देव-धर्म यांच्याशिवाय माणूस केवळच जगू शकतो असं नाही तर तो
अधिकच अर्थपूर्ण पद्धतीनं जगू शकतो. देवविषयक वा परलोकविषयक कल्पनांनी
माणसाला कुंडीत बसवलं आहे. त्याच्या संपूर्ण माणूसपणाच्या वाटा
त्याच्यासाठी बंद केल्या आहेत. या कल्पनांनी मोहल्ल्या-मोहल्ल्यात भांडणाचे
कारखाने काढले ते वेगळेच. या सर्व कल्पनांनी माणसाला जगणंही कठीण केलं आणि
स्वतःला निर्माण करण्याचं जे सुख असतं, मानवी प्रतिष्ठेच्या सामग्य्राशी
बोलण्यात, त्या सामग्य्राचा सूर्य व्यक्तिमत्त्वात स्थापन करण्यात जे
अनिर्वचनीय सुख असतं, त्या सुखाशीही माणसाची गाठ पडू दिली नाही. या सर्व
कल्पनांनी साकल्याच्या सागराला पोचण्याआधीच माणसाची नदी मध्येच आटवली.
या कल्पनांनी माणसाला परावलंबी केलं. दुबळं केलं. आणि असं
परावलंबन हेच मानवी जीवनाचं सत्य आहे, या खोट्या समजुतीच्या तुरुंगात
त्याला कायम कोंडलं. या परावलंबनानं त्याला पुनःपुन्हा उगवण्यासाठी
क्षितिजंच ठेवली नाहीत. या क्षितिजविहीनतेनं माणसाला झाडाप्रमाणं सतत
तोडलं. या सर्वच कल्पनांनी माणसाला पोपट केलं आणि पिंचऱ्यात डांबलं. या
कल्पना सांगतील वा शिकवितील तेव्हढंच माणसानं बोलावं. माणसानं स्वतःचा
विचार करू नये. स्वतःच्या अस्तित्व तत्त्वाच्या रचनेचा, पुनर्रचनेचा विचार
माणसानं करू नये. स्वतःच्या निखळ मनुष्यमयतेच्या मांडणीचा, फेरमांडणीचा
विचार माणसानं करू नये. माणसानं त्याला मारणाऱ्या आणि शोषकांना जगवणाऱ्या
कल्पनांना जगवण्याचा विचार तेवढा करावा. माणसानं आणि सज्जन गरिबानं
स्वतःच्या उभारणीचा विचार करू नये. त्यानं शोषण जगवावं. अविचार जगवावेत.
त्याला लोळवणाऱ्या, त्याला तुडवणाऱ्या वा त्याला मोडीत काढणाऱ्या सर्व
गोष्टी त्यानं जगवाव्यात यासाठी वर्चस्वमनस्कांनी अध्यात्माचा, परलोकाचा
चकवा निर्माण केला. या गोष्टी त्याला माणूस म्हणून जीवनातून उठवणाऱ्या
किंवा जीवनाच्या परिघाबाहेर ढकलणाऱ्या अशा गोष्टी आहेत. परलोकाच्या
कल्पनेनं इहलोकाच्या अस्तित्वाला याप्रकारे आग लावण्याचा प्रयत्न केला. हा
प्रयत्न धुमाकूळ घालत राहिला, काही प्रमाणात त्याला यशही मिळत राहिलं, पण
त्याला संपूर्ण वा निरपवाद यश कधीच मिळालं नाही. त्याला कारण आहे, जगभरचं
इहवादी चिंतन.
धर्मांमध्ये खूप भेद असले आणि त्या भेदांचा परिणाम म्हणून
अनंत प्रकारच्या मारामाऱ्या असल्या आणि त्यामुळं प्रत्येकच धर्म दुसऱ्या
धर्माला शत्रू मानत असला तरी या सर्वच धर्मांमध्ये एक साम्य मात्र असतंच.
माणसाच्या जगण्याचा संकोच करण्याच्या बाबतीत त्यांच्यात समभाव असतो.
माणसाच्या अमर्याद माणूसपणाचे छोटे-छोटे तुकडे करण्याच्या संदर्भात,
माणसांना छोट्या-छोट्या चौकटींमध्ये डांबण्यात आणि त्या चौकटींचा अहंकार
पढवण्यात या धर्मांमध्ये समभाव असतो. माणसाचं माणूसपण पुसून त्याला धर्माची
काटेरी अस्मिता देण्याच्या संदर्भात मात्र धर्मांमध्ये समभाव असतो. हा
धर्मांमधला समभाव माणसांमध्ये जवळजवळ अभेद्य असा विषमभाव निर्माण करतो आणि
इमानेइतबारे त्याचं पोषण करतो.
स्वर्ग, परलोक, पूर्वजन्म-पुनर्जन्म, देव, दैववाद या सर्वच
गोष्टी काल्पनिक आहेत, पण या काल्पनिक गोष्टी सरंजामशाहीच्या,
भांडवलशाहीच्या वा अशा कोणत्याही नावानं वावरणाऱ्या शोषणशाहीच्या पूर्ण
हिताच्या असतात. या गोष्टींच्या आधारानंच सर्व शोषणशाह्या गरिबांना गुलाम
करीत असतात. आणि वरील सर्वच गोष्टींच्या मदतीनं ते शोषणाचे परमनंट परवाने
मिळवीत असतात. इहवाद या सर्व शोषणशाह्या उद्ध्वस्त करू इच्छितो याचं कारण
या शोषणशाह्या गरिबांचं शोषण करतात. या शोषणशाह्या गरिबांच्या लक्षात येणार
नाही या पद्धतीनं हे शोषण करतात आणि स्वर्ग, परलोक, पूर्व-पुनर्जन्म,
देवदैववाद ही या पद्धतीची कलमे-उपकलमे असतात. या शोषणशाह्या म्हणजे
त्यांच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात, ती वर्चस्वमनस्क माणसंच हे शोषण
करतात, पण नाव मात्र देव-दैववादाचं पुढं करतात. ते फक्त देव-दैववादाचा
त्यांच्या फायद्यासाठी आणि भाबड्या गरिब मंडळींना बिनदिक्कत लुटण्यासाठी
धडधडीत उपयोग करून घेत आहेत हे देवाला वा दैवाला कळतच नाही. याचं कारण देव
वा दैव कुठं अस्तित्वातच नाही हे आहे. देव-दैव, परलोक या सर्वच गोष्टी
आपल्याला लुटण्याची साधनं आहेत हे सर्वच या सज्जन गरिबांना कळावं असं
इहवादाला वाटतं.
इहजीवनातले प्रश्न आपल्यामुळेच निर्माण होतात. ते प्रश्न
परलोकाच्या नादानं सुटणार नाहीत. ईश्वराच्या शोधानं सुटणार नाहीत. या सर्व
कल्पना आहेत आणि त्या माणसाच्याच दुबळेपणानं, आळशी वृत्तीनं आणि त्याच्या
आयतेपणाच्या लालसेनं निर्माण केलेल्या आहेत. या कल्पनांनी मग माणसालाच
दुबळं, विकृत आणि आळशी केलं. आपल्यावरची जबाबदारी एखाद्या कल्पनेवरती
ढकलण्याची तरतूद माणसानं केली, पण या तरतुदीनं त्याच्या साहसाभोवती कुंपणं
निर्माण केली. माणसांमध्ये स्वतःला अपूर्णांक करण्याची स्पर्धा लागली. एवढे
अनर्थ स्वतःचा विचार स्वतःच करण्याची जबाबदारी टाळल्याच्या चुकीमुळे झाले.
माणूस स्वतः लुळा झाला आणि त्यानं ईश्वर समर्थ केला. त्यानं दैवाला शक्ती
दिली आणि स्वतः शक्तिहीन झाला. आणि या संदर्भांनी निर्माण केलेल्या
भांडणांनी माणूस स्वतःलाच पारखा झाला. मग एक सुंदर स्वतंत्रता एक अंकितता
झाली. एका प्रवाहाचं आटलेपणात रूपांतर झालं. एक अशरणता शरणागत झाली. एका
साहसाचा भुसा झाला. एक बौद्धिक गर्जना मुकी झाली. माणूस नावाचं एक साहस
पांगळं झालं.
जात, धर्म, परलोक आणि त्यांच्याशी संबंधित सर्वच अंधश्रद्धा
बुद्धिवादाला मान्यच नसतात. बुद्धिवाद म्हणजे विवेक किंवा विवेकदृष्टी. या
विवेकदृष्टीला कधीही चुकीची गोष्ट बरोबर वाटणार नाही. ही दृष्टी दुर्गंधीला
सुगंध म्हणणार नाही. आणि तिला विघातकता कधीही विधायकता वाटणार नाही.
अन्याय कधी न्याय वाटणार नाही, ही दृष्टी पारतंत्र्याला स्वातंत्र्य मानणार
नाही. द्वेषाला करुणा आणि शोषणाला समाजवाद मानणार नाही.
विज्ञाननिष्ठ होणं वा बुद्धिवादी होणं म्हणजे इहवादी होणंच
असतं. विज्ञाननिष्ठा हे इहवादाचंच मार्गदर्शक तत्त्व असतं. खरं म्हणजे
विज्ञाननिष्ठेची प्रक्रिया ही बुद्धिवादाचीच प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा
परिपाक इहवादात झालेला आहे. धर्म वा ईश्वर या गोष्टी सत्ताधारी वर्गांची
बाजू घेऊन सामान्यांची मती सपाट करतात. समाजात निराशा, पुरुषवर्चस्वाची
व्यवस्था, एखाद्या भांडवलशाहीच्या वा सरंजामशाहीच्या वर्चस्वाची व्यवस्था
आकाशातून पावसासारखी पडत नाही. भोगवाद, बलात्कारी वृत्ती, भ्रष्टाचारी
वृत्ती, शोषकवृत्ती वा अंधश्रद्धा या गोष्टी विकृत आणि हिंस्र समाजरचनेतूनच
जन्माला येतात. त्या वरून पडणाऱ्या उल्का नसतात. वर्चस्वाच्या तृष्णेतून
उफाळून येणारे हे आगीचे प्रवाहच समाजाला जाळत समाजभर पसरतात. तेव्हा या
अनीतीचा प्रादुर्भाव समाजात ईश्वर, धर्म या सर्व गोष्टी असताना कसा होतो?
हे सर्व अनीतीचे खेळ असतात आणि या खेळांना परलोकाचे हवाले मान्य करून नीती
म्हणा एवढीच ईश्वरवाद्यांची वा अध्यात्मवाद्यांची भूमिका असते.