वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !! - जगदीश काबरे.(^j^)
जगात असा कुठलाही विषय नाही की ज्यात विज्ञान नाही. ह्या
चरचरात विज्ञानच भरून राहीले आहे.निसर्गाचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान.
त्याला चारभिंतीच्या प्रयोगशाळेत बंदीस्त करणे ही आपली संकुचित विचारसरणी
झाली. आईनस्टाइनने त्याचे शोध निसर्गाच्या प्रयोगशाळेत गणिती विचार करून
लावले. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन हा माणसाला तत्वज्ञ बनवतो. आणि
प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करतो. त्यामध्ये
धर्म,भावना,शब्द्प्रामण्य यापेक्षा सत्याची कसोटी महत्वाची ठरते. प्रत्येक
गोष्टीचे documentation केल्यावरच त्याची सत्यासत्यता पडताळता येते. तेथे
शब्द्प्रामण्यपेक्षा चिकीत्सेला महत्त्व असते. या पध्दतीनेच आजवर माणसाची
प्रगती झाली आहे.
गोमूत्र प्यायाल्याने आणि शेण सारवल्याने वा खाल्याने तब्बेत
सुधारते हे कुठल्याही authentic कोशात लिहीलेले नाही आणि सिध्दही झालेले
नाही. ते फ़क्त लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमुळे खरे वाटायला लागते. म्हणून
या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी ठरतात.मग ती फ़क्त वैयक्तीक अनुभूती
ठरते.सार्वत्रिक नव्हे.
योग, तुळस,वृक्ष, हळदीसारखी काही उदाहरणे वैज्ञानिकतेच्या
निकषावर काही बाबतीत खरी असली तरी हनुमान चालीसामध्ये जरी NASA ची साक्ष
(खरी असेल तर तो कागद प्रसिध्द करायला कोणाची हरकत आहे?) काढून सूर्य व
पृथ्वीचे अंतर दिले आहे तरी कुठल्याही वैज्ञानिकाने त्यावर समर्थन दिलेले
नाही. तसेच जानवे घातल्याने रोगांपासून बचाव होतो. (मग जानवेधारी आजारी का
पडतात?) चरणस्पर्श केल्याने पाठीचा कणा निरोगी रहातो. (मग दहादा वाकून
नमस्कार करणार्यांना स्पाँडीलायटीस का होतो ?) दारावर तोरण लावल्याने
वातावरण शुध्द होते. (उलट तोरणासाठी पाने-फुले तोडून आपण पर्यावरणाची हानी
करत असतो.) दिवा लावल्याने पॉझिटीव्ह ऊर्जा वाढते. (मुळात ती आपल्या
वृत्तीत असावी लागते.) कान टोचल्याने अस्थमा बरा होतो.( मग अनेक कान
टोचलेल्या बाया अस्थामाग्रस्त का आहेत?) कुंकूम लावल्याने वशीकरणापासून
बचाव होतो. (Hypnotist अनेक कुंकू लावलेल्या - टिकली नव्हे - स्त्रीयांना
hypnotized कसे करू शकतात?) तिलक लावल्याने कपाळावरील अतिरिक्त पाणी शोषले
जाते, शंख ध्वनी केल्याने डासांचा नाश होऊन मलेरीयापासून बचाव होतो. (मग
शंखध्वनी करणारेच मलेरीयाग्रस्त का होतात? दुसरे असे की,भारतात आज मोठ्या
प्रमाणात मलेरीयाचे रुग्ण वढताहेत तेव्हा करा की शंख ध्वनी! डॉक्टरांची गरज
काय?) चिताग्नी दिल्याने प्रेताची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरणाची हानी
टळली जाते.(लाकडे जाळून प्रदूषण झाले तरी) उठाबशा वा कान खेचण्याच्या
शिक्षेमुळे मेंदू तल्लख होतो आणि तोतरेपणा जातो यासारख्या गोष्टीत
हास्यास्पद व चुकीचे विज्ञान सांगून ते वैज्ञानिक असल्याचा आभास निर्माण
करण्यात आला आहे. यातील एकही मुद्दा कुठेही सिध्द झालेला नाही. हे सगळे
आपल्या पूर्वजांना माहीत होते या अभिनिवेशाने लिहीले जाते. वैज्ञानिक
पध्दतीत documentation ला महत्त्व असते,पुराण कथांना नाही.
म्हणून महाभारतातील कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाचा संजयाने
आखो देखा हाल बसल्या जागेवरून अंध धुतराष्ट्राला सांगितला, हे म्हणजे आजचे
दूरदर्शन होय. ब्रम्हास्त्र म्हणजे अणुबॉम्ब... अग्नीअस्त्र म्हणजे आजचे
मिसाईल्स... पर्जन्यास्त्र म्हणजे कृत्रिम पाऊस पाडण्याची क्रिया... तर
रामायणातील पुष्पक विमानाची उड्डाणकला आपल्या पूर्वजांना आधीच माहीत होती.
एवढेच काय पण गणपतीला हत्तीचे मुंडके लावणे म्हणजे माणसाच्या धडावर
प्राण्याचे शीर जोडणे, ही तर जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी होती.
आपल्याकडील हे सगळे वेदातील आणि रामायण-महाभारतातील ज्ञान जर्मनांनी
पळवले, मग या पाश्चात्यांनी शोध लावून आपल्याच नावावर खपवले. असा आक्रोश
करून आपले पंतप्रधान आणि हिंदुत्ववादी तथाकथित शास्त्रज्ञ पूर्वजांच्या
वैज्ञानिक प्रगतीच्या (?) नावाने आपले अपयश दडपण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यामुळे भलेही आपली अस्मिता सुखावत असेल पण वैज्ञानिक कृती मात्र शून्यच
होते.
ज्या देशात पंतप्रधानांची विज्ञान सल्लागार समिती बरखास्त
केली जाते, आणि मूलभूत संशोधन करणाऱ्या विज्ञान संस्थाच्या संशोधन निधीत
कपात करून त्या ऐवजी गोमूत्र व गोमयावर संशोधन करणारी तथाकथित
वैज्ञानिकांची समिती स्थापून त्यांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला जातो,
आणि खऱ्या वैज्ञानिकांना मोर्चा काढावा लागतो, अशा देशाचे भवितव्य किती
अंध:कारमय असेल, हे सांगण्यासाठी कोणत्याही भाविष्यवेत्याची गरज नाही.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका
दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले
पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच
महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन
ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र,
आयुर्वेद अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात
ही परंपरा खंडित झाली. ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने
ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य
बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक
प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात
समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही
साचलेपण आले.
कोणत्याही धर्मवाद्यांचे मुद्दे जर विज्ञानेतर असतील तर मग
त्यातील प्रत्येक मुद्दयाचा वैज्ञानिक संबंध दाखवण्याचा अट्टाहास का ?
त्यांनी ही वैयक्तीक अनुभूती आहे असे स्पष्ट करावे, म्हणजे वादच मिटतो. मग
त्यांनी Believe-Hinduism is based on science असं म्हणायला नको. खरी
मखलाशी अशी असते की,ते विज्ञानाला अनुसरून आहे असे म्हटले की,सुशिक्षित लोक
सहज स्वीकारातात, हे त्यांना पक्के ठाऊक असते.ह्याला बनवेगिरी
म्हणतात.दुर्दैवाने आजचे सुशिक्षित (की फ़क्त साक्षर) धार्मिक अस्मितेचे आणि
उन्मादाचे बळी ठरताहेत. म्हणूनच मी म्हणतो, आजच्या सुशिक्षित माणसाने
वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही. त्यातूनच
हिन्दू धर्माला वैज्ञानिक लेबलं लावायचा फोल प्रयत्न केला जातो.
वैज्ञानिक पद्धत पूर्वग्रहरहित असते, पण वैज्ञानिक हा
हाडामांसाचा माणूस असल्यामुळे तो पूर्वग्रहदूषित असू शकतो, त्याला प्रलोभने
भुलवू शकतात, स्वार्थ तर्कदुष्टतेकडे नेऊ शकतो. विज्ञानाचा विकास हा
वैचारिक खुलेपणाच्या अवकाशात व विवेकाच्या चौकटीत होत असतो. त्याचा गाभा
मानवकेंद्रित आहे, हे भान राखले तरच आपली वाटचाल अंधश्रध्देकडून
विज्ञानाकडे होऊ शकेल.
विज्ञानाची रीती [आधुनिक तांत्रिक उपकरणे] आपण सहजच उचलली, पण विज्ञानाची नीती [निरिक्षण, प्रयोग, कारण मिमांसा आणि निष्कर्ष] नाही स्वीकारली.
म्हणूनच भारतीय समाजात विसंगती भरली.
जगणे असते एकविसाव्या शतकात,
पण मन मात्र सोळाव्या शतकात.
बोलणे असते पुरोगामी,
पण आचरण मात्र प्रतिगामी!
वागतांना म्हणावे आहोत आम्ही सद्वर्तनी,
पण चालतांना मात्र का होतो दुर्वतनी ?
म्हणून म्हणतो जगदीशा,
धरी विज्ञानाची कास दशदिशा.
No comments:
Post a Comment