संघ स्वयंसेवक घडण्याची प्रक्रिया–जगदीश काबरे (jetjagdish@gmail.com)
1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, हे आपण सगळे जाणतोच. संघ स्थापना मुख्यत्वेकरून जगाला दाखवण्यासाठी हिंदूंच्या संरक्षणासाठी होती. पण अंतस्थ हेतू होता ब्राह्मणी वृत्तीचे संरक्षण करणे! टिळक युगाच्या अंतानंतर गांधीयुग अवतरले आणि मूठभर ब्राह्मणी नेत्यांच्या हातातील स्वातंत्र्य लढा बहुजनांच्या हातात गेला. त्यामुळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी... टिकून राहण्यासाठी अखेरची धडपड म्हणून संघाच्या स्थापनेची त्यांना गरज वाटली. पण लोकांना सांगताना मात्र 'ही सांस्कृतिक संघटना समस्त हिंदूंच्या आणि हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे असे सांगितले गेले. याचा अर्थ संघ हा जन्मापासूनच दुटप्पी राहिलेला आहे. म्हणून संघामध्ये कार्यकर्ते कसे घडवले जातात हे समजून घेणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. कार्यकर्ते बनविण्याची फॅक्टरी म्हणजे संघाची शाखा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गावोगावी शाखांची निर्मिती करणे आणि ती शाखा कशी टिकेल याची तरतूद करणे हे संघ प्रचारकांचे मुख्य उद्दिष्ट असते. लहान मुलांना खेळाच्या निमित्ताने एकत्र बोलाविले जाते. त्यांच्या मेंदूत बालपणापासूनच देशभक्तीच्या नावाखाली धर्मांधता, कट्टरता व इतर धर्मियांचा द्वेष भरला जातो. ह्या बालकाच्या आई-वडीलांना आध्यात्म, आपली महान संस्कृती, संस्कारांच्या नावाखाली गोड बोलून फसवले जाते. परंतु आपला मुलगा शाखेत जाऊन काय शिकतो याकडे कुणीच लक्ष देताना दिसत नाही. *शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हेसुद्धा संघ प्रचारकच ठरवतात. आपल्या विरोधी विचारांची पुस्तके स्वयंसेवकांनी वाचू नये व त्यांना दुसरी बाजू कधीच कळू नये, याकरिता संघ प्रचारक प्रचंड मेहनत घेत असतात. आपल्याच विचारांची पुस्तके स्वयंसेवकांना मोफत वाचायला दिली जातात. त्या स्वयंसेवकाने दुसरे काहीही वाचण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याची कृती संघस्थानावर 'अब्रह्मण्यम्' म्हणून संबोधली जाते.* समाजामध्ये वावरताना संघ स्वयंसेवकाने संघाला अपेक्षितच वागावे-बोलावे अशीच त्याच्या बुद्धीची जडणघडण केली जाते. स्वयंसेवकांचा विवेक जागृत होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
चतुरस्त्र बुद्धीचा माणूस त्यांची ही वैचारिक गुलाम करण्याची मानसिकता कधीही स्वीकारणे शक्य नाही. कारण ते स्वयंसेवकांच्या अवघ्या विचारशक्तीवरचा घाला घालत असतात. एकाच ठराविक पठडीतले वाचन स्वयंसेवकाने केले तर त्याच्या विचारांची दिशा (कसली बोडक्याची दिशा!) स्पष्टपणे ठरत जाते. संघाला हवे असलेले विचारच तो समाजामध्ये बोलताना, वागताना प्रकट करेल याची त्यांना शाश्वती असते. अन्य विचारांचे वाचन त्या स्वयंसेवकाने केले तर त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतील असेच संघवाल्यांना वाटत असते. म्हणूनच ते एकमेकांना संघविचारांचीच पुस्तके मोफत वाचू देण्यास तत्पर असतात, तसे ते करतातही. मात्र अन्य साहित्याचे वाचन त्या स्वयंसेवकाने केले तर त्याच्या विचाराला धुमारे फुटण्याचा संभव असतो. तो स्वयंसेवक आपल्या नेत्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो, हा धोका संघवाल्यांना अजिबात नजरेआड करायचा नसतो. म्हणूनच ते शक्यतो त्या स्वयंसेवकाचा विवेक जागृत होणार नाही याची कसोशीने काळजी घेत असतात.
संघात बौद्धिक स्वातंत्र्याला थारा नसतो. मात्र असे बंड करून कोणी उठू नये म्हणून त्याची काळजी तो स्वयंसेवक शाखेत आल्या दिवसापासून ते घेत असतात. संघाची होणारी वेगवेगळी शिबिरे यातून ठराविक छापाची बौद्धिके सक्तीने आणि अर्थातच शिस्तीने सर्व स्वयंसेवकांना ऐकावीच लागतात. जोशपूर्ण समूह-संमोहनाचा तो उत्तम प्रयोग प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी मोठ्या चातुर्याने खेळला जातो. तो स्वयंसेवक मग त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, बोलू लागतो आणि काही स्वयंसेवक तर लिहूही लागतात. जे बोलू लागतात त्यांना संघाचे व्यासपीठ असते, जे लिहू लागतात त्यांना संघाची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके तिन्हीत्रिकाळ उपलब्ध असतात आणि त्याचेच पुनःपुन्हा चविष्टपणे वाचन केले जाते. अशा वाचनातून आणि केल्या जाणाऱ्या चिंतनातून तो स्वयंसेवक भट्टीतून काढल्या जाणाऱ्या विटेसारखा चांगला भाजला जातो आणि तो एकदा का पक्का झाला की, मग त्याला कितीही खरे सांगा, तो थंडपणे तुमचे सत्य हाणून पाडतो. त्याची बोलण्याची धाटणी बेमालूमपणे हिटलरी छापाची होते. त्याच्या विचारांचे स्वरूपही मग अनायासे हिंसक बनत जाते. संघस्थानावर आणि शिबिराच्या ठिकाणी मिरवली जाणारी लाठी ऊर्फ त्यांचा तो सुप्रसिद्ध 'दंड' जणू राजदंडाचे स्वरूप घेऊ लागतो. मात्र त्यांची बौद्धिक दिवाळखोरी त्यांनी केव्हाच जाहीर केलेली असते.
अगदी बालपणापासून 'हिंदू' बालक आपल्या शाखेत येऊ लागला की, गप्पागोष्टी आणि खेळाच्या माध्यमातून त्याला आपलेसे करायचे, आणि त्याला 'आपण काहीतरी पवित्र कार्य करतोय' असा भ्रम दाखवून 'भगव्या झेंड्याला' सलाम ठोकायला लावायचे. असा बालक किशोरावस्थेपर्यंत पोहोचतो, तरीही त्याचे संघात जाणे चालूच राहते. तो पुढे तरुण झाला की, शक्यतो संघाच्याच माध्यमातून तयार केली गेलेली पुस्तके त्याने वाचलेली असल्यामुळे त्याला सहजगत्या मुस्लीम आणि ख्रिश्चनांविरुद्ध भडकावता येते. परिणामी अन्य चिकित्सक साहित्याचे वाचन करायला त्याचे मन धजावत नाही. त्याचा तोच ध्यास त्याच्या मनात ठाण मांडून बसतो. एकच एक जोश– 'हिंदूंचे संघटन.' या जिद्दीने आसुसलेला तरुण विज्ञानाचा विद्यार्थी असला तरीही आपल्या पुराणांची चिकित्सा करायला बिलकूल तयार होत नाही. तो कायमचा अर्धकच्चा राहतो. त्याची मानसिक वाढ खुंटल्यामुळे तो एकांगी विचार करू लागतो. 'हिंदूंवर अन्याय होतोय', 'अल्पसंख्यांकांचे लाड होताहेत', 'आर्थिक निकषाच्या आधारे सवलती द्यायला हव्यात' अशी गोंडस हाळी तो द्यायला लागतो तेव्हाच खरा तो 'शुद्ध संघोटा' बनतो. थोडक्यात काय तर, संघाने तरुणांच्या तारुण्याचे लोणचे घालण्याचा कारखाना उघडला आहे. म्हणून संघाने तरुण माणसे कुजवली हे म्हणणे एकाअर्थी खरे आहे. काही तरुणांना संघ अगदीच बेचव वाटू लागला तर असा तरुण वर्ग संघातून फुटून जाऊ नये आणि फुटला तरी तो आपल्याच कह्यात राहावा यासाठी संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था उभारल्या गेल्या.
राजकारणाशी आमचा काही संबंध नाही' असे म्हणणारे संघोटे राजकारणावाचून जगू शकत नाहीत, ही त्यांची फार मोठी शोकांतिका आहे. तरीही ते तसे का म्हणतात याचे कारण समजणे सोपे आहे. आपला राजकारणाशी उघड संबंध आहे असे जर संघाने मान्य केले तर जी कच्चीबच्ची पोरे संघाच्या शाखेवर नित्यनेमाने जातात त्यांचे पालक त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करतील आणि संघाचा जो मजबूत पाया 'शाखा' तोच ढासळला आईल. म्हणूनच संघ उघडपणे 'आम्हाला राजकारण करायचे नाही' असे सांगतो. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, असे सांगतो. पण ज्यांना राजकारणाची आवड असते ती माणसे 'भाजप'मध्ये सामील होतात. ज्यांना विद्यार्थ्यांमध्ये काम करावयाचे आहे ते 'अभाविप'मध्ये जातात. ज्यांना कामगारवर्गात काम करून कम्युनिस्टांची कामगारवर्गावरची पकड ढिली करावयाची आहे त्या व्यक्ती 'भारतीय मजदूर संघात' सामील होतात. ज्यांना सेवाभावी व्हावेसे वाटते त्या व्यक्ती 'वनवासी कल्याण आश्रमा'त निष्ठेने काम करतात. परंतु ज्यांना काहीच करावयाचे नाही अशा व्यक्ती मात्र संघाच्या पेटीत गुरुदक्षिणा टाकून मोकळ्या होतात आणि वर्षानुवर्षे संघाच्या शाखेवर 'दक्ष-आरम्'चा निरुपद्रवी एकसुरी खेळ खेळत राहतात.
*संघात बौद्धिक स्वातंत्र्याला आणि चिकित्सेला थारा नाही. संघाच्या वेगवेगळ्या शिबिरातून एका ठराविक पद्धतीची व्याख्याने (बौद्धिके) सक्तीने स्वयंसेवकांना ऐकविली जातात. समूह संमोहनाचाच तो एक प्रकार असतो.* संघाने ज्यांना महापुरुष मानलं आहे त्यांच्याबद्दल अतिशय सकारात्मक विचारांचा मारा या बौद्धिकांमधून त्यांच्या मेंदूवर केला जातो, आणि संघाने ज्यांना शत्रू मानले आहे त्यांच्याविषयी स्वयंसेवकांच्या मनात प्रचंड विखार निर्माण होईल असा संस्कार रुजवला जातो. स्वयंसेवक मग संघाचीच भाषा बोलू लागतो, त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, वागू लागतो. या सर्व प्रक्रियेतून स्वयंसेवक अधिकाधिक कट्टर बनत जातो, कारण संघाच्या विरोधी विचाराची बाजू किंवा ज्याला विवेकाची बाजू म्हणता येईल ती दुसरी बाजू कधी त्यांना बघूच दिली जात नाही. त्यामुळे संघाचा विरोधी म्हणजे आपल्या देशाचा आणि धर्माचा विरोधी असाच ह्या स्वयंसेवकांचा ठाम समज होतो.
संघाचे स्वयंसेवक कितीही उच्चशिक्षित असोत परंतु शिक्षणामुळे त्यांच्यात पेरलेली 'धर्मांधता' संघ किंचितही कमी होऊ देत नाही. *संघ प्रतिगामी आहेच, पण सर्व उच्चशिक्षितांची बुद्धी त्यांनी आपल्या विचारांच्या प्रचार-प्रसाराकरिता आणि आपल्या पुराणमतवादाचे-संस्कृतीचे गोडवे गाण्याकरिता व आपल्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराकरिता कामात आणली आहे. सुशिक्षित हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढण्याकरिता हे त्यांचे डावपेच असतात.* देशात अनेक ठिकाणी जेव्हा दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीयांवर हल्ले होतात तेव्हा संघाचा 'हिंदुत्ववाद' कधीही वर उफाळून येताना दिसत नाही. त्यावेळी त्यांचा हिंदू धर्म खतऱ्यात येत नाही. *कुठल्याही घटनेवर जरी व्यक्ती हिंदू असली तरी त्या व्यक्तीची जात पाहून ह्यांचे हिंदुत्व पेटत-विझत असते.*
संघाची कोणी चिकित्सा करू लागले तर त्याला हे स्वयंसेवक सुचवतात की, 'एकदा शाखेत या. काही दिवस शाखेत राहा, बघा आणि मग टीका करा.' त्यांचे असे बरळणे खरे तर हास्यास्पद असते. कारण चिकित्सेला तात्विक, तार्किक, वैचारिक प्रत्युत्तर देता न आल्यामुळे 'शाखेवर या, म्हणजे सारे समजेल.' असे मोघम बोलले जाते. पण त्यावर जर असा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमानांचा द्वेष वाढवण्यासाठी मुसलमानी धर्माची चिकित्सा करता तेव्हा तुम्हाला मुसलमानांनी सांगितले की, 'तुम्ही आधी मुसलमान व्हा आणि मग आमच्या धर्माची चिकित्सा करा', तर चालेल काय? थोडक्यात काय तर दारूवर टीका करण्याआधी हे स्वयंसेवक म्हणतील, 'आधी दारू पिऊन बघा, मग टीका करा.' संघाचे उद्दिष्ट एकचालकानेतृत्व असल्यामुळे 'आम्ही आदेश द्यायचा आणि स्वयंसेवकांनी कुठलाही चांगला-वाईट विचार न करता तो पाळायचा', ही संघाची समानता! याचप्रकारे कार्य करतील असे मेंदू तयार करण्याची प्रक्रिया संघात गेली ९७ वर्षे सुरू आहे.
हिंदूधर्माचे रक्षण म्हणजे चातुर्वर्ण्याचे रक्षण, ही गोष्ट या एकांगी वाचन करणाऱ्या तरुणांच्या लक्षात कधीही येत नाही. आणि म्हणूनच जो जो संघविरोधी तो तो हिंदूंविरोधी हा त्याचा लाडका सिद्धांत बनतो. शिवाय संघकार्य हे धर्मकार्य आहे असे समजण्यात येत असल्यामुळे अशी तरुण मंडळी मग 'बंदिस्त कोठडीत' जगायला सुरुवात करतात. त्याच त्याच पठडीत केले गेलेले वाचन त्यांना पूर्णपणे संमोहित करते आणि मग असला 'दिव्य तरुण' 'नवा भारत... हिंदुराष्ट्र' उभारण्याचे स्वप्न दिव्यदृष्टीने बघू लागतो. अशाप्रकारे संघाच्या मुशीतून घडलेला हा तरुण मग पुढे सतीप्रथेचे निर्लज्ज समर्थन करू लागतो. हिंदू स्त्रियांनी चार चार मुले जन्माला घालावीत असे अभिमानाने बोलू लागतो, फुले-आंबेडकरांचे नाव काढले की अशा संघोट्यांचे डोके ठणकू लागते.
एकंदरीत काय तर संघाचे लोक भलेही पावित्र्याच्या, साधनशुचितेच्या कितीही गप्पा मारोत, तसे ते नाहीत हेही लोकांना आता कळू लागले आहे. या विवेचनावरून आता तुमच्या लक्षात आले असेलच की संघात गेलेल्या लहान बालकाची स्वयंसेवक म्हणून जडणघडण स्वत:चे डोके न वापरता आज्ञा पालन करणाऱ्या आणि प्रश्न न विचारणाऱ्या एक यंत्रमानव होण्याच्या पद्धतीने केली जाते ते...
No comments:
Post a Comment