Thursday, December 19, 2024

वैज्ञानिक दृष्टिकोन हाच जगण्याचा पाया असायला हवा.

वैज्ञानिक दृष्टिकोन हाच जगण्याचा पाया असायला हवा. – जेट जगदीश

निरीक्षण, तर्क, कारणमीमांसा, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!

डॉ. जयंत नारळीकरांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’ ची सविस्तर व्याख्या केलेली आहे, ती अशी... ‘वैज्ञानिक दृष्टिकोन ही शारीरिक व मानसिक अवस्था होय की, ज्याद्वारे योग्य कृतीला दिशा मिळून जीवन जगण्याच्या पध्दती सुलभ होतील. मानवी प्रगतीच्या मार्गातील लहानमोठे अडथळे दूर करण्याचा तो एक शास्त्रशुध्द विचार आहे. सजीव, घटना, पध्दती या सर्वांबद्दल केलेली विधाने सत्य की असत्य योग्य वा अयोग्य हे निरीक्षण करून अनुभवाद्वारे चिकित्सक बुध्दिने त्याची कारणमिमांसा करूनच मान्य अगर ग्राह्य धरायची, अन्यथा नाही आणि या विशिष्ट दिशेने प्रेरित होऊनच कार्यरत राहण्याची कष्टसाध्य साधना यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात.’

एवंच वैज्ञानिक दृष्टीकोन माणसाला विवेकी बनवते. असा माणूस कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला तयार असतो. लोकांशी सौहार्दाने वागायला देवाधर्माची गरज त्याला लागत नाही. कारण विवेकामुळे ऋजुता हा त्याचा स्थायीभाव बनतो. तसेच तो प्रत्येक गोष्टीचा साधकबाधक विचार करून मगच निर्णय घेतो, त्याचबरोबर त्याचे होणारे परिणाम स्वीकारायलाही तयार असतो. अपयश आले तर परखड आत्मपरीक्षण करून स्वतःच्या चुका दुरुस्त करतो. थोडक्यात चुका स्वीकारायला घाबरत नाही. परिणामी तो स्वतःची प्रगती तर साधतोच पण त्याच वेळेस समाजालाही आपल्या विचारांनी प्रगतीपथावर नेतो. एकदा का वैज्ञानिक दृष्टीकोनाने माणूस जगायला लागला की, एवढे बदल त्याच्यात घडतात.

म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली माणसे विवेकवादी असतात, त्यामुळे ती सदाचारी असतातच. पण एक लक्षात घ्यायला हवे की, नैतिकता, सदाचार ह्या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत. कारण भारतात जी नैतिकता समजली जाते असेल ती अमेरिकेत असेलच असे नाही. एवढेच कशाला चोरांच्या दोन टोळ्या एकमेकांशी प्रामाणिक असतात म्हणजे त्या आपसात नैतिकता पाळतात. पण तुमच्यामाझ्या दृष्टीकोनातून चोर मुळातच अनैतिक असतात. म्हणजे त्यांची नैतिकता ही आपल्यासाठी अनैतिकता झाली. ह्याचा अर्थ नैतिकता ही सापेक्ष संज्ञा झाली. विज्ञान मात्र नुसत्या पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण निसर्गात एकाच नियमाने जाणारे असते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली माणसे काळाबरोबर पावले टाकत काळाचा शोध घेणारी प्रगतीशील माणसे असतात.

तर्कशुद्ध विचार व विश्लेषण करण्याची रीत हा विज्ञानाचा गाभा आहे. कोणी व्यक्ती, ग्रंथ, विचारप्रणाली सांगते म्हणून मी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, तर जी बाब प्रयोगाने सिद्ध करता येते, जी तर्काच्या आधारावर टिकते, तीच मी स्वीकारेन हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांमध्ये रुजविणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे, असे भारतीय संविधानाचा अनुच्छेद ५१क आपल्याला सांगतो. एकविसाव्या शतकातही आपल्या देशात देवदासीसारख्या परंपरा टिकून आहेत. जात्याभिमानाच्या किंवा चेटूक केल्याच्या विकृत कल्पनांमधून येथे हत्या, नरबळीच्या घटना घडतात. ग्रहण, मासिक पाळी यांसारख्या नैसर्गिक घटनांबद्दल सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या मनात आजही जुनाट कल्पना ठाण मांडून आहेत.  या सर्व बाबी आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नसल्याच्याच द्योतक नव्हेत काय?

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले. संशोधन, नवी ज्ञाननिर्मिती यांचा वेग आधी मंदावला, नंतर थंडावला. हे वास्तव आपण मान्य केले तर आपण वृथाभिमानाच्या सापळ्यात सापडणार नाही. त्यासाठीही वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला मदत करील.

वैज्ञानिक पद्धत पूर्वग्रहरहित असते, पण वैज्ञानिक हा हाडामांसाचा माणूस असल्यामुळे तो पूर्वग्रहदूषित असू शकतो, त्याला प्रलोभने भुलवू शकतात, स्वार्थ तर्कदुष्टतेकडे नेऊ  शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. विज्ञानाचा विकास हा वैचारिक खुलेपणाच्या अवकाशात व विवेकाच्या चौकटीत होत असतो. त्याचा गाभा मानवकेंद्रित व सर्वजनहित हा आहे, हे भान राखले तरच आपली वाटचाल अंधश्रध्देकडून विज्ञानाकडे होऊ शकेल.

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी आवश्यक काय? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढायला हवा असे वाटत असेल तर –
1. विज्ञान ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ हे निषिद्ध मानते.
2. विज्ञानात अंतिम सत्य नसते, पण त्याचाच शोध सतत चालू असतो.
3. प्रत्येक शोध लागेपर्यंत विज्ञान त्याचा उलगडा करते, तेवढेच ते सत्य, तेवढ्यापुरतेच सत्य. त्या पुढचा शोध लागला की सत्य बदलते. शोधाचे महत्त्व कमी होत नाही पण विज्ञान उलगडण्याचा एक टप्पा पुढे जातो.
4. एखादी घटना वैयक्तिक असली तरी तिचा सार्वत्रिक पडताळा घेता येत असेल तरच विज्ञान ते सत्य मानते.
5. चिकित्सक डोळस प्रमाणित rational  दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.
6. कुटुंब व्यवस्था – जिथे घरातल्या सर्वांचा विचार करीत नाहीत, कोणातरी वडीलधार्‍याच्या हुकुमाप्रमाणे कौटुंबिक व्यवस्था चालते, तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस पोषक रचना नाही.
7. समाज रचना – समाजरचना खुली हवी – एकमेकांच्या मतांचा आदर करणारी हवी.
8. आर्थिक स्थिती – समाजाची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तर, जीवनावश्यक सर्व गरजा भागत असतील तरच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस पोषक वातावरणाची निर्मिती समाजात होते.

थोडक्यात काय तर...
1. वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्घिक स्वीकार असतो. 
2. असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. 
3. वैज्ञानिक दृष्टिकोनाला कोणताही विषय आदरणीय किंवा पूज्य वाटत नसून ते वास्तव आहे तसे स्वीकारण्याला तो प्राधान्य देतो.
4. वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाला नैतिक वागण्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायला आणि आपण कुठे चुकलो याचे परखड आत्मपरीक्षण करायला शिकवतो.
5. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन नशीब, प्राक्तन, पूर्वजन्मीचे भोग अशा पळवाटा शोधत नाही.

ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?


ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?
– जगदीश काबरे.

प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गुढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना .... समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलीतगात्र... भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तत्कालीक हितसंबंधाच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामूनच आणलेलं असतं? तसं असेल तर असे हितसंबंध जोपासण्यात काय हशील आहे? कारण ह्या हितसंबंधातून वैयक्तिक आयुष्य जरी भरभराटीला येत असले तरी त्यामुळे संपूर्ण समाजाचं किती नुकसान होत असतं! परिणामी मानवाच्या प्रगतीलाच खीळ बसत असते, हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला हवं.

फलज्योतिषासंबंधी विचार करतांना हा मुद्दा प्रकर्षाने जाणवत राहतो. भविष्याबद्दलचे कुतूहल समजू शकते. पण त्यासाठी निसर्गातील ग्राहगोलांना वेठीस धरणं समजू शकत नाही. भविष्यकाळ उज्वल व्हावा म्हणून प्रयत्न केलेले समजू शकतात. पण त्या प्रयत्नांच्या जोडीला नशीब, देव-देव यांचा आधार घ्यावा लागणं; हे समजू शकत नाही. विचारांची पायवाट काढायची असली तरी ती अखेर फलदायी ठरणारी असते, हे आपल्याला कळतं. पण त्याच वेळेस कष्टांना घाबरून भावनाशीलतेच्या आहारी जात ज्योतिषांच्या हातातलं बाहूलं बनणं समजू शकत नाही. या विसंगतीपूर्ण वागण्यामागची कारणं निव्वळ भविष्याविषयीची अनाकलनीयता असते की, आत्मविश्वासाचा अभाव? आपण एकाच वेळेस 'आपला हात जगन्नाथ' म्हणत 'प्रयत्नांती रगडीता वाळूचे कण त्यातून तेलही गळे' असा प्रयत्नवादाचा जयघोष करत असतो, तर त्याचवेळेस दुसरं मन मात्र आपला हात ज्योतिष मार्तडांच्या हातात देवून भाग्य उजळण्याची पळवाट शोधत असतं. ह्याचं एक कारण असंही असू शकेल की, माणसाचं मन विचारांपेक्षा भावनेच्या आहारी सहज आधीन होतं. कारण भावनाशीलता ही माणसाला आभासी का होईना पण तात्काळ चिंतामुक्त करते. मनाला हवी तशी उत्तरं शोधते. तर बुद्धीनिष्ठता मनाला सतत बोचणी लावत असते. सतत विचार करायला प्रवृत्त करते. स्वाभाविकच मानवी मन हे सोयीच्या भावनांना बळी पडतं. आणि हे बळी पडणंच माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देतं. मन कमकुवत करतं. हळूहळू अशी वेळ येते की, माणूस विचार करणंच टाळायला लागतो. विचार करणं म्हणजे डोक्याला नसती कटकट वाटायला लागते. परिणामी एवढ्यातेवढ्या गोष्टींना मानवी मन घाबरू लागते. मग प्रयत्नाची वाट चोखाळण्याऐवजी माणूस सुखाचा शॉर्टकट शोधायला धावतो आणि अंधश्रद्धेचा बळी ठरतो. बुवा-बाबांना, कर्मकांडांना, देवदेवतांना आणि ज्योतिषांना... हे चक्र त्याच्यामागे शुक्लकाष्ठासारखे मग चालूच राहाते. या चक्रात आपण पिळून निघतोय असं मात्र त्याला कधीही वाटत नाही, हे विशेष. कारण तोपर्यंत त्याच्या मनाने प्राक्तन, नशीब, दैव, भोग ह्या सर्वांचा असा घट्ट हात पकडलेला असतो की, हेच शब्द त्याला पूर्वजन्मीचे कर्म असं वाटायला लावून सगळं सहन करायला शिकवत असतात. हीच खरी माणसाच्या आयुष्याची शोकांतिका असते. गगनाला गवसणी घालण्याची विजूगिषू वृत्ती बाळगणारा माणूस दुसऱ्या बाजूनं मात्र असा गर्भगळीत झालेला, नियतीच्या हातातलं वाहूलं बनलेला दिसतो. ह्या दैवदुर्विलासाला काय म्हणावं!

एकीकडे आपला विज्ञानावर विश्वास असतो. पण त्याचबरोबर वैज्ञानिक कसोट्या न लावता काही गोष्टी आंधळेपणानं सत्य म्हणून स्वीकारण्याकडेही आपला कल असतो. ज्योतिषशास्त्राला आपले सांस्कृतिक संचित समजून आणि भृगुसंहितेला प्रमाण मानून आपण जन्मकुंडली, हस्तरेषा, ललाटरेषा यांचे वाचन करून आपला भूतकाळ व भविष्यकाळ शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा आधार खरोखरच भरभक्कम आहे का? तो शास्त्रीय कसोट्यांवर टिकणारा आहे का? की आपल्या कमकुवत मनला तात्पुरता समाधान देणारा आहे? हा विचार आपण कधी केलाय का? ह्या आधाराची जरा चिकित्सा केली तर त्यातून काय निष्पन्न होते? म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे शास्त्र असेल तर ते शास्त्रीय कसोट्यांवर का टिकत नाही?

शास्त्रीय आधार म्हणून जन्मकुंडली मांडताना ज्योतिषी अचूक जन्मवेळेचा आग्रह धरतात. आता जन्मवेळ नेमकी कोणती मानावी? मुलाचं डोकं दिसायला लागते ती वेळ? की मूल पूर्णपणे जगात प्रवेश करते ती वेळ? की ते पहिला श्वास घेऊन ट्याहॅ करते ती वेळ? की सर्वात प्रथम स्त्रीवीज आणि पुंबीजाचं मिलन होतं ती वेळ? की या मिलनानंतर ज्या क्षणी त्या पेशीमध्ये जीव निर्माण होतो ती वेळ? (या दोन्ही वेळा कुणालाही सांगता येणे कठीण!) ह्या प्रश्नांच्या उत्तराची एकवाक्यता अजूनही भल्या भल्या ज्योतिषमार्तंडामध्येही आढळत नाही. मग अशा प्रकारे तयार झालेली जन्मकुंडली ही शास्त्रीय मानायची काय?

बरे ते असो. कुंडलीतील ग्रहमानानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी होणे जर अटळ असेल तर त्या अमुक एक प्रकाराने ग्रहशांती, उपासतापास इत्यादी कर्मकांड केल्यावर त्या टळू शकतात यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? याचा अर्थ अशा अटळ घडामोडींवर ताबा मिळवण्याइतपत माणसाचा आत्मविश्वास जर आहे तर तो ह्या कर्मकांडाशिवाय का वापरू शकत नाही? माणूस जर लाखो किलोमीटर अंतरावरील ग्रहांवर आपल्या मंत्रशक्तीने आणि अनुष्ठानांनी हुकूमत चालवून त्यांना वठणीवर आणू शकतो, तर एवढा प्रबळ माणूस आज दुःखात का? गरिबीत का? असे प्रश्न पडण्याच्या ऐवजी आत्मविश्वास गमावलेला तो प्राक्तनाचा भोग, पूर्वजन्मीचे पाप म्हणत आपल्याच नशिबाला दोष देत असतो.

जरा डोळसपणे विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की, ह्यात ग्रहताऱ्यांचा काहीही दोष नाही. प्राक्तन आणि पूर्वजन्माचा तर नाहीच नाही. हया सगळ्या दुःखाचं मूळ आहे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती! त्याचाच तो परिपाक आहे. सत्ताधाऱ्यांना आणि भटाभिक्षुकांना जनसामान्यांवरील आपली पकड ढिली करायची नसते. हे जनसामान्य जर असेच दुःखात पिचत राहिले, आत्मसविश्वासहीन जगले, अंधश्रद्धेच्या गर्तेतच फिरले, कुठल्या तरी भयगंडांनी पछाडलेले असले, रोटीरोजीच्या चिंतेने ग्रस्त असले, तरच त्यांची सत्तास्थाने टिकून रहातील. त्यासाठी त्यांना देवाचा, ज्योतिषाचा बागुलबुवा उभा करणे भागच असते. जर सर्वसामान्य जनता विचार करू लागली, जागृत झाली, प्रश्नांची चिकित्सा करू लागली तर ह्यांचे चालायचे कसे? उत्पन्नाचं – तेही सहजगत्या मिळवून देणाऱ्या साधनाला एवढ्या सहजासहजी सोडायचं कसं? म्हणूनच ज्योतिष हे शास्त्र आहे असं आपल्या मनावर वर्षानुवर्षे ह्या तथाकथित विद्वानांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी ठसवलं आहे. ठेविले अनंते तैसेची रहावे। दित्ती असो यादे समाधान||' असे पढवून द्या हितसंबंधीयांनी उपासतापास, भविष्य सुखासमाधानात जावे म्हणून कर्मकांडाचे फसवे समाधान देण्याचे कार्य,  नियमितपणे इमानेइतबारे चालवले आहे, हे आता तरी आपण लक्षात घेणार आहोत काय?

फार वर्षांपूर्वी माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा त्याला आपली पृथ्वी कशी आहे? सूर्य काय आहे? चंद्र काय आहे? आकाशातील तारे म्हणजे काय? पाऊस कसा पडतो? असे अनेक प्रश्न पडत होते. त्या त्या वेळच्या त्याच्या उत्क्रांत अवस्थेप्रमाणे तो त्यांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करीत होता. ह्या उत्तरांमध्ये काळानुरूप बदलडी होत गेले. पण हे बदल सहजासहजी झालेले नाहीत. धर्माच्या, कर्मकांडाच्या नावाखाली ह्या बदलांना विरोध होत राहीलाच. पण परिस्थितीच्या आणि नवज्ञानाच्या प्रचंड रेट्यामुळे हा बदलही होतच राहिला. त्याला धर्ममार्तंडही रोखू शकले नाहीत.

म्हणूनच सुरवातीच्या काळात ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनात अर्थ प्राप्त झाला आहे, त्यांचे ऋण म्हणून, त्याच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पूजाअर्चाचा जन्म झाला. पण ह्या कृतज्ञतेचे रूपांतर कालांतराने कर्मकांडात आणि माणसाला भविष्याच्या भयगंडात टाकण्यात झाले. आज सूर्य, चंद्र, तारे आदी काय आहेत हे आपल्याला कळले नाही. पाऊस कसा पडतो तेही उमगले आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची पूजाअर्चा वा इतर कोणतेही कर्मकांड केले नाही तरी ते नियमितपणे त्यांच्या शास्त्रीय नियमानुसारस त्यांची कर्मे करीतच राहाणार आहेत. मग कुंडलीत सूर्य, चंद्र, आर्दीना स्थान देण्यात काय बरे अर्थ आहे? त्यांच्या पोटी कृतज्ञता असणे वेगळे आणि त्यांचा आधार घेऊन ज्योतिष्यांनी सामान्य माणसाला घाबरवून सोडणे वेगळे.

मूळात जन्मकुंडलीत सूर्य, चंद्र, राहू व केतू ह्यांना स्थान देऊन आणि त्यांना ग्रह मानून आपण आपले अज्ञानच प्रकट करीत असतो. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' हे आता शालेय विद्यार्थी सहज सांगू शकतात. पण फलज्योतिषात मात्र 'पृथ्वीभोवती सूर्य फिरतो' असे आजही समजतात. म्हणजे शिक्षितांना बरोबर विरुद्ध अर्थ सांगून आपण लोकांना मागास ठेवत आहोत याचेही ज्योतिष्यांना भान नाही. सूर्य हा तारा आहे. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. राहू व केतु हे चंद्राची भ्रमणपातळी आणि पृथ्वीची भ्रमणपातळी यांच्यामध्ये सुमारे साडेपाच अंशाचा कोन असल्याने ते दोन भ्रमणमार्ग जिथे छेदतात ते छेदनबिंदू आहेत. त्यांना आपण शास्त्रीय परिभाषेत शरदसंपात आणि वसंतसंपात बिंदू म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहातो, तिला ह्या कुंडलीत स्थानच नाही. लाखो किलोमीटर अंतरावरील हे ग्रहतारे जर मानवावर, त्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात तर तो माणूस ज्या पृथ्वीवर जन्मला त्याच्या भोवतालची परिस्थिती काहीच परिणाम करू शकत नाही? ह्याला कुंडलीतील फोलपणा म्हणावा नाही तर काय? उलट एका अर्थाने ह्या पृथ्वीवरील ज्या प्रदेशात तो जन्मला तो प्रदेश, त्याचा परिसर, तेथील राजकीय परिस्थिती, तेथील समाजकारण हे सर्व खऱ्या अर्थाने त्यांच्या भविष्यावर परिणाम करणारे घटक असतात. म्हणजे एका अर्थाने कुंडलीतील लहानशा चौकटीत कोंडून बिचाऱ्या ह्या ग्रहताऱ्यांवर आपण उगीचच अन्याय करीत असतो.

आकाशातील ग्रहताऱ्यांचा व त्यांच्या परिभ्रमणाचा मानवी जीवनावर बरावाईट परिणाम होतो, पण किती? अगदीच नगण्य. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रांना भरती-ओहोटी येते, म्हणून मणासावरही ग्रहांचा परिणाम होतो, असा त्यांचा दावा असतो. वरवर पाहता ते जरी खरे दिसत असले तरी, बारकाव्याने विचार केल्यावर तो युक्तिवाद फसवा आहे हे लक्षात येते. कारण गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वास्तुमानाशी निगडीत असते आणि ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. एक साधा प्रश्न विचारा की, बशीतल्या पाण्याला भरती-ओहोटी आलेली दिसते का? याचा अर्थ ती डोळ्यांनी दिसत नसली तरी नगण्य असते. त्याचप्रमाणे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे वस्तुमान ग्रहाताऱ्यांपेक्षा बशीतल्या पाण्यासारखे नगण्यच असणार. मग एवढ्या दूर अंतरावरचे ग्रह कणाऐवढ्या लहान माणसावर परिणाम करतात हे मानणे हास्यास्पद नाही काय?तसेच तो एकाच वेळी जन्मलेल्या एकाच अक्षांशावर जन्मलेल्या अथवा एकाच दवाखान्यात एकाच क्षणी जन्मलेल्या बालकांवर सारखाच व्हायला हवा. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचे भविष्य वेगवेगळे घडलेले दिसते. जसे सूर्यचंद्राचा पृथ्वीवरील होणाऱ्या भरती ओहोटीवर एकसारखाच परिणाम सर्वत्र दिसतो तसेच मानवाच्या बाबतीतही आणि प्राण्यांच्या बाबतीतही सर्वत्र एकसारखेच घडायला हवे. पण तसे घडताना दिसत नाही. दुसरे म्हणजे ग्राहताऱ्यांचा परिणाम होत असेल तर तो सगळ्याच ग्रहताऱ्यांचा व्हायला हवा. कुंडलीतील मर्यादित चौकटीत मनःपूतपणे कोंबून बसवलेल्या मूठभर ग्रहांचाच का होतो? ह्या अट्टाहासाला काय म्हणावे बरे?

जन्म कुंडलीत किंवा राशीचक्र मांडण्याविषयी जी ज्योतिषविषयक पायाभूत गृहीतके आहेत त्यात प्रचंड अज्ञान सामावलेले दिसते. ग्रहांची स्थिती जशी विशिष्ट वेळी दिसते तशी ती नसते. कारण ग्रहांचे मानवी दृष्टीला होणारे ज्ञान हे त्या ग्रहाच्या अंतरानुरूप बदलत असते. सूर्य दिसायला सुमारे सव्वाआठ मिनिटांचा कालावधी लागतो, तर शनी दिसायला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे आपण पहातो ते एकप्रकारे शिळे आकाश असते. त्यामुळे ग्रहस्थिती हाच मुळात भ्रम आहे. कारण तेवढ्या काळात गुरू, शनि आदी ग्रहांची जागाही बदललेली असते.

दुसरे असे की, काही ग्रह हे विशिष्ट स्थानी उच्चीचे आणि निचीचे मानले जातात. उदा. रवि सिंहाचा स्वामी आहे पण तो मेषेत उच्चीचा तर तुळेतील दहाव्या अंशात निचीचा मानला जातो. ह्या उच्च-नीच राशी आणि त्यांचे स्वभाव ठरविले कोणी आणि कोणत्या नियमांनी? ग्रहांच्या पार्श्वभागी असणारी रास त्याचे सबलत्व काढून त्याला जर दुर्बल बनवू शकते तर ग्रहांपेक्षा राशीच परिणामकारक ठरू शकत नाहीत काय? मग कुंडलीतील ग्रहस्थानांना कोणता अर्थ उरला?

पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सहा महिने दिवस व सहा महिने रात्र अशा दिनमानात दिवस काढावे लागतात. आणि वर्षातून काही काळ तर तेथे आकाशस्थ ग्रहज्योती दिसतच नाहीत. उत्तरधुवावर दक्षिण गोलार्धातील वा विषयवृत्तावरील ग्रहतारे दिसूच शकत नाहीत. मग कोणत्या परिणाम ह्या माणसांवर होतो? कारण त्या माणसांच्या कुंडल्याच ह्या ज्योतिषातील नवग्रहांशिवाय तयार होऊच शकणार नाहीत. की त्यांना जन्मकुंडल्यांची गरज नाही? याचा अर्थ त्यांना भविष्यच नाही काय?

निसर्गनियमानुसार तीच ती ग्रहस्थिती विशिष्ट कालावधीत नियमितपणे पुनःपुन्हा येत असते. तर मग महान व्यक्तीच्या बाबतीत जन्मतिथी आणि जन्मवेळेची वारंवारता का आढळत नाही? महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध, कबीर यांसारख्या महात्म्यांच्या जन्मवेळी असणारी ग्रहस्थिती जेव्हा कधी येईल तो क्षण पकडून नेमके त्याच वेळी शस्त्रक्रिया करून शेकडो बालकांना जन्म देण्याइतपत विज्ञान पुढे गेलेले असताना, ज्योतिषमार्तंड अशा वेळा काढून जगाला कल्याणकारी ठरणाऱ्या विभूतींची पैदास करण्यासाठी का बरे सहाय्यभूत ठरत नाहीत? ह्या सत्कर्माबद्दल त्यांना सारे जग दुवा देणार नाही काय? त्यांच्या आयुष्यभराची कायमची ददात मिटेल.

पण आपले ज्योतिषी बसले आहेत मंगळ आणि शनीच्या राशीवर! बिच्चारे!! मंगळ आणि शनीविषयीची शास्त्रीय माहिती यांच्या गावीही नसते. तांबूस रंगाचा दिसणारा मंगळ हा किती विलोभनीय दिसतो! शनीची कडी कधीतरी तुम्ही दुर्बिणीतून पाहिली आहेत काय? हा त्या बिचाऱ्या शनीच्या मागे ह्या ज्योतिषांनीच साडेसाती लावली आहे. मंगळ आणि शनी तर निमूटपणे सूर्याभोवती परिभ्रमण करताहेत. पण आपण मात्र त्यांना अस्पृश्य आणि दलीत करून टाकले आहे... आपल्या कुंडलीत! ह्या वेडगळपणाला काय म्हणावे? या ना त्या ग्रहाचा खडा अंगठीच्या कोंदणात बसवून आपण या अफाट मोठया प्रहांना लगाम घालू शकतो अशी समजूत फक्त बुद्धी गहाण टाकलेली माणसेच करून घेऊ शकतात. ह्या खड्यातून धन होते ते फक्त सोनारांची आणि ज्योतिषमार्तंडांची!

स्वतःच्या अपयशाबद्दल स्वतःखेरीज दुसऱ्या कुणाला तरी जबाबदार धरणे हे सर्वांनाच सोयीचे असते. म्हणूनच ग्रहांना वेठीला घरणे पोटार्थी ज्योतिष्यांना भावते. गूढ चिन्हे, आकडेमोड व अगम्य खाणाखुणा करून विद्वतेचा आव आणत हे सगळे ज्योतिषी एकजात संदिग्ध आणि मोघम भाषा वापरत असतात. आता हेच पाहा ना, पृथ्वीवर दररोज अनेक उत्पात घडत असतात. त्यामुळे त्यांचा भविष्यकथन कुठे ना कुठे तरी ते लागू पडणारचं असतं. त्यासाठी धूमकेतू आणि ग्रहणाची काय आवश्यकता आहे? थोडासा लोकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास झाला की झालं. पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी जेव्हा ज्योतिषाचे दुकान उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूला काही शंका विचारल्या. त्यावेळेस त्या गुरूने जोशींबुवांना गुरुमंत्र दिला की, 'तुम्ही ग्रंथाद्वारे सांगायला गेलात की मेलात. इथे कामी येतं ते शब्दजंजाळच! समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आणि भविष्य सांगायचं... तेही बरंच सांगायचं आणि त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. अहो, हा धंदा आहे... यात वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके तुमचे भविष्य बरोबर.' यावरून काय ते समजा. एकंदरीत काय तर ज्योतिषशास्त्र हे अनुमान लावण्याचे शास्त्र आहे. दहा प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तरे द्यायची झाल्यास एकाही प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण जसे सगळी उत्तरे होय किंवा नाही अशा प्रकारे लिहितो, मग त्यातील कधी सात बरोबर येतील, तर कधी पाच, तर कधी तीनच, असं आहे ज्योतिषशास्त्राचं.

आज स्वातंत्र्य मिळवून 74वर्ष झाली तरी शालाबाह्य मुलांची संख्या पाहता भारतीयांच्या हातावर शिक्षणाची रेषा मोठ्याप्रमाणात उमटलेलीच नाही. जपानमध्ये ६ ऑगस्ट १९४६ साली हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून एका क्षणात लाखो लोक जळून खाक झाले. ह्या सर्वांच्या कुंडल्यांतील ग्रहयोग काय एकच होते? दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि चीनमध्ये शिक्षणाचा आणि सुबत्तेचा प्रसार झाला याचे कारण काय तेथील प्रत्येकाच्या हातावर शिक्षण आणि धनरेषा होत्या म्हणून? की आपल्याच देशातील सगळ्यांची ग्रहदशा विपरीत आहे म्हणून आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे? हे कोणत्या तर्काच्या आधारावर पटावं?

आजपर्यंत ज्योतिषाला वैज्ञानिक निकष लावण्याचे प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केलेत. ज्योतिष्यांनी केलेले दावे खरे ठरतात का ते पाहाण्याचे परिश्रमही वैज्ञानिकांनी घेतले आहेत. पण वैज्ञानिक विषयाला लागणारा पाया, या विषयाला म्हणजे ज्योतिषाला लाभलेला नाही हेच चिकित्सेअंती सिद्ध झाले आहे. 1974 साली 192 शास्त्रज्ञांच्या सही सकट - ज्यात काही नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञही होते - एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात फलज्योतिषावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून टीका केली होती. शेवटी असे म्हटले होते की, ज्योतिष हे शास्त्र नाही.

या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, भविष्य हे माणसांच्या प्रयत्नांच्या कसोटीवर घडवता येते. ज्योतिषांच्या ग्रहशांती मुळे नव्हे. त्यासाठी गरज असते ती आत्मनिग्रहाची, चिकित्सेची आणि जिद्दीची. फलज्योतिष मात्र कमकुवत मनाला आणखी दुर्बल करते, भ्याड बनवते, तात्पुरते समाधान दिलेच तरी ते फसवे असते. म्हणून शहाण्या माणसांनी ज्योतिषांच्या नादी लागून स्वतःला भविष्याच्या गर्तेत लोटून देवू नये, हेच खरे. प्रयत्नांची आणि कष्टांची कास धरली तरच आजची परिस्थिती बदलू शकेल यावर विश्वास असणे जास्त महत्त्वाचे आहे. तेच आपल्या भविष्याला खरे आकार देणारे असते.

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य

*'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य' या शीर्षकाचा एक लेख आणि आता खोट्या माहितीने भरलेला व्हिडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियामधून पसरवला जातो आहे. त्यावर हे संदर्भासहित दिलेले उत्तर मोठ्या प्रमाणात वायरल करायला हवे.* –JK

लेखात आणि व्हिडिओत म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली.
सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो.
1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो.
2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असेलही कदाचित. पण अशा लोकांची संख्या निश्चितच शंभरच्या आतच असेल. पण लेख लिहिणारे लेखक म्हणतायत की एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता. जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे.
3) साहजिकच त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) छद्म विज्ञानाचा आधार घेत वैज्ञानिक शब्दांचे बुडबुडे फोडणाऱ्या खोट्या आहेत. त्या गोष्टी घडल्याच नाहीत.
4) सदर लेखामध्ये सांगितलेली घटना खरी असती तर लेखामध्ये समाधी उखडण्यासाठी आलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु लेखामध्ये त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
5) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते...की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून निर्माण केली. वरील बुद्दिभेदी खोटी घटना पूर्णपणे द्वेषातून आकसापोटी लिहली आहे...
6) हभप मामासाहेब दांडेकर, ज्यांचा या लेखात उल्लेख आलेला आहे त्यांचा मृत्यू जुलै 1968 रोजी झालेला आहे. मग 1972 साली हभप मामासाहेब दांडेकर यांची या प्रयोगात उपस्थिती दाखवणे हा खोटेपणाचा आणखी एक पुरावाच आहे. त्यांच्या मृत्यूच्या नोंदीचा पुरावा खालील लिंकमध्ये आहे. जिज्ञासूंनी लिंक उघडून खात्री करून घ्यावी. 
https://www.facebook.com/shrikantjoshiofficial/posts/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AC-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A5%AF-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE/710133681906593/
7)सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेला लेखकांना एकही पुरावा जोडता आला नाही. त्यांनी बातमीच्या सत्यतेसाठी एखाद्या वृत्तपत्राची बातमी तरी पुराव्यासाठी उपलब्ध करुन द्यायला हवी होती. खरं तर अशा बुद्धिभेदी कथा रचून बदनामी करणे हेच या लेखाचे उद्दिष्ट दिसत आहे.

*सरतेशेवती माहितीसाठी...*
📌महाराष्ट्र अंनिसची चतुःसूत्री...
1)शोषण, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाना विरोध करणे...
2)वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार,प्रसार आणि अंगीकार करणे...
3)धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणे...
4)समविचारी संघटनाना जोडून घेणे...
📌संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या आणि अशा सर्व संतांनीच अभंगातून आणि प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला आहे. अंनिस याच संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करते...
📌 तोडफोड करणे, विध्वंस करणे अशी अंनिसची कार्यपद्धती कधीच नव्हती आणि नाही...
📌तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात की,
*सत्य सत्यें देतें फळ|*
*नाहीं लागतची बळ||*
याचपद्धतीने आपणासमोर सत्य मांडले आहे. अवैचारिक विरोधकांनी मुद्दाम पसरवलेल्या बुद्धीभेदी प्रचाराला बळी पडण्याआधी...
_मित्रहो... एकदा विचार तर कराल...?_
*अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते...*

महिलांनी कुंकू का लावावे? अर्थात कुंकवाची उठाठेव...

महिलांनी कुंकू का लावावे? अर्थात कुंकवाची उठाठेव म्हणजेच कुंकवाच्या अफवा... (^m^) (^j^) (मनोगते)

'महिलांनी कुंकू का लावावे?' या फेसबुक आणि व्हॉटस्अँपवर धर्मअंध हिंदुत्ववाद्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या पोस्ट्स बद्दल...

सर्व प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की त्यांनी ही फेक स्टोरी बनवली आहे. कारण चारही वेदांमधे व उपनिषदात कुठेही स्त्रियांनी कुंकू लावावे असा उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अनेक शतकानंतर लिहिले गेलेल्या रामायण या ग्रंथात देखील दशरथ गेल्यानंतर त्यांच्या 3 ही पत्नीनी कुंकू पुसले असे लिहिल्याचा कुठेही उल्लेख रामयणाच्या जुन्यातल्या जुन्या प्रतीत आढळत नाही. तसेच त्यावेळच्या उत्तर भारतातील आर्य संस्कृतीत कुठेही कुंकू अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्मात कर्मकांड वाढीला लागल्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थानावर टाकण्यासाठी त्याकाळच्या पुरोहितांकडून कुंकू या सौभाग्य लेण्यांवर भर देण्यात आला.

त्यासाठी छद्म विज्ञानाचा आधार घेऊन पिट्यूटरी ग्लैंड, एक्यूप्रेशर ही माहिती देखील भारतीयांना होती असे भासवण्यात आले. पण असा उल्लेख आयुर्वेदशी सम्बंधित चरक, सुश्रुत वग़ैरे कुठल्या ही ग्रंथात नाहिये. एक्यूप्रेशर ही चीनी वैद्यकीय विद्या आहे जी त्याकाळी भारतात पोहोचलीच नव्हती. कुंकू लावण्याची सुरुवात ही द्रविड़ियन संस्कृतित दक्षिण भारतात झाली. तिथे देखील जी सिद्धपैथी आहे त्यात कुंकू लावल्याने कुठे पिट्यूटरी ग्लैंड सक्रिय होते आणि एक्यूप्रेशर सारखा परिणाम होतो वैगैरे एका शब्दानेही उल्लेख नाही.

जर त्याचे वैद्यकीय फायदे हेच कारण राहिले असते तर परम्परेने पुरुषांनी देखिल रोज कुंकू लावलेले दिसले असते. बरे, कुंकवाचे आरोग्यविषयक फायदे क्षणभर गृहीत धरले तरी एवढं कुंकू परायण आणि यज्ञ करूनही भारतात मलेरिया, रक्तक्षयासारख्या कितीतरी रोगांपासून लोक मोठ्यप्रमाणात मरतच होते.  त्या काळी या विविध रोगांवर योग्य वैद्यकीय उपचार नसल्यामुळे सर्वसाधारण आयुर्मार्यादा कमीच होती. आधुनिक विज्ञानातील शोधांमुळेच मानवी आरोग्य वाढीला लागले. हे विज्ञानाचे उपकार विसरून उलट कुंकवाचेच छद्म विज्ञान तयार करून हे धर्मअंध हिंदुत्ववादी, लोकांना संभ्रमात टाकण्याचे काम मात्र इमानेइतबारे करत आहेत.

आजच्या आधुनिक युगात कुंकू लावावे किंवा नाही हा प्रश्न महिलांवर सोडून द्यायाला हावा. मुळात त्याचा संबंध नावऱ्याच्या जीवनाशी जोडून स्त्रीला त्यात अडकवण्यात आले आहे. कुंकवाने दोघांपैकी कोणाचेही आयुष्य वाढत तर नाहीच पण बाईच्या कपाळावर कालांतराने कायमचा डाग वा खड्डा जरूर तयार होतो. कुंकू लावण्यासाठी खोटे किस्से आणि कथांची निर्मिति सनातनसारख्या कट्टर व धर्मांध हिंदुत्ववादी संघटना पराकाष्ठा  करताहेत. धार्मिकता व प्राचीनतेच्या गूढतेच्या आकर्षणाचे वलय चढवल्यामुळे सामान्य लोक मात्र या कुंकवाच्या छद्म सिध्दांताला बळी पडताहेत.

याच पुरुषी मानसिकतेने भाजप सरकारने कुंकवाला GST तून वगळले; पण स्त्रियांच्या सृजनतेचा आविष्कार असलेल्या मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनस् वर मात्र 12% GST लावून स्त्रियांच्या स्वच्छतेच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. यालाच ते 'सबका साथ, सबका विकास', असे समाजताहेत! विचार करा आणि या पुरुषप्रधान मानसिकतेचा कडाडून विरोध करून विवेकाचा आवाज बुलंद करा...

आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती?

आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती? –जेट जगदीश

सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या पॅथीत ॲलोपॅथी ही काल सुसंगत आहे असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ऍलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. पण ज्यांना ऍलोपॅथीला ॲडमिशन न मिळाल्यामुळे नाईलाजाने आयुर्वेदिक डॉक्टर व्हावे लागते अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी ते मग आयुर्वेद हे ऍलोपथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देन आहे, अशा बढाया मारू लागतात. पण खरी अंदर की बात अशी असते की, ऍलोपथीला ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ऍलोपॅथीवर खार खात असतात.🤦मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते. त्यात त्यांना सध्या संघोट्या हिंदुत्ववादी भाजपेई सरकारची साथ मिळाली आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखेच झाले...

खरेतर आयुर्वेदात काही औषधे काही रोगांवर खरेच गुणकारी आहेत. पण त्या औषधांच्या शास्त्रीय कसोट्यांवर चाचण्या न घेतल्यामुळे हजार-दोन हजार वर्षापूर्वीच्याच जुन्यापुराण्या ठोकताळ्यावर ती औषधे दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्या पूर्वजांचे प्राचीन ज्ञान यापलीकडे कुठलाही ठोस परिणाम जनतेसमोर दिसत नाही. अशा वेळेस जे स्वतःला आयुर्वेदाचार्य म्हणवतात त्यांनी अशा सगळ्या औषधांना सर्व शास्त्रीय चाचण्यांमधून तावूनसुलाखून प्रमाणित करणे आवश्यक नाही काय? जोपर्यंत आयुर्वेदातील औषधे ही शास्त्रीय चाचण्यांना सामोरे जात नाहीत तोपर्यंत तरी आयुर्वेद हे जडीबुटीचे शास्त्र असे समजले जाईल, हे आयुर्वेदाच्या खंद्या समर्थकांच्या कसे लक्षात येत नाही? यामुळे नुकसान तर आयुर्वेदाचेच होते ना? 

म्हणूनच मला एक कळत नाही की, या आयुर्वेदशास्त्रात आजपर्यंत आयुर्वेदाचार्य म्हणवणारे अनेक ढुढ्ढाचार्य निर्माण झाले. त्यातील क्वचितच कुणी शेकडो वर्षांपूर्वीच्या या चिकित्सा पद्धतीत संशोधन करून काही नवीन भर घातली आहे असे झाले नाही. उलट पुरातन कालीन ऋषी-मुनीनी त्यांच्या निरीक्षणाने जी काही चिकित्सा पद्धती तयार केली तीच त्यांनी 'बाबा वाक्यं प्रमाणं' म्हणून पुढे चालू ठेवली. यातील एकानेही का बरे प्रयोगसिद्ध वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून योग्य त्या नोंदी ठेवत...चाचण्या घेत आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीची विश्वासाहार्यता वाढवली नाही? बुद्धिप्रामण्यापेक्षा शब्दप्रमण्यावर का भर दिला?

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे आपल्याकडे विज्ञान म्हटल्यावर दोन हजार वर्षांपूर्वी भारतात असलेली विमाने आणि ज्योतिषशास्त्राने मिळवलेली ग्रहांदरम्यानची अचूक अंतरे असे सध्या वातावरण आहे. आयुर्वेद कसा थोर आहे, हे सांगताना अनेक थकत नाहीत. गेल्या ५० वर्षांत भारतीयांचे आयुर्मान जवळपास दुप्पट झाले व त्याला कारण आधुनिक विज्ञान आहे, आयुर्वेद नाही. आपण केलेल्या प्रयोगाचं डॉक्युमेंटेशन न केल्यामुळे आयुर्वेदातील अनेक शोध त्या त्या माणसांबरोबर संपले आहेत. अशाप्रकारे आयुर्वेद मागास ठेवण्यात त्यांचा हातभार लागला आहे. आपले संशोधन जर जागतिक स्तरावर पुढे यायचे असेल तर त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून डॉक्युमेंटेशनचे महत्व असतेच. म्हणून जोपर्यंत आपण वैज्ञानिक पद्धतीचा नीट उपयोग करत नाही तोपर्यंत आपण केलेल्या लहानसहान नवीन संशोधनाचा दुसरा कोणीतरी फायदा घेत रहाणारच. अशा लहान गोष्टींना मोठ्या करून जगामध्ये आपण शोध लावला असे दाखवले जाणार. हे टाळण्यासाठी तरी आपल्या संशोधक डॉक्टरांनी वैज्ञानिक डॉक्युमेंटेशनची सवय लावणे आवश्यक आहे असे वाटते.

अशी सवय नसणे हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहे. कारण विज्ञान हे कधीच साचलेले डबके नसते किंवा त्यात अंतिम सत्य असे काही नसते; तर तो एक सतत वाहणारा ज्ञानाचा प्रवाह असतो. या अर्थाने विज्ञान हे निरंतर असते. कालचे सत्य आज असत्य ठरून – म्हणजेच त्यातील त्रुटी लक्षात येऊन नवीन सत्य जन्माला येते. अशाप्रकारे दर क्षणाला त्यात नवीन नवीन शोध लागत असतात आणि माणसाची प्रगती होत असते. 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. कारण ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले.
आयुर्वेदही शेकडो वर्षांपूर्वी जे होते ते तसेच राहिले आहे. मग अशा साचलेल्या डबक्यात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती, हा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य वाटू नये.

गणपती विसर्जनाचे थोतांड


गणपती विसर्जनाचे थोतांड -जेट जगदीश.

आस्तिक लोक आपल्याच देवाची जेवढी विटंबना करत असतात तेवढी नास्तिकांनीही कधी केलेली नसते. ज्या देवाला अंधभक्त आस्तिक दहा दिवस मनोभावे पूजतात त्याच देवाला अकराव्या दिवशी गटारात बुडवून दूषित पाण्यात वस्ती करायला भाग पाडतात. अशा वेळेस त्यांच्या भावना दुखावत नाहीत. पण कोणी नास्तिकाने चिकित्सक टीका केली तर मात्र त्यांच्या भावना हूळहूळायला लागतात आणि 'आमच्या भावना दुखावल्या' म्हणून ते कोल्हेकुई करू लागतात. ही आहे यांची उच्च संस्कृतिक भक्ती!👎
गटारातील दूषित पाण्यात विसर्जित केलेल्या गणपतीचे फोटो पाहील्यानंतर काही भक्तगण मला शहाणपणा शिकवायला लागले की, "अहो नास्तिक, तुम्हाला धर्मातले काही कळते काय? जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा तिच्यात चैतन्य निर्माण होते आणि जेव्हा उत्तरपूजा केली जाते तेव्हा तिच्यातील चैतन्य नाहीसे होते. मग त्या गटारातील मूर्त्यांमध्ये चैतन्य नसल्यामुळे आमच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येतच नाही."

त्यावर मी म्हटले, "एकतर प्राणप्रतिष्ठा केल्यावर चैतन्य येते आणि उत्तरपूजा केल्यावर चैतन्य जाते असे कोठेही सिद्ध झालेले नाही. कारण मुळात चैतन्य येणे आणि जाणे हा मनाचा खेळ आहे. भट ब्राह्मणाने दक्षिणेच्या रूपाने स्वतःच्या पोटाची खळगी भरावी म्हणून निर्माण केलेले कर्मकांड आहे." 

"बरे, एक वेळ गृहीत धरून चालू की उत्तरपूजा केल्यावर गणपतीच्या मूर्तीतील चैतन्य जाते. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. मग माझे भक्तगणांना असे आव्हान आहे की, जसे पंढरपूरच्या भटाने तीर्थकुंडात लघुशंका करून लोकांना तीर्थ पाजले तसेच तुम्ही या चैतन्य गेलेल्या गटारातील मूर्तीवर लघुशंका करावी आणि ते तीर्थ म्हणून प्राशन करावे. आहे हिम्मत?"🤔

गणपतीची उत्तरपूजा केल्यानंतर त्यातील चैतन्य नाहीसे होते म्हणून ते गटारात असले तरी भक्तांच्या भावना दुखावत नाहीत असे त्यांचे तत्वज्ञान असते. याच न्यायाने मग त्यांचे आप्तस्वकीय जर मृत्यूमुखी पडले तर त्यांच्यात चैतन्य नसल्यामुळे ते प्रेताला असेच गटारात फेकून देतील काय?🤔 

यावरून देव मानणे किंवा न मानणे हा आस्तिकांचा सोयीचा मामला असतो, हेच सिद्ध होत नाही काय?

तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्यात प्राण फुंकून चैतन्य निर्माण करणारे आणि उत्तरपूजा करून प्राणहरण करत गणपतीतील चैतन्य नष्ट करणारे ब्राह्मण हे देवाचे बापच झाले म्हणायचे!👎

म्हणून लक्षात घ्या की, मूर्तीपूजेचे कर्मकांड सब झूठ है। भटूरड्या ब्राह्मणांनी आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे.

म्हणून संवेदनशील माणसांना गणपतीच्या विसर्जनानंतर सुबक सुंदर मूर्तींच्या तोडक्या-मोडक्या मुर्त्या झालेल्या पाहून मूर्तीच्या विटंबनेने त्यांचे मन विदीर्ण होते. इतर कुठल्याही धर्मातील मूर्त्यांची अशाप्रकारे विटंबना झालेली कोणाला दिसले आहे काय? तरी ते धर्म कनिष्ठ आणि हिंदू धर्म श्रेष्ठ! असे समजणे म्हणजे आत्मवंचनाच होय. मुर्त्यांची विटंबना होऊ नये म्हणून अंनिस गेली कित्येक वर्षे प्रचार करत धर्म सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी...
१) शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवा. 
२)पीओपीच्या मूर्ती बनवू नका.
३) हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे. तेव्हा गोमयाने(शेणाने) गणपतीची मूर्ती बनवून त्याच मूर्तीचे विसर्जनानंतर खत म्हणून झाडांना देणे योग्य राहील.
४) मूर्ती लहान बनवा. म्हणजे घरातल्या बादलीत लहान मूर्तीचे विसर्जन केल्यावर ते पाणी तुम्ही झाडांना घातले तर जास्त चांगले राहील.
५) निर्माल्य कलशातच निर्माल्य टाका. 
६) नैसर्गिक रंग वापरा. कारण रासायनिक रंगामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन शेवटी त्याचा त्रास माणसालाच भोगायला लागतो.
७) मूर्ती दान करा. 
८) नद्यातील वाहत्या पाण्यात विसर्जनाचा हट्ट सोडून मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करा.
९) मूर्तीचे विसर्जन न करता पुढच्या वर्षी तीच मूर्ती पुन्हा वापरा.
१०) मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवा. कारण तो जर निसरडा असेल तर अपघात घडू शकतात.
११) धातूची मूर्ती गणपती उत्सवात वापरा. म्हणजे पाण्यात विसर्जन करून तीच मूर्ती पुन्हा वापरता येईल. 

असे अनेक उपाय गेली कित्येक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुचवत आलेली आहे. त्याला काही प्रमाणात आता चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. तरीही धर्मांधतेचे राजकारण करणारे हिंदुत्ववादी आणि डोकं गहाण ठेवलेले अंधभक्तच विरोध करत असतात. आजही सनातन संस्था म्हणते की, वाहत्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करणे हे शास्त्र संमत आहे. मग पाण्याचे किती का प्रदूषण होईना; त्याचे त्यांना सोयरसुतक नसते. प्रदूषित पाणी पिऊन माणसे मेली तरी त्यांना चालते. 

वरील सुचवलेले उपाय अंधभक्तांना करायचे नसतात. त्यांना विरोध करायचा आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिंदुद्वेषी म्हणून बोंबा मारायच्या, एवढेच त्यांचे काम असते. म्हणून आमच्या धर्मात ढवळाढवळ करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असे म्हणत आमच्या भावना दुखावल्या म्हणून भटाळलेले उफराट्या काळजाचे अंधभक्त शहाजोगपणे कोल्हेकुई करत असतात. पण गटारातील दूषित पाण्यात बुडवलेल्या मोडक्या-तोडक्या गणपतीच्या मुर्त्या पाहून त्यांच्या भावना दुखावत नाहीत. यावरून त्यांचा मेंदू किती बधिर झालेला आहे हे स्पष्ट होते.🤦

बहुजनांनो आता तरी जागे व्हा आणि ब्राह्मणीकावा ओळखून देवाधर्माच्या नावाखाली निर्मिलेल्या अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडा.🙄

मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'.

*मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'. (^m^) (^j^) (मनोगते)*

मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारपासून पद्मपुराणाच्या संदर्भानुसार महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्षात दर गुरुवारी केल जातं. परंतु या व्रताचा पद्मपुराणात कुठेही उल्लेख आढळुन येत नाही. हे व्रत भरपूर धनाची ग्वाही देतं. शिवाय त्याला फारसा खर्चही नाही. वर ते पंधरा मिनिटात आटोपतं आणि वर्षातून फक्त चार किंवा पाच वेळेसच करावं लागतं. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली अस या व्रताच आहे. हे व्रत केलं आणि पैसे मिळाले तर उत्तमच. नाही मिळाले तरी ठिकाय. असा विचार करून हे व्रत घरोघरी पोहोचलं असावं. शिवाय याची नायिका राणी सूरतचंद्रिका गेल्या जन्मात नवऱ्याचा मार वगैरे खाणारी आहे. त्यामुळे तिच्याविषयी माहेरच्या साडीतल्या अलका कुबलला किंवा आजच्या सास बहू सिरियलमधल्या सोशिक सुनांना मिळते तशी एक सहानुभूतीही आहे. हातपाय न हलवता केवळ नारळ पुजून पैसा अडका मिळण्याची काडीचीही शक्यता नसल्याने हे व्रत फोलफटासारखं कचराकुंडीत टाकून द्यायच्याच लायकीच आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे व्रत काही जुनंपुराणं बिल्कूल नाही. याची पहिली आवृत्ती 1973 सालची आहे. भट मंडळी या लहानशा पुस्तिकेला पोथी म्हणतात. या चोथा झालेल्या पोथीचा लेखक मिलिंदमाधव केळकर नावाचा ब्राह्मण आहे. तो स्वतःच असं म्हणतो की हा ‘ग्रंथ’ ‘शके १८९४’ला लिहून पूर्ण झाला. शके वगैरे म्हटल्यावर आपल्याला हे जुनं वाटतं. पण शके १८९४ म्हणजे 1962 सालं. भारत चीन युद्ध झालं आणि शम्मी कपूरच्या जंगली सिनेमातलं याहू गाणं गाजत होते ते हे साल. आता या कालपरवाच्या चोथा झालेल्या पोथीची जे कुणी प्राचीन धार्मिक ग्रंथ म्हणून पुजा घालत असतील त्यांनी यातून काय तो यथायोग्य बोध घ्यावा. केवळ पुस्तकांची तुफान विक्री होऊन त्यातुन बक्कळ पैसा मिळावा निव्वळ याच हेतूने केळकर नावाच्या ब्राह्मण प्रकाशकाने हे व्रत पुस्तक रुपाने आपल्या माथी मारले आहे. पुस्तकातल्या पूजाविधीत ही पोथी सात जणांना दान देण्याचा उल्लेख आहे. काही प्रकाशकांनी तर या वाक्याखाली रेषा मारूनही ही पोथी सात जणांना दान देण्याचा उल्लेख ठसवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शिवाय शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा द्यायलाही हे व्रत सांगते. पुस्तकाच्या विक्रीतुन भट-ब्राह्मणांची चंगळ करणारे हे व्रत म्हणजे निव्वळ थोतांड आणि थोतांडच आहे. किंबहुना आजवर ज्यांना आपण थोतांड म्हणतो, अशांनाही दर्जेदार म्हणावं इतकं ते बकवास आहे.

जर कुणाला व्रत करायची इतकीच जर हौस असेल तर त्यांनी ते दरवर्षी जानेवारी महीन्यात घालावं आणि त्या व्रतामध्ये अनाथ, गोर-गरीब आणि गरजु मुला-मुलींना यथाशक्ती शाळेची पुस्तक, गणवेश अथवा अन्नदान करावे. कारण जानेवारी महीन्यात ३ तारखेला ज्ञानगंगा "सावित्रीबाई फुले" यांची जयंती असते.