Thursday, December 19, 2024

ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?


ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?
– जगदीश काबरे.

प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गुढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना .... समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलीतगात्र... भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तत्कालीक हितसंबंधाच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामूनच आणलेलं असतं? तसं असेल तर असे हितसंबंध जोपासण्यात काय हशील आहे? कारण ह्या हितसंबंधातून वैयक्तिक आयुष्य जरी भरभराटीला येत असले तरी त्यामुळे संपूर्ण समाजाचं किती नुकसान होत असतं! परिणामी मानवाच्या प्रगतीलाच खीळ बसत असते, हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला हवं.

फलज्योतिषासंबंधी विचार करतांना हा मुद्दा प्रकर्षाने जाणवत राहतो. भविष्याबद्दलचे कुतूहल समजू शकते. पण त्यासाठी निसर्गातील ग्राहगोलांना वेठीस धरणं समजू शकत नाही. भविष्यकाळ उज्वल व्हावा म्हणून प्रयत्न केलेले समजू शकतात. पण त्या प्रयत्नांच्या जोडीला नशीब, देव-देव यांचा आधार घ्यावा लागणं; हे समजू शकत नाही. विचारांची पायवाट काढायची असली तरी ती अखेर फलदायी ठरणारी असते, हे आपल्याला कळतं. पण त्याच वेळेस कष्टांना घाबरून भावनाशीलतेच्या आहारी जात ज्योतिषांच्या हातातलं बाहूलं बनणं समजू शकत नाही. या विसंगतीपूर्ण वागण्यामागची कारणं निव्वळ भविष्याविषयीची अनाकलनीयता असते की, आत्मविश्वासाचा अभाव? आपण एकाच वेळेस 'आपला हात जगन्नाथ' म्हणत 'प्रयत्नांती रगडीता वाळूचे कण त्यातून तेलही गळे' असा प्रयत्नवादाचा जयघोष करत असतो, तर त्याचवेळेस दुसरं मन मात्र आपला हात ज्योतिष मार्तडांच्या हातात देवून भाग्य उजळण्याची पळवाट शोधत असतं. ह्याचं एक कारण असंही असू शकेल की, माणसाचं मन विचारांपेक्षा भावनेच्या आहारी सहज आधीन होतं. कारण भावनाशीलता ही माणसाला आभासी का होईना पण तात्काळ चिंतामुक्त करते. मनाला हवी तशी उत्तरं शोधते. तर बुद्धीनिष्ठता मनाला सतत बोचणी लावत असते. सतत विचार करायला प्रवृत्त करते. स्वाभाविकच मानवी मन हे सोयीच्या भावनांना बळी पडतं. आणि हे बळी पडणंच माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देतं. मन कमकुवत करतं. हळूहळू अशी वेळ येते की, माणूस विचार करणंच टाळायला लागतो. विचार करणं म्हणजे डोक्याला नसती कटकट वाटायला लागते. परिणामी एवढ्यातेवढ्या गोष्टींना मानवी मन घाबरू लागते. मग प्रयत्नाची वाट चोखाळण्याऐवजी माणूस सुखाचा शॉर्टकट शोधायला धावतो आणि अंधश्रद्धेचा बळी ठरतो. बुवा-बाबांना, कर्मकांडांना, देवदेवतांना आणि ज्योतिषांना... हे चक्र त्याच्यामागे शुक्लकाष्ठासारखे मग चालूच राहाते. या चक्रात आपण पिळून निघतोय असं मात्र त्याला कधीही वाटत नाही, हे विशेष. कारण तोपर्यंत त्याच्या मनाने प्राक्तन, नशीब, दैव, भोग ह्या सर्वांचा असा घट्ट हात पकडलेला असतो की, हेच शब्द त्याला पूर्वजन्मीचे कर्म असं वाटायला लावून सगळं सहन करायला शिकवत असतात. हीच खरी माणसाच्या आयुष्याची शोकांतिका असते. गगनाला गवसणी घालण्याची विजूगिषू वृत्ती बाळगणारा माणूस दुसऱ्या बाजूनं मात्र असा गर्भगळीत झालेला, नियतीच्या हातातलं वाहूलं बनलेला दिसतो. ह्या दैवदुर्विलासाला काय म्हणावं!

एकीकडे आपला विज्ञानावर विश्वास असतो. पण त्याचबरोबर वैज्ञानिक कसोट्या न लावता काही गोष्टी आंधळेपणानं सत्य म्हणून स्वीकारण्याकडेही आपला कल असतो. ज्योतिषशास्त्राला आपले सांस्कृतिक संचित समजून आणि भृगुसंहितेला प्रमाण मानून आपण जन्मकुंडली, हस्तरेषा, ललाटरेषा यांचे वाचन करून आपला भूतकाळ व भविष्यकाळ शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा आधार खरोखरच भरभक्कम आहे का? तो शास्त्रीय कसोट्यांवर टिकणारा आहे का? की आपल्या कमकुवत मनला तात्पुरता समाधान देणारा आहे? हा विचार आपण कधी केलाय का? ह्या आधाराची जरा चिकित्सा केली तर त्यातून काय निष्पन्न होते? म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे शास्त्र असेल तर ते शास्त्रीय कसोट्यांवर का टिकत नाही?

शास्त्रीय आधार म्हणून जन्मकुंडली मांडताना ज्योतिषी अचूक जन्मवेळेचा आग्रह धरतात. आता जन्मवेळ नेमकी कोणती मानावी? मुलाचं डोकं दिसायला लागते ती वेळ? की मूल पूर्णपणे जगात प्रवेश करते ती वेळ? की ते पहिला श्वास घेऊन ट्याहॅ करते ती वेळ? की सर्वात प्रथम स्त्रीवीज आणि पुंबीजाचं मिलन होतं ती वेळ? की या मिलनानंतर ज्या क्षणी त्या पेशीमध्ये जीव निर्माण होतो ती वेळ? (या दोन्ही वेळा कुणालाही सांगता येणे कठीण!) ह्या प्रश्नांच्या उत्तराची एकवाक्यता अजूनही भल्या भल्या ज्योतिषमार्तंडामध्येही आढळत नाही. मग अशा प्रकारे तयार झालेली जन्मकुंडली ही शास्त्रीय मानायची काय?

बरे ते असो. कुंडलीतील ग्रहमानानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी होणे जर अटळ असेल तर त्या अमुक एक प्रकाराने ग्रहशांती, उपासतापास इत्यादी कर्मकांड केल्यावर त्या टळू शकतात यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? याचा अर्थ अशा अटळ घडामोडींवर ताबा मिळवण्याइतपत माणसाचा आत्मविश्वास जर आहे तर तो ह्या कर्मकांडाशिवाय का वापरू शकत नाही? माणूस जर लाखो किलोमीटर अंतरावरील ग्रहांवर आपल्या मंत्रशक्तीने आणि अनुष्ठानांनी हुकूमत चालवून त्यांना वठणीवर आणू शकतो, तर एवढा प्रबळ माणूस आज दुःखात का? गरिबीत का? असे प्रश्न पडण्याच्या ऐवजी आत्मविश्वास गमावलेला तो प्राक्तनाचा भोग, पूर्वजन्मीचे पाप म्हणत आपल्याच नशिबाला दोष देत असतो.

जरा डोळसपणे विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की, ह्यात ग्रहताऱ्यांचा काहीही दोष नाही. प्राक्तन आणि पूर्वजन्माचा तर नाहीच नाही. हया सगळ्या दुःखाचं मूळ आहे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती! त्याचाच तो परिपाक आहे. सत्ताधाऱ्यांना आणि भटाभिक्षुकांना जनसामान्यांवरील आपली पकड ढिली करायची नसते. हे जनसामान्य जर असेच दुःखात पिचत राहिले, आत्मसविश्वासहीन जगले, अंधश्रद्धेच्या गर्तेतच फिरले, कुठल्या तरी भयगंडांनी पछाडलेले असले, रोटीरोजीच्या चिंतेने ग्रस्त असले, तरच त्यांची सत्तास्थाने टिकून रहातील. त्यासाठी त्यांना देवाचा, ज्योतिषाचा बागुलबुवा उभा करणे भागच असते. जर सर्वसामान्य जनता विचार करू लागली, जागृत झाली, प्रश्नांची चिकित्सा करू लागली तर ह्यांचे चालायचे कसे? उत्पन्नाचं – तेही सहजगत्या मिळवून देणाऱ्या साधनाला एवढ्या सहजासहजी सोडायचं कसं? म्हणूनच ज्योतिष हे शास्त्र आहे असं आपल्या मनावर वर्षानुवर्षे ह्या तथाकथित विद्वानांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी ठसवलं आहे. ठेविले अनंते तैसेची रहावे। दित्ती असो यादे समाधान||' असे पढवून द्या हितसंबंधीयांनी उपासतापास, भविष्य सुखासमाधानात जावे म्हणून कर्मकांडाचे फसवे समाधान देण्याचे कार्य,  नियमितपणे इमानेइतबारे चालवले आहे, हे आता तरी आपण लक्षात घेणार आहोत काय?

फार वर्षांपूर्वी माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा त्याला आपली पृथ्वी कशी आहे? सूर्य काय आहे? चंद्र काय आहे? आकाशातील तारे म्हणजे काय? पाऊस कसा पडतो? असे अनेक प्रश्न पडत होते. त्या त्या वेळच्या त्याच्या उत्क्रांत अवस्थेप्रमाणे तो त्यांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करीत होता. ह्या उत्तरांमध्ये काळानुरूप बदलडी होत गेले. पण हे बदल सहजासहजी झालेले नाहीत. धर्माच्या, कर्मकांडाच्या नावाखाली ह्या बदलांना विरोध होत राहीलाच. पण परिस्थितीच्या आणि नवज्ञानाच्या प्रचंड रेट्यामुळे हा बदलही होतच राहिला. त्याला धर्ममार्तंडही रोखू शकले नाहीत.

म्हणूनच सुरवातीच्या काळात ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनात अर्थ प्राप्त झाला आहे, त्यांचे ऋण म्हणून, त्याच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पूजाअर्चाचा जन्म झाला. पण ह्या कृतज्ञतेचे रूपांतर कालांतराने कर्मकांडात आणि माणसाला भविष्याच्या भयगंडात टाकण्यात झाले. आज सूर्य, चंद्र, तारे आदी काय आहेत हे आपल्याला कळले नाही. पाऊस कसा पडतो तेही उमगले आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची पूजाअर्चा वा इतर कोणतेही कर्मकांड केले नाही तरी ते नियमितपणे त्यांच्या शास्त्रीय नियमानुसारस त्यांची कर्मे करीतच राहाणार आहेत. मग कुंडलीत सूर्य, चंद्र, आर्दीना स्थान देण्यात काय बरे अर्थ आहे? त्यांच्या पोटी कृतज्ञता असणे वेगळे आणि त्यांचा आधार घेऊन ज्योतिष्यांनी सामान्य माणसाला घाबरवून सोडणे वेगळे.

मूळात जन्मकुंडलीत सूर्य, चंद्र, राहू व केतू ह्यांना स्थान देऊन आणि त्यांना ग्रह मानून आपण आपले अज्ञानच प्रकट करीत असतो. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' हे आता शालेय विद्यार्थी सहज सांगू शकतात. पण फलज्योतिषात मात्र 'पृथ्वीभोवती सूर्य फिरतो' असे आजही समजतात. म्हणजे शिक्षितांना बरोबर विरुद्ध अर्थ सांगून आपण लोकांना मागास ठेवत आहोत याचेही ज्योतिष्यांना भान नाही. सूर्य हा तारा आहे. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. राहू व केतु हे चंद्राची भ्रमणपातळी आणि पृथ्वीची भ्रमणपातळी यांच्यामध्ये सुमारे साडेपाच अंशाचा कोन असल्याने ते दोन भ्रमणमार्ग जिथे छेदतात ते छेदनबिंदू आहेत. त्यांना आपण शास्त्रीय परिभाषेत शरदसंपात आणि वसंतसंपात बिंदू म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहातो, तिला ह्या कुंडलीत स्थानच नाही. लाखो किलोमीटर अंतरावरील हे ग्रहतारे जर मानवावर, त्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात तर तो माणूस ज्या पृथ्वीवर जन्मला त्याच्या भोवतालची परिस्थिती काहीच परिणाम करू शकत नाही? ह्याला कुंडलीतील फोलपणा म्हणावा नाही तर काय? उलट एका अर्थाने ह्या पृथ्वीवरील ज्या प्रदेशात तो जन्मला तो प्रदेश, त्याचा परिसर, तेथील राजकीय परिस्थिती, तेथील समाजकारण हे सर्व खऱ्या अर्थाने त्यांच्या भविष्यावर परिणाम करणारे घटक असतात. म्हणजे एका अर्थाने कुंडलीतील लहानशा चौकटीत कोंडून बिचाऱ्या ह्या ग्रहताऱ्यांवर आपण उगीचच अन्याय करीत असतो.

आकाशातील ग्रहताऱ्यांचा व त्यांच्या परिभ्रमणाचा मानवी जीवनावर बरावाईट परिणाम होतो, पण किती? अगदीच नगण्य. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रांना भरती-ओहोटी येते, म्हणून मणासावरही ग्रहांचा परिणाम होतो, असा त्यांचा दावा असतो. वरवर पाहता ते जरी खरे दिसत असले तरी, बारकाव्याने विचार केल्यावर तो युक्तिवाद फसवा आहे हे लक्षात येते. कारण गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वास्तुमानाशी निगडीत असते आणि ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. एक साधा प्रश्न विचारा की, बशीतल्या पाण्याला भरती-ओहोटी आलेली दिसते का? याचा अर्थ ती डोळ्यांनी दिसत नसली तरी नगण्य असते. त्याचप्रमाणे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे वस्तुमान ग्रहाताऱ्यांपेक्षा बशीतल्या पाण्यासारखे नगण्यच असणार. मग एवढ्या दूर अंतरावरचे ग्रह कणाऐवढ्या लहान माणसावर परिणाम करतात हे मानणे हास्यास्पद नाही काय?तसेच तो एकाच वेळी जन्मलेल्या एकाच अक्षांशावर जन्मलेल्या अथवा एकाच दवाखान्यात एकाच क्षणी जन्मलेल्या बालकांवर सारखाच व्हायला हवा. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचे भविष्य वेगवेगळे घडलेले दिसते. जसे सूर्यचंद्राचा पृथ्वीवरील होणाऱ्या भरती ओहोटीवर एकसारखाच परिणाम सर्वत्र दिसतो तसेच मानवाच्या बाबतीतही आणि प्राण्यांच्या बाबतीतही सर्वत्र एकसारखेच घडायला हवे. पण तसे घडताना दिसत नाही. दुसरे म्हणजे ग्राहताऱ्यांचा परिणाम होत असेल तर तो सगळ्याच ग्रहताऱ्यांचा व्हायला हवा. कुंडलीतील मर्यादित चौकटीत मनःपूतपणे कोंबून बसवलेल्या मूठभर ग्रहांचाच का होतो? ह्या अट्टाहासाला काय म्हणावे बरे?

जन्म कुंडलीत किंवा राशीचक्र मांडण्याविषयी जी ज्योतिषविषयक पायाभूत गृहीतके आहेत त्यात प्रचंड अज्ञान सामावलेले दिसते. ग्रहांची स्थिती जशी विशिष्ट वेळी दिसते तशी ती नसते. कारण ग्रहांचे मानवी दृष्टीला होणारे ज्ञान हे त्या ग्रहाच्या अंतरानुरूप बदलत असते. सूर्य दिसायला सुमारे सव्वाआठ मिनिटांचा कालावधी लागतो, तर शनी दिसायला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे आपण पहातो ते एकप्रकारे शिळे आकाश असते. त्यामुळे ग्रहस्थिती हाच मुळात भ्रम आहे. कारण तेवढ्या काळात गुरू, शनि आदी ग्रहांची जागाही बदललेली असते.

दुसरे असे की, काही ग्रह हे विशिष्ट स्थानी उच्चीचे आणि निचीचे मानले जातात. उदा. रवि सिंहाचा स्वामी आहे पण तो मेषेत उच्चीचा तर तुळेतील दहाव्या अंशात निचीचा मानला जातो. ह्या उच्च-नीच राशी आणि त्यांचे स्वभाव ठरविले कोणी आणि कोणत्या नियमांनी? ग्रहांच्या पार्श्वभागी असणारी रास त्याचे सबलत्व काढून त्याला जर दुर्बल बनवू शकते तर ग्रहांपेक्षा राशीच परिणामकारक ठरू शकत नाहीत काय? मग कुंडलीतील ग्रहस्थानांना कोणता अर्थ उरला?

पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सहा महिने दिवस व सहा महिने रात्र अशा दिनमानात दिवस काढावे लागतात. आणि वर्षातून काही काळ तर तेथे आकाशस्थ ग्रहज्योती दिसतच नाहीत. उत्तरधुवावर दक्षिण गोलार्धातील वा विषयवृत्तावरील ग्रहतारे दिसूच शकत नाहीत. मग कोणत्या परिणाम ह्या माणसांवर होतो? कारण त्या माणसांच्या कुंडल्याच ह्या ज्योतिषातील नवग्रहांशिवाय तयार होऊच शकणार नाहीत. की त्यांना जन्मकुंडल्यांची गरज नाही? याचा अर्थ त्यांना भविष्यच नाही काय?

निसर्गनियमानुसार तीच ती ग्रहस्थिती विशिष्ट कालावधीत नियमितपणे पुनःपुन्हा येत असते. तर मग महान व्यक्तीच्या बाबतीत जन्मतिथी आणि जन्मवेळेची वारंवारता का आढळत नाही? महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध, कबीर यांसारख्या महात्म्यांच्या जन्मवेळी असणारी ग्रहस्थिती जेव्हा कधी येईल तो क्षण पकडून नेमके त्याच वेळी शस्त्रक्रिया करून शेकडो बालकांना जन्म देण्याइतपत विज्ञान पुढे गेलेले असताना, ज्योतिषमार्तंड अशा वेळा काढून जगाला कल्याणकारी ठरणाऱ्या विभूतींची पैदास करण्यासाठी का बरे सहाय्यभूत ठरत नाहीत? ह्या सत्कर्माबद्दल त्यांना सारे जग दुवा देणार नाही काय? त्यांच्या आयुष्यभराची कायमची ददात मिटेल.

पण आपले ज्योतिषी बसले आहेत मंगळ आणि शनीच्या राशीवर! बिच्चारे!! मंगळ आणि शनीविषयीची शास्त्रीय माहिती यांच्या गावीही नसते. तांबूस रंगाचा दिसणारा मंगळ हा किती विलोभनीय दिसतो! शनीची कडी कधीतरी तुम्ही दुर्बिणीतून पाहिली आहेत काय? हा त्या बिचाऱ्या शनीच्या मागे ह्या ज्योतिषांनीच साडेसाती लावली आहे. मंगळ आणि शनी तर निमूटपणे सूर्याभोवती परिभ्रमण करताहेत. पण आपण मात्र त्यांना अस्पृश्य आणि दलीत करून टाकले आहे... आपल्या कुंडलीत! ह्या वेडगळपणाला काय म्हणावे? या ना त्या ग्रहाचा खडा अंगठीच्या कोंदणात बसवून आपण या अफाट मोठया प्रहांना लगाम घालू शकतो अशी समजूत फक्त बुद्धी गहाण टाकलेली माणसेच करून घेऊ शकतात. ह्या खड्यातून धन होते ते फक्त सोनारांची आणि ज्योतिषमार्तंडांची!

स्वतःच्या अपयशाबद्दल स्वतःखेरीज दुसऱ्या कुणाला तरी जबाबदार धरणे हे सर्वांनाच सोयीचे असते. म्हणूनच ग्रहांना वेठीला घरणे पोटार्थी ज्योतिष्यांना भावते. गूढ चिन्हे, आकडेमोड व अगम्य खाणाखुणा करून विद्वतेचा आव आणत हे सगळे ज्योतिषी एकजात संदिग्ध आणि मोघम भाषा वापरत असतात. आता हेच पाहा ना, पृथ्वीवर दररोज अनेक उत्पात घडत असतात. त्यामुळे त्यांचा भविष्यकथन कुठे ना कुठे तरी ते लागू पडणारचं असतं. त्यासाठी धूमकेतू आणि ग्रहणाची काय आवश्यकता आहे? थोडासा लोकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास झाला की झालं. पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी जेव्हा ज्योतिषाचे दुकान उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूला काही शंका विचारल्या. त्यावेळेस त्या गुरूने जोशींबुवांना गुरुमंत्र दिला की, 'तुम्ही ग्रंथाद्वारे सांगायला गेलात की मेलात. इथे कामी येतं ते शब्दजंजाळच! समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आणि भविष्य सांगायचं... तेही बरंच सांगायचं आणि त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. अहो, हा धंदा आहे... यात वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके तुमचे भविष्य बरोबर.' यावरून काय ते समजा. एकंदरीत काय तर ज्योतिषशास्त्र हे अनुमान लावण्याचे शास्त्र आहे. दहा प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तरे द्यायची झाल्यास एकाही प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण जसे सगळी उत्तरे होय किंवा नाही अशा प्रकारे लिहितो, मग त्यातील कधी सात बरोबर येतील, तर कधी पाच, तर कधी तीनच, असं आहे ज्योतिषशास्त्राचं.

आज स्वातंत्र्य मिळवून 74वर्ष झाली तरी शालाबाह्य मुलांची संख्या पाहता भारतीयांच्या हातावर शिक्षणाची रेषा मोठ्याप्रमाणात उमटलेलीच नाही. जपानमध्ये ६ ऑगस्ट १९४६ साली हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून एका क्षणात लाखो लोक जळून खाक झाले. ह्या सर्वांच्या कुंडल्यांतील ग्रहयोग काय एकच होते? दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि चीनमध्ये शिक्षणाचा आणि सुबत्तेचा प्रसार झाला याचे कारण काय तेथील प्रत्येकाच्या हातावर शिक्षण आणि धनरेषा होत्या म्हणून? की आपल्याच देशातील सगळ्यांची ग्रहदशा विपरीत आहे म्हणून आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे? हे कोणत्या तर्काच्या आधारावर पटावं?

आजपर्यंत ज्योतिषाला वैज्ञानिक निकष लावण्याचे प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केलेत. ज्योतिष्यांनी केलेले दावे खरे ठरतात का ते पाहाण्याचे परिश्रमही वैज्ञानिकांनी घेतले आहेत. पण वैज्ञानिक विषयाला लागणारा पाया, या विषयाला म्हणजे ज्योतिषाला लाभलेला नाही हेच चिकित्सेअंती सिद्ध झाले आहे. 1974 साली 192 शास्त्रज्ञांच्या सही सकट - ज्यात काही नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञही होते - एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात फलज्योतिषावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून टीका केली होती. शेवटी असे म्हटले होते की, ज्योतिष हे शास्त्र नाही.

या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, भविष्य हे माणसांच्या प्रयत्नांच्या कसोटीवर घडवता येते. ज्योतिषांच्या ग्रहशांती मुळे नव्हे. त्यासाठी गरज असते ती आत्मनिग्रहाची, चिकित्सेची आणि जिद्दीची. फलज्योतिष मात्र कमकुवत मनाला आणखी दुर्बल करते, भ्याड बनवते, तात्पुरते समाधान दिलेच तरी ते फसवे असते. म्हणून शहाण्या माणसांनी ज्योतिषांच्या नादी लागून स्वतःला भविष्याच्या गर्तेत लोटून देवू नये, हेच खरे. प्रयत्नांची आणि कष्टांची कास धरली तरच आजची परिस्थिती बदलू शकेल यावर विश्वास असणे जास्त महत्त्वाचे आहे. तेच आपल्या भविष्याला खरे आकार देणारे असते.

No comments: