प्रचारकच ठरवतात. आपल्या विरोधी विचारांची पुस्तके स्वयंसेवकांनी वाचू नये व त्यांना दुसरी बाजू कधीच कळू नये, याकरिता संघ प्रचारक प्रचंड मेहनत घेत असतात. आपल्याच विचारांची पुस्तके स्वयंसेवकांना मोफत वाचायला दिली जातात. त्या स्वयंसेवकाने दुसरे काहीही वाचण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याची कृती संघस्थानावर 'अब्रह्मण्यम्' म्हणून संबोधली जाते.* समाजामध्ये वावरताना संघ स्वयंसेवकाने संघाला अपेक्षितच वागावे-बोलावे अशीच त्याच्या बुद्धीची जडणघडण केली जाते. स्वयंसेवकांचा विवेक जागृत होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

चतुरस्त्र बुद्धीचा माणूस त्यांची ही वैचारिक गुलाम करण्याची मानसिकता कधीही स्वीकारणे शक्य नाही. कारण ते स्वयंसेवकांच्या अवघ्या विचारशक्तीवरचा घाला घालत असतात. एकाच ठराविक पठडीतले वाचन स्वयंसेवकाने केले तर त्याच्या विचारांची दिशा (कसली बोडक्याची दिशा!) स्पष्टपणे ठरत जाते. संघाला हवे असलेले विचारच तो समाजामध्ये बोलताना, वागताना प्रकट करेल याची त्यांना शाश्वती असते. अन्य विचारांचे वाचन त्या स्वयंसेवकाने केले तर त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतील असेच संघवाल्यांना वाटत असते. म्हणूनच ते एकमेकांना संघविचारांचीच पुस्तके मोफत वाचू देण्यास तत्पर असतात, तसे ते करतातही. मात्र अन्य साहित्याचे वाचन त्या स्वयंसेवकाने केले तर त्याच्या विचाराला धुमारे फुटण्याचा संभव असतो. तो स्वयंसेवक आपल्या नेत्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो, हा धोका संघवाल्यांना अजिबात नजरेआड करायचा नसतो. म्हणूनच ते शक्यतो त्या स्वयंसेवकाचा विवेक जागृत होणार नाही याची कसोशीने काळजी घेत असतात.

संघात बौद्धिक स्वातंत्र्याला थारा नसतो. मात्र असे बंड करून कोणी उठू नये म्हणून त्याची काळजी तो स्वयंसेवक शाखेत आल्या दिवसापासून ते घेत असतात. संघाची होणारी वेगवेगळी शिबिरे यातून ठराविक छापाची बौद्धिके सक्तीने आणि अर्थातच शिस्तीने सर्व स्वयंसेवकांना ऐकावीच लागतात. जोशपूर्ण समूह-संमोहनाचा तो उत्तम प्रयोग प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी मोठ्या चातुर्याने खेळला जातो. तो स्वयंसेवक मग त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, बोलू लागतो आणि काही स्वयंसेवक तर लिहूही लागतात. जे बोलू लागतात त्यांना संघाचे व्यासपीठ असते, जे लिहू लागतात त्यांना संघाची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके तिन्हीत्रिकाळ उपलब्ध असतात आणि त्याचेच पुनःपुन्हा चविष्टपणे वाचन केले जाते. अशा वाचनातून आणि केल्या जाणाऱ्या चिंतनातून तो स्वयंसेवक भट्टीतून काढल्या जाणाऱ्या विटेसारखा चांगला भाजला जातो आणि तो एकदा का पक्का झाला की, मग त्याला कितीही खरे सांगा, तो थंडपणे तुमचे सत्य हाणून पाडतो. त्याची बोलण्याची धाटणी बेमालूमपणे हिटलरी छापाची होते. त्याच्या विचारांचे स्वरूपही मग अनायासे हिंसक बनत जाते. संघस्थानावर आणि शिबिराच्या ठिकाणी मिरवली जाणारी लाठी ऊर्फ त्यांचा तो सुप्रसिद्ध 'दंड' जणू राजदंडाचे स्वरूप घेऊ लागतो. मात्र त्यांची बौद्धिक दिवाळखोरी त्यांनी केव्हाच जाहीर केलेली असते.

अगदी बालपणापासून 'हिंदू' बालक आपल्या शाखेत येऊ लागला की, गप्पागोष्टी आणि खेळाच्या माध्यमातून त्याला आपलेसे करायचे, आणि त्याला 'आपण काहीतरी पवित्र कार्य करतोय' असा भ्रम दाखवून 'भगव्या झेंड्याला' सलाम ठोकायला लावायचे. असा बालक किशोरावस्थेपर्यंत पोहोचतो, तरीही त्याचे संघात जाणे चालूच राहते. तो पुढे तरुण झाला की, शक्यतो संघाच्याच माध्यमातून तयार केली गेलेली पुस्तके त्याने वाचलेली असल्यामुळे त्याला सहजगत्या मुस्लीम आणि ख्रिश्चनांविरुद्ध भडकावता येते. परिणामी अन्य चिकित्सक साहित्याचे वाचन करायला त्याचे मन धजावत नाही. त्याचा तोच ध्यास त्याच्या मनात ठाण मांडून बसतो. एकच एक जोश– 'हिंदूंचे संघटन.' या जिद्दीने आसुसलेला तरुण विज्ञानाचा विद्यार्थी असला तरीही आपल्या पुराणांची चिकित्सा करायला बिलकूल तयार होत नाही. तो कायमचा अर्धकच्चा राहतो. त्याची मानसिक वाढ खुंटल्यामुळे तो एकांगी विचार करू लागतो. 'हिंदूंवर अन्याय होतोय', 'अल्पसंख्यांकांचे लाड होताहेत', 'आर्थिक निकषाच्या आधारे सवलती द्यायला हव्यात' अशी गोंडस हाळी तो द्यायला लागतो तेव्हाच खरा तो 'शुद्ध संघोटा' बनतो. थोडक्यात काय तर, संघाने तरुणांच्या तारुण्याचे लोणचे घालण्याचा कारखाना उघडला आहे. म्हणून संघाने तरुण माणसे कुजवली हे म्हणणे एकाअर्थी खरे आहे. काही तरुणांना संघ अगदीच बेचव वाटू लागला तर असा तरुण वर्ग संघातून फुटून जाऊ नये आणि फुटला तरी तो आपल्याच कह्यात राहावा यासाठी संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था उभारल्या गेल्या. 

राजकारणाशी आमचा काही संबंध नाही' असे म्हणणारे संघोटे राजकारणावाचून जगू शकत नाहीत, ही त्यांची फार मोठी शोकांतिका आहे. तरीही ते तसे का म्हणतात याचे कारण समजणे सोपे आहे. आपला राजकारणाशी उघड संबंध आहे असे जर संघाने मान्य केले तर जी कच्चीबच्ची पोरे संघाच्या शाखेवर नित्यनेमाने जातात त्यांचे पालक त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करतील आणि संघाचा जो मजबूत पाया 'शाखा' तोच ढासळला आईल. म्हणूनच संघ उघडपणे 'आम्हाला राजकारण करायचे नाही' असे सांगतो. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, असे सांगतो. पण ज्यांना राजकारणाची आवड असते ती माणसे 'भाजप'मध्ये सामील होतात. ज्यांना विद्यार्थ्यांमध्ये काम करावयाचे आहे ते 'अभाविप'मध्ये जातात. ज्यांना कामगारवर्गात काम करून कम्युनिस्टांची कामगारवर्गावरची पकड ढिली करावयाची आहे त्या व्यक्ती 'भारतीय मजदूर संघात' सामील होतात. ज्यांना सेवाभावी व्हावेसे वाटते त्या व्यक्ती 'वनवासी कल्याण आश्रमा'त निष्ठेने काम करतात. परंतु ज्यांना काहीच करावयाचे नाही अशा व्यक्ती मात्र संघाच्या पेटीत गुरुदक्षिणा टाकून मोकळ्या होतात आणि वर्षानुवर्षे संघाच्या शाखेवर 'दक्ष-आरम्'चा निरुपद्रवी एकसुरी खेळ खेळत राहतात.

*संघात बौद्धिक स्वातंत्र्याला आणि चिकित्सेला थारा नाही. संघाच्या वेगवेगळ्या शिबिरातून एका ठराविक पद्धतीची व्याख्याने (बौद्धिके) सक्तीने स्वयंसेवकांना ऐकविली जातात. समूह संमोहनाचाच तो एक प्रकार असतो.* संघाने ज्यांना महापुरुष मानलं आहे त्यांच्याबद्दल अतिशय सकारात्मक विचारांचा मारा या बौद्धिकांमधून त्यांच्या मेंदूवर केला जातो, आणि संघाने ज्यांना शत्रू मानले आहे त्यांच्याविषयी स्वयंसेवकांच्या मनात प्रचंड विखार निर्माण होईल असा संस्कार रुजवला जातो. स्वयंसेवक मग संघाचीच भाषा बोलू लागतो, त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, वागू लागतो. या सर्व प्रक्रियेतून स्वयंसेवक अधिकाधिक कट्टर बनत जातो, कारण संघाच्या विरोधी विचाराची बाजू किंवा ज्याला विवेकाची बाजू म्हणता येईल ती दुसरी बाजू कधी त्यांना बघूच दिली जात नाही. त्यामुळे संघाचा विरोधी म्हणजे आपल्या देशाचा आणि धर्माचा विरोधी असाच ह्या स्वयंसेवकांचा ठाम समज होतो.
संघाचे स्वयंसेवक कितीही उच्चशिक्षित असोत परंतु शिक्षणामुळे त्यांच्यात पेरलेली 'धर्मांधता' संघ किंचितही कमी होऊ देत नाही. *संघ प्रतिगामी आहेच, पण सर्व उच्चशिक्षितांची बुद्धी त्यांनी आपल्या विचारांच्या प्रचार-प्रसाराकरिता आणि आपल्या पुराणमतवादाचे-संस्कृतीचे गोडवे गाण्याकरिता व आपल्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराकरिता कामात आणली आहे. सुशिक्षित हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढण्याकरिता हे त्यांचे डावपेच असतात.* देशात अनेक ठिकाणी जेव्हा दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीयांवर हल्ले होतात तेव्हा संघाचा 'हिंदुत्ववाद' कधीही वर उफाळून येताना दिसत नाही. त्यावेळी त्यांचा हिंदू धर्म खतऱ्यात येत नाही. *कुठल्याही घटनेवर जरी व्यक्ती हिंदू असली तरी त्या व्यक्तीची जात पाहून ह्यांचे हिंदुत्व पेटत-विझत असते.*

संघाची कोणी चिकित्सा करू लागले तर त्याला हे स्वयंसेवक सुचवतात की, 'एकदा शाखेत या. काही दिवस शाखेत राहा, बघा आणि मग टीका करा.' त्यांचे असे बरळणे खरे तर हास्यास्पद असते. कारण चिकित्सेला तात्विक, तार्किक, वैचारिक प्रत्युत्तर देता न आल्यामुळे 'शाखेवर या, म्हणजे सारे समजेल.' असे मोघम बोलले जाते. पण त्यावर जर असा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमानांचा द्वेष वाढवण्यासाठी मुसलमानी धर्माची चिकित्सा करता तेव्हा तुम्हाला मुसलमानांनी सांगितले की, 'तुम्ही आधी मुसलमान व्हा आणि मग आमच्या धर्माची चिकित्सा करा', तर चालेल काय? थोडक्यात काय तर दारूवर टीका करण्याआधी हे स्वयंसेवक म्हणतील, 'आधी दारू पिऊन बघा, मग टीका करा.' संघाचे उद्दिष्ट एकचालकानेतृत्व असल्यामुळे 'आम्ही आदेश द्यायचा आणि स्वयंसेवकांनी कुठलाही चांगला-वाईट विचार न करता तो पाळायचा', ही संघाची समानता! याचप्रकारे कार्य करतील असे मेंदू तयार करण्याची प्रक्रिया संघात गेली ९७ वर्षे सुरू आहे. 
हिंदूधर्माचे रक्षण म्हणजे चातुर्वर्ण्याचे रक्षण, ही गोष्ट या एकांगी वाचन करणाऱ्या तरुणांच्या लक्षात कधीही येत नाही. आणि म्हणूनच जो जो संघविरोधी तो तो हिंदूंविरोधी हा त्याचा लाडका सिद्धांत बनतो. शिवाय संघकार्य हे धर्मकार्य आहे असे समजण्यात येत असल्यामुळे अशी तरुण मंडळी मग 'बंदिस्त कोठडीत' जगायला सुरुवात करतात. त्याच त्याच पठडीत केले गेलेले वाचन त्यांना पूर्णपणे संमोहित करते आणि मग असला 'दिव्य तरुण' 'नवा भारत... हिंदुराष्ट्र' उभारण्याचे स्वप्न दिव्यदृष्टीने बघू लागतो. अशाप्रकारे संघाच्या मुशीतून घडलेला हा तरुण मग पुढे सतीप्रथेचे निर्लज्ज समर्थन करू लागतो. हिंदू स्त्रियांनी चार चार मुले जन्माला घालावीत असे अभिमानाने बोलू लागतो, फुले-आंबेडकरांचे नाव काढले की अशा संघोट्यांचे डोके ठणकू लागते. 

एकंदरीत काय तर संघाचे लोक भलेही पावित्र्याच्या, साधनशुचितेच्या कितीही गप्पा मारोत, तसे ते नाहीत हेही लोकांना आता कळू लागले आहे. या विवेचनावरून आता तुमच्या लक्षात आले असेलच की संघात गेलेल्या लहान बालकाची स्वयंसेवक म्हणून जडणघडण स्वत:चे डोके न वापरता आज्ञा पालन करणाऱ्या आणि प्रश्न न विचारणाऱ्या एक यंत्रमानव होण्याच्या पद्धतीने केली जाते ते...

भारतीय दर्शने

आस्तिक षड्दर्शने-
(१) सांख्यदर्शन :- हे दर्शन ‘विश्वनिर्मिती व विश्वविकासाचा’ निव्वळ ‘भौतिक दृष्टिकोनातून’ विचार करणारे व त्यासाठी ‘कुणा ईश्वराच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही’ असे मानणारे व त्याअर्थी ‘नास्तिक दर्शन’ आहे. पण ईश्वर मानीत नसले तरी हे दर्शन वेदांना विरोध करीत नसल्यामुळे त्याची ‘आस्तिक’ अशी वर्गवारी केली गेली. मूळ निरीश्वरवादी सांख्यदर्शन आज उपलब्ध नाही. या विचारधारेची दर्शन स्वरूपात मांडणी कपिलमुनीने केलेली असून, नंतरच्या काळातील गीतेनेही (सांख्यमतात काही बदल करून पण) कपिलमुनींना फार मान दिलेला आहे. 
(२) योगदर्शन :- ‘सांख्य आणि योग’ या दोन सर्वात जुन्या विचारधारा असाव्यात आणि त्या वेदपूर्व सिंधू संस्कृतींतूनसुद्धा आल्या असण्याची शक्यता आहे. योगात असे मानतात की मन स्थिर करून व ठेवून ध्यानधारणा केल्यास अनेक मनोशारीरिक उपलब्धी प्राप्त होतात. योगाची दर्शन-स्वरूप आणि सूत्रमय रचना इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या पतंजलीमुनीने केलेली आहे. पतंजलीच्या ‘योगश्चित् वृत्तीनिरोध:’ म्हणजे ‘योग हे चित्तवृत्तीचे नियमन होय’ या योगाच्या व्याख्येत ‘ईश्वर’ नाही. पण पतंजलीने मन केंद्रित करण्यासाठी एक ‘पर्याय’ म्हणून तरी ईश्वर सांगितलेला आहे. कुठल्याही कारणाने का असेना, पण ‘योगदर्शन ईश्वर मानते’ असे साधारणपणे मानले जाते. पुढील काळातील गीतेने तर योग हा ध्यानयोग या नावाने मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला व त्याला ईश्वराबरोबर जोडून टाकले. जैन व बौद्ध हे ईश्वर न मानणारे याअर्थी नास्तिक धर्म असूनसुद्धा ते त्यांचे स्वत:चे योगशास्त्र मानतात.
(३) वैशेषिक दर्शन :- कणादमुनीने असे सांगितले की जगाची निर्मिती परमाणूंपासून होते व त्यासाठी कुणा ईश्वराची आवश्यकता नाही. कणादमुनी हा चक्क एक वैज्ञानिक वाटतो आणि त्याचे हे दर्शन खरे तर नास्तिक दर्शन आहे. परंतु वेदांना न नाकारल्यामुळे त्याचीही गणना आस्तिक दर्शन अशी झाली. 
(४) न्यायदर्शन :- गौतममुनी या प्रणेत्याचे हे दर्शन वादविवादांसाठी वापरले जात असे म्हणून याला वादविद्या असेही म्हणतात. ‘न्याय’ म्हणजे ‘प्रमाण’ ठरवून तत्त्वाची परीक्षा करणे होय. हे दर्शन स्पष्टपणे सर्वज्ञ, सर्वव्यापक व सर्वशक्तिमान ‘ईश्वराचे’ अस्तित्व मानणारे दर्शन आहे. पण हे दर्शन ईश्वराला सृष्टीचे ‘घटकद्रव्यकारण’ असे मानीत नसून, ते त्याला ‘निमित्तकारण’ असे मानते. 
(५) मीमांसा किंवा पूर्वमीमांसा :- जैमिनी ऋषीच्या या दर्शनाला ‘जैमिनीसूत्रे’ असेही म्हणतात. हे दर्शन यज्ञ, आत्मा, वेदप्रामाण्य वगैरे सर्व मानते व हे मुख्यत्वे वैदिक यज्ञांच्या कर्मकांडाशीच संबंधित दर्शन आहे. पण यांच्या मते यज्ञाच्या कर्मफळाचा दाता स्वत: यज्ञ आहे, ईश्वर नव्हे. याअर्थी खरे तर हे दर्शन ‘नास्तिक’ आहे. पण वेद व यज्ञ यांना मानणारे म्हणून हे दर्शन आस्तिक, प्रतिष्ठित गणले गेले.
(६) उपनिषदे, वेदांत दर्शन किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन हिंदूंच्या षड्दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख व जवळजवळ सर्वमान्य असे दर्शन आहे. याच्यानुसार ईश्वर आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून, म्हणजे त्या दोघांत ‘द्वैत’ नसून ‘अद्वैत’ आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी व त्यातील सर्व सजीव ईश्वरमय आहेत. आत्मा व परमात्मा एकच आहेत, असे संपूर्ण अद्वैत मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म आहे. 
पारसी, ज्यू, ख्रिस्ती व मुसलमान हे सर्व एकेश्वरवादी धर्म आहेत. पण ते त्यांचा तो एकमेव ईश्वर आणि त्याने निर्मिलेली (असे मानलेली) ही सृष्टी यांना वेगवेगळे मानतात व त्याअर्थी ते सगळे द्वैतवादी धर्म आहेत. प्रमुख उपनिषदांनंतर काही शतकांनी असेल, ‘ब्रह्मसूत्रे’ हा त्यांच्यावरील प्रमाण ग्रंथ बादरायणाचार्यानी रचला. त्यांनी नास्तिक मताला विरोध करून ईश्वरवादाचे म्हणजे ब्रह्मवादाचे समर्थन केले. पुढे हे औपनिषदिक तत्त्वज्ञानच हिंदू धर्माचे मुख्य तत्त्वज्ञान बनले.

याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन या ३ नास्तिक दर्शनांनाही तितक्याच आदराने स्वीकारले आहे.

(७) व (८) जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन: आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इ.स.पूर्वच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या महावीर यांना जैन धर्माचा व गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचा संस्थापक मानण्यात येते. हे दोघेही क्षत्रिय वर्णाचे व मगध प्रांतीय म्हणजे आजच्या बिहार राज्यातील वेगवेगळ्या राजघराण्यांत जन्मलेले होते. त्यातील गौतम बुद्ध तर ब्राह्मणांहून क्षत्रिय श्रेष्ठ आहेत असे मानणारा होता. पण कुठलेही जातिभेद, वर्णभेद पाळू नका असे त्याने सांगितले. हे दोन्ही धर्म हिंदू धर्मातील ‘ईश्वर’ किंवा ‘ब्रह्म’ ही संकल्पना मानीत नाहीत; आणि ते कुणा देवांच्या मूर्तीही बनवीत नाहीत. मात्र जैन धर्मीय त्यांच्या र्तीथकरांना ‘मार्गदर्शक’ मानून त्यांच्या मूर्ती बनवितात. काही बौद्ध देशांमध्ये बुद्धाच्या (आदिबुद्धाच्या) मूर्ती बनवून त्याला ईश्वर म्हणून पूजतात. शिवाय हे दोन्ही धर्म अहिंसक आहेत. महावीराने तर अहिंसा हाच परमधर्म असे सांगितले. जैन धर्मात, वैदिक धर्मातील पशुहिंसेमुळे वेदांना चक्क ‘हिंसक श्रुती’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे जैन व बौद्ध या दोन्ही धर्माना वर्णभेद व जातिभेद मान्य नाहीत.जैन व बौद्ध हे दोन्ही वेगवेगळे धर्म मानले जात असूनही ते हिंदू धर्माच्याच यज्ञविरोधी, वेदविरोधी, वर्णभेदविरोधी अशा फुटीर शाखा आहेत असेही म्हणता येते. 
याची कारणे अशी- 
(१) जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म मूलत: उपनिषदांप्रमाणे निवृत्तीवादी (संन्यासमार्गी) धर्म आहेत. 
(२) या दोन्ही धर्मानी आचारविचारांचा मोठा वारसा, वैदिक धर्माकडून घेतलेला आहे. उदाहरणार्थ योगविद्या- पण स्वत:ची वेगळी परिभाषा निर्माण करून. त्याचप्रमाणे पुढील काळात हिंदूंच्या पौराणिक कथा, त्यात त्यांच्या धर्माला अनुकूल असे बदल करून त्यांनी उचलल्या. 
(३) जैन धर्मीयांनी तर हिंदूंचे अनेक संस्कार व मूर्तिपूजा स्वीकारून आजही भारतात (आपले वेगळेपण काहीसे टिकवून) ते हिंदू धर्मीयांशी समरसतेने व सुखाने राहात आहेत. जैन धर्मात असे मानतात की, ऋषभदेव या त्यांच्या पहिल्या र्तीथकरापासून सुरू होऊन, पाश्र्वनाथ हा त्यांचा तेविसावा र्तीथकर व महावीर हा त्यांचा चोविसावा र्तीथकर आहे. त्यांच्यापैकी पाश्र्वनाथापूर्वीचे बावीस जण ऐतिहासिक नसून काल्पनिक असावेत असे त्यांच्या वयांच्या (लाखो वर्षे) व शारीरिक उंचीच्या पौराणिक वर्णनांवरून वाटते. पाश्र्वनाथ हा तेविसावा र्तीथकर मात्र इ.स.पू. ८००च्या सुमारास नक्की होऊन गेला असावा. सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे) व अपरिग्रह (साठा न करणे) अशा चार यामांचा (म्हणजे नियमांचा) ‘चातुर्याम धर्म’ पाश्र्वनाथाने श्रमणांसाठी म्हणजे मुमुक्षूंसाठी सांगितला होता. या धर्मातच ‘ब्रह्मचर्य’ या पाचव्या यामाची भर घालून तो महावीराचा पंचमहाव्रतांचा जैन धर्म बनला.बुद्धाने वैदिकांचे शब्दप्रामाण्य, कर्मकांड व ईश्वरप्रामाण्य साफ नाकारले. त्याला दु:खी व पीडित लोकांना दु:खमुक्त होण्याचा नवीन मार्ग दाखवायचा होता. 
बुद्धाची चार थोर सत्ये अशी :- 
(१) जग दु:खमय आहे. 
(२) दु:खाचे कारण तृष्णा हे आहे. 
(३) तृष्णेच्या त्यागाने दु:खनाश होईल. 
(४) निर्वाणप्राप्तीसाठी अष्टांगिका मार्ग अवलंबावा. मूलत: जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म निरीश्वरवादी आहेत. मात्र जैन धर्मात जीवात्मा या अर्थी आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्मही मानतात. स्वत: गौतम बुद्ध मात्र अमर आत्म्याचे अस्तित्वसुद्धा न मानणारा होता. ‘सतत बदलणाऱ्या या जगात स्वत:ला प्रश्न विचारून, चौकशी करून, बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारा,’ असे बुद्धिप्रामाण्यवादी मार्गदर्शन करणारा गौतम हा जगातील एकमेव धर्मसंस्थापक होय. वैदिक कर्मकांडाला व हिंसक यज्ञांना लोक आधीच कंटाळलेले असताना व उपनिषदांनीसुद्धा यज्ञविरोधी आवाज उठविलेला असताना, अनेक राजे व त्यांची सैन्ये एकमेकांशी भिडून महाभारत युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे, हिंसेबद्दल एक प्रकारचा उबग लोकांच्या मनात निर्माण झालेला असतानाच, जैन व बौद्ध हे सत्य, अहिंसा, शांती अशा थोर मूल्यांवर आधारित धर्म लोकांसमोर आल्यामुळे एक वैचारिक मन्वंतर घडून आले. ‘न दिसणाऱ्या ईश्वरामागे धावण्यापेक्षा सदाचार व सद्भावनांनी सर्वानी सुखी व्हा’ असे आवाहन त्यांनी केले. लोकाश्रय व राजाश्रय मिळवून या दोन्ही धर्माचा तत्कालीन भारतात वेगाने प्रसार झाला.

(९) चार्वाक दर्शन: चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते.

चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. चार्वाक ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. परंपरा शंकर... पुरंदर... बृहस्पती... अशी धरली जाते.

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे आत्माईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. चार्वाक मताप्रमाणाे, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्त्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्त्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.

चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्‌!‘ हा त्याचा मुख्य सिद्धान्त आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू. चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते. या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ म्हणले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.

पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वीआपतेज,वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्त्वात नाही.

आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे. परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही. तरी ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे. असे हे लोकायतिक म्हणजेच ईहवादी तत्त्वज्ञान आहे.