Wednesday, January 28, 2015

मंत्रसामर्थ्य..

मंत्रसामर्थ्य....प्रा.य.ना.वालावलकर
परवा एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे."
त्यांच्या या विधानात काही तथ्य आहे काय? या ऊर्जेचा प्रत्यक्ष प्रत्यय कधी, कोणाला, कोठे, कसा आला? ॐ मधील प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली भरमसाट विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) असली विधाने महान सत्ये वाटतात. ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात, वा! काय विद्वत्ता आहे! असे म्हणतात , हे खरे.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी थोडातरी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले? आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध गेंगाणा खर्जस्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा या देशात आहेत. मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युन्निर्मिती का करत नाही? असे काही करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणण्यात काय अर्थ आहे? या ऊर्जेचा उपयोग कोणत्या क्षेत्रात, कशा पद्धतीने होतो?
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून बसून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले..साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो...मी मुक्त झालो...मी ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत.त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
बरेच अध्यात्मप्रेमी गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. अखिल ब्रह्मांड पवित्र करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त ,शुद्ध आणि पवित्र होईल.असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत भारावून जातो. मग सी.डी.लावून "ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा गायत्री मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी असते. डास आत येतात. पायांना चावतात. एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो. मंत्राच्या त्याच त्या ओळी ऐकून ऐकून कंटाळतो."आता राहूं दे.नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो.
आंतर जालावर गायत्री मंत्राविषयी एक लेख http://iamgajanan.blogspot.in/2012/02/blog-post.html… येथे आहे.त्यातील दोन वाक्ये,"
....विद्वानांच्या म्हणण्या नुसार गायत्री मंत्र ही "4 1H + 2 e --> 4He + 2 neutrinos + 6 photons " या सूर्यावर हायड्रोजन वायूपासून हेलियम, मुक्त Neutrons , Photons आणि उर्जा निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन आहे"."हा गायत्री मंत्र लाल, शुभ्र असा अतिशय तप्त असल्याने त्याला ओम हा फिल्टर लावला जातो."
अशा लेखनाने अध्यात्मवादी हास्यास्पद ठरतात.
"गं गणपतये नम:।" या मंत्रजपाने विश्वशांतीचे संधारण, संवर्धन आणि पोषण होते ." हे तथ्यहीन विधान भोळसट श्रद्धाळूंना खरे वाटते. गणेश जयंतीला गणेशयाग करतात. दिवसभर ध्वनिवर्धकांवर "ॐ--गं गणपतये नम:।" चालू असते. ऐकून कान किटतात. शेजारच्या गल्लीत रात्री टोळी युद्ध होऊन एखादा खून पडला तरी "गं गणपतये नम:।" मंत्र विश्वशांतीचे पोषण करतो ही भोळसटांची श्रद्धा अढळ राहाते.
हे मंत्र, तसेच "ॐ नम: शिवाय।,ॐ नमो भगवते वासुदेवाय।, जय जय रघुवीर समर्थ।," असे मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून, शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा. पण वास्तव जाणावे. थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान, प्रजाहितदक्ष होते. दुर्दैवाने तरुणपणीच त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचार्य धन्वंतरींच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजय मंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शंभर दशग्रंथी ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला.
" माझा प्रवास" या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीच पाप मोठे. म्हणून मंत्रजप व्यर्थ ठरले. झांशीवालीस गोळी लागली. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."-----या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हे एक होते.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।" लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे निरर्थक मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने कोणतीही विशेष गोष्ट साध्य होत नाही. चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने आश्चर्यकारक चमत्कार घडतात ते केवळ पुराणे, परीकथा, बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत . हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.

No comments: