Wednesday, March 27, 2019

आपण दुःखी का होतो. -जगदीश काबरे.(^j^)

जीवन आनंदी,सुखी,समाधानी असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. या बाबतीत स्वत:ची आशी काही मतं असतात आणि ती पूर्णत: योग्यच आहेत असं समजूनच आपण चालत असतो. मग आपल्या जीवनात जेव्हा आपल्या अपेक्षेनुसार घडामोडी घडतात तेव्हा आपण खुश होतो. खरा प्रश्न असा आहे की, हां बाहेरून मिळणारा आनंद, जो कधी एखाद्या वस्तू कडून मिळतो किवा एखाद्या व्यक्तीकडून, तो आनंद स्थायी स्वरुपाताला असतो का? तो कधी आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो का?

आपल्या शरीराला थोड़ासाही त्रास झालेला आपल्याला चालत नाही. अगदी आरामात रहाणेच आपण पसंत करतो. मात्र मनाच्या बाबतीत नेमकी ही जागरूकता दाखवायला विसरतो. सर्वांसाठी आपण वेळ काढतो,पण स्वत:साठी थोडातरी वेळ आपण काढतो का? एक क्षणभर तरी थांबून पाहीलय का की आपण स्वत:आनंदी आहोत का?

आनंद ही अशी भावना आहे जिला केवळ स्वत:च जाणू शकतो. आपण आनंदापासून दुरावातो तेव्हा आपण आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल दुसर्याच्या हातात देतो.कुणी आपल्या बरोबर कसा वागातोय याचा कुठे ना कुठे संबंध लावून आपण असं समीकरण बनवतो की, माझ्या आजूबाजूचे लोक जेव्हा आनंदी असतील तेव्हाच मलाही आनंद मिळेल. याचाच दुसरा अर्थ असा की, माझ्या आजूबाजूचे लोक जर दू:खी असतील तर मी आनंदी कसा राहू शकेन?

आपण दु:खी होतो कारण आपलं इतरांनी आपलं कौतुक करावं, मला यश मिळावं, त्याने मी आनंदी होईन हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. म्हणून कुणीही कौतुक केलं नाही तर  आपल्याला यश मिळालं तरी आनंद नाही होत. इतकं आपण आपल्या आनंदाला मर्यादित करून ठेवलं आहे.

भीती, चिंता, काळजी... या भावना आपल्या जगण्याचा भाग असतातच. कारण आपण सगळेच जगण्यातल्या अशाश्‍वतेला घाबरत असतो. तरी कधी कधी काही गोष्टींना सामोरं जाण्याची मानसिक तयारीही आपण करत असतो आणि म्हणूनच या भावना कण्ट्रोलमध्ये कशा ठेवायच्या याचा आपण विचार करायला हवा. पण तसं नाही झालं आणि या भावना सातत्यानं आपल्या मनात राहिल्या तर गडबड होतेच.

१) आपण जर सतत कशाची ना कशाची चिंता करत राहिलो तर समोर असणार्‍या समस्येला तोंड देण्यापेक्षा तिला टाळण्याची प्रवृत्ती वाटते. त्याचं सर्मथनही करण्याची प्रवृत्ती वाढते. अशावेळी तारतम्यानं विचार करण्याची आपली क्षमता कमी होते. समस्येचं योग्य स्वरूपात आकलन होण्याऐवजी तिच्याकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाहीत.

२) सातत्यानं मनात चिंतेचे विचार राहिले तर त्याचा मनावर/शरीरावर ताण निर्माण होतो. छातीत धडधड होणे, तोंडाला कोरड पडणे. हातपाय थंडगार पडणे अशी विविध शारीरिक लक्षणं त्यातून निर्माण होतात. मुळात भीती का वाटते तर आपल्या मनानं आता आपल्याला कोणत्यातरी महाभयंकर आव्हानाला तोंड द्यायचं आहे, असा संदेश दिलेला असतो. उदाहरणार्थ, '. ती नाही म्हणाली तर!' म्हणजे काय तर आपलं नाकारलं जाणं, नापास होणं, आपलं मूल्यमापन होणं यासारख्या गोष्टींची भीती मनात घर करून बसते. या सर्व गोष्टी म्हणजे त्या क्षणाला आपल्याला अगदी संपवून टाकणार्‍या, खाऊन टाकण्याच्या गोष्टी वाटतात. 'काही खरं नाही.. असं झालं तर, मला सहनच होणार नाही,' असं मनातून वाटत असतं. मनानं या गोष्टीला एक आव्हान म्हणून स्वीकारल्यानं त्याला सामोरं जायला आपण सतत स्वत:ला तयार करतो. त्यातूनच बरीच शारीरिक लक्षणं निर्माण होतात. आपण सतत कसल्या ना कसल्या चिंतेत राहिलो तर नंतर त्यातून अनेक मनोशारीरिक आजार उद्भवतात.

३) बर्‍याचदा सतत चिंता करत रहाण्याच्या स्वभावानं आपण आपल्या जगण्यातला आनंदही गमावून बसतो आपल्या मनात सतत 'असं होईल का?' 'तसं होईल का?' 'असं झालं तर काय..?' 'तसं झालं तर काय?'' असे विचार येत राहतात. मनातल्या मनात आपण अनेक 'कल्पना' करत राहतो. पण त्यातल्या एकाही कल्पनेचं आजतागायत वास्तवात रूपांतर झालेलं नसतं. पण त्या कल्पना मात्र सतत आपल्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात. आणि आपण जगण्यापेक्षा जर-तर म्हणत फक्त घाबरत राहतो.

भीतीतून बाहेर पडायचं कसं?

१) ज्या गोष्टीची भीती मला वाटते आहे त्यात खरंच काही घाबरण्यासारखं आहे का याचा विचार करा. का घाबरतेय मी आता? कशाची भीती वाटतेय मला? हे प्रश्न स्वत:ला शांतपणे विचारा. या प्रश्नाचा विचार केला तर आपण बर्‍याच गोष्टींना विनाकारणच घाबरतो, असं तुमच्या लक्षात येईल.

२) 'राईचा पर्वत बनवणं' ही तुमच्या विचाराची पद्धत आहे का याचा विचार करा. असे विचार नेहमीच भीती निर्माण करणारे आणि भीतीला खतपाणी घालणारे असतात.

३) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या या भीती वाटण्याच्या भावनेविषयी बोला किंवा डायरीत तुमचे विचार लिहून काढा. मनातले विचार-भावना व्यक्त केल्यानं त्यांच आकलन व्हायला मदत होते. आपली विचार करण्याची पद्धत त्यातून समजते व त्याची भीतीचे विचार हाताळायला मदत होते.

भीतीचं भूत मानेवर बसलंच तर? रिलॅक्स! परीक्षा चालू असताना किंवा महत्त्वाची एखादी गोष्ट करताना मध्येच भीती वाटू लागली किंवा एकाएकी भीतीच्या भुतानं धरलंच तर? काही गोष्ट चटकन करून पाहा. भीती पळू शकेल.
१) दीर्घ श्‍वसन करा. शरीर रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा.
२) 'विनाकारण' भीती निर्माण करणार्‍या विचारांना महत्त्व देऊ नका.
३) त्यापेक्षा आपल्याला धीर देतील असे विचार करा.
४) स्वत:वरचा विश्‍वास उडून देऊ नका.
५) भीती माझ्या विचारांनी तयार होतेय, माझ्याचमुळे तयार होते ही जाणीव मनाला करून द्या.
६) भीतीची भीती कमी करा. बर्‍याच जणांच्या मनात मला भीती वाटेल याचीच भीती निर्माण झालेली असते.
७) जास्तीत जास्त काय होईल? जे होईल ते होईल. असा विचार करून प्रसंगाला सामोरं जा. तसं केलं तर जमतं असं तुमच्या लक्षात येईल.
८) आपल्याला वाटणार्‍या भीतीचं सर्मथन करू नका!
९) भीती निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वत:च्या क्षमतांविषयी मनात असणारी साशंकता. ती साशंकता कमी करणे, आत्मविश्‍वास वाढवणे, स्वत:वर विश्‍वास ठेवणं हा महत्त्वाचा उपाय.
१०) जगण्यात कोणतीही गोष्टी शाश्‍वत नसते. त्यामुळे बदलांचा स्वीकार करा.
११) मनात उमेद निर्माण करतील, स्वत:वरचा विश्‍वास कायम ठेवतील अशी वाक्यं तयार करा. भीतीच्या प्रसंगात या वाक्याचा वापर करा.
स्वत:ला नेहमी सांगत रहा की, 'I CAN DO IT' 'YES, I CAN DO IT.'

No comments: