Wednesday, August 12, 2020

पूर्वजांचा पोकळ बडेजाव माजवणे अंधभक्तीचे लक्षण आहे

What's app विद्यापीठात अज्ञानमूलक फॉरवर्डेड पोस्टची वानवा नाही.आज अशीच एक वरकरणी छान वाटणारी पोस्ट (पण प्रत्यक्षात बिनडोक, विद्वेष- विखार ठासून भरलेली) पाहण्यात आली. मी वेळ असल्याने त्याचा प्रतिवाद खालीलप्रमाणे केला. आपण यात भर सुचवू शकता किंवा मुद्देसूद प्रतिवाद केल्यास स्वागत आहे. मूळ पोस्ट लांबलचक असल्याने ‌फक्त सुरुवात आणि मनोरंजक भाग तेवढाच येथे दिला आहे.
मूळ पोस्ट: 
Do you know?
हे केमिकल कंपोजीशन👈 मुलांना रेग्युलर द्या.
गूळ+खोबरे = बुद्धीवर्धक (म्हणून बाप्पाचा नैवेद्य)
गूळ+शेंगदाणे = शक्तिवर्धक (म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)
तिळ+गूळ = केल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न + झिंक + सेलेनियम (हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,
यातले सेलेनियम - केन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत )
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जातात,
कारण हे जर शिकवले तर bornvita कोण पिल?
आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत न्हवते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? अहो एक आपला मावळा 50 शत्रूंशी एकटा लढायचा,
कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?
शिवाय आपले पूर्वीचे पंडित एवढे हुशार होते, एक से एक होऊन गेले महान पंडित, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते का?
मुळात आपल्याला इतिहासच अश्या पद्धतीने शिकवला जातो की इंग्रज आले म्हणून आपण तारले गेलो, आपण खूप गरीब होतो, अंधश्रद्धा होती वगैरे, पण इंग्रज तेव्हा आले जेव्हा त्यांनी भारतातील प्रत्येकाच्या घरात सोने भरलेले पाहिले, जे आपण व्यापार करून कमवत होतो,
 जर भारत श्रीमंत नसता तर ही आक्रमणे झालीच नसती ना.. गरिबांच्या देशावर कशाला कोण वर्षानुवर्षे राज्य करेल... सोने भरभरून जहाजे गेली ब्रिटिशांकडे, जेव्हा आपल्याकडे हे सर्व होते तेव्हा ब्रिटन मध्ये भूकमारी होती... हे कधीच आपल्याला सांगितले जात नाही, हे जर सांगितले तर जातीवाद आपोआप संपेल ना...मग तोडा आणि राज्य करा हे होऊच शकणार नाही... 
तर, आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, अहो वयाच्या 18-19 वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी... कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा....
आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर...
आपण हजारो वर्षांपासूनच सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो. आपल्याला या सर्वांची गरज नाही...
देशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा, आपले पूर्वज आपल्यापेक्षा खूपच हुशार आणि ऍडव्हान्स होते...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️◾
प्रतिवाद... (^m^)(^j^)(मनोगते)
या लेखात सत्य आणि असत्य यांची सरमिसळ बेमालूम केल्याने काही वैचारिक गोंधळ आढळतात. 
गूळ -खोबरे -शेंगदाणे यांचे औषधी गुणधर्म वादातीत असले तरी त्याचा संबंध ब्रिटिश राजवटीची यथाशक्य निर्भत्सना करून भारतीय संस्कृतीची अवाजवी भलावण करण्याशी जोडलाय, तो बादरायण संबंध आहे.
भारतीय संस्कृतीची थोरवी निश्चित आहे. 
एकदा अमेरिकन राजदूत ताजमहाल पाहायला आले जेव्हा त्यांना गाईडने माहिती दिली की ताजमहाल सतराव्या शतकात बांधला गेला, तेव्हा ते थक्क झाले कारण ते म्हणाले की आमचे अमेरिकन पूर्वज तेव्हा लाकडी ओंडक्याच्या घरात राहत होते. आज अमेरिका कुठे आहे पहा! आजच्या पुन्हा नव्याने लिहिल्या जाणाऱ्या इतिहासानुसार ताजमहाल हा मुघल बादशहा शहाजहानने बांधला पण मुघल हे परकीय आक्रमक होते त्यामुळे आपण 'भारतीयांनी बांधला आहे' असं श्रेय घेऊ शकणार नाही कदाचित! असो. येत्या 15 ऑगस्टला खाल्ली जाणारी जिलबी हीदेखील इराणमधून आलीयं बर का! आज उपवासात म्हणून वापरत असलेले साबुदाणा, बटाटा आणि मिरचीही हे पदार्थ तर पोर्तुगीज आहेत.
          
रामायण महाभारतात विमाने आणि क्षेपणास्त्रे यांचे उल्लेख आढळतात. तर मग पुढे बाराव्या शतकात  दिवाळीचे साधे रॉकेट तरी तयार का होत नाही? याचं साधं कारण म्हणजे त्या निव्वळ कवी कल्पना होत्या.
साधं आहे की आधी चाकाचा शोध... मग विमानाचा शोध... आधी बिनतारी यंत्रणा, मग मोबाईल....विमानाचा शोध लागायला किती अत्याधुनिक यंत्रणा लागत असणार....   एकदम शून्यातून विमान अस्तित्वात येऊ शकणार नाही. त्याच्या आधी कितीतरी आवश्यक शोध मालिका अस्तित्वात असावी लागते.
*गणितातील शून्याचा शोध असेल, रसायनशास्त्रातील विलेपन प्रक्रिया असेल आयुर्वेदाची संपूर्ण परंपरा ,धातुकाम स्थापत्यशास्त्र, जहाजबांधणी,  कापड निर्मिती, खाद्यसंस्कृती अशा विविध क्षेत्रात आपले पूर्वज अग्रेसर होते, परंतु त्याचबरोबर मध्ययुगात या तेव्हाच्या प्रगत ज्ञानाचा लोप झाला, जातीव्यवस्था- अस्पृश्यता, चाकोरीबद्ध- साचेबद्ध विचारसरणी, नवीन ज्ञानाचा परिपोष न होणे परंपरा-रूढी यांना अवास्तव महत्त्व, भाऊबंदकी, स्त्रियांना दुय्यम लेखणे वगैरे अनिष्ट प्रथा रुजल्या. भारतीय संस्कृतीतील ज्ञानपिपासा मागे पडली.*

आयुर्वेद विशिष्ट मर्यादेत यशस्वी असला तरी भारत स्वतंत्र होतानाही पुरुषांचे सरासरी आयुष्य फक्त सत्तेचाळीस वर्षे होते, जे आता सुमारे 70 आहे. शिवाजी महाराज गुडघेदुखीने पन्नाशीत गेले, लोकमान्य टिळक मधुमेहाने सत्तरीच्या आतच गेले... अशी अनेक उदाहरणे सांगता येतील... प्लेग वगैरे रोगांच्या साथीत तेव्हा लोकसंख्या कमी असतानाही आजच्या कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होत होते. बालमृत्यू, बाळंतपणातील स्त्रियांचे मृत्यू याचे प्रमाण प्रचंड होते जे आधुनिक विज्ञानाने कमी केले आहे. भारतीयांना ग्रहतारे माहित होते परंतु ग्रहण आणि धूमकेतू विषयी अंधश्रद्धा तेव्हा होत्या, आजही आहेत. शिक्षण व्यवस्था तर फारच बुरसटलेली होती. बारा बलुतेदार किंवा व्यावसायिक शिक्षण या नावाखाली उरलेले शिक्षण हे प्रामुख्याने धार्मिक अंगाने होते आणि ती तथाकथित उच्चवर्णीयांची मिरासदारी होती.

ब्रिटिशांनी लूट केली हे सत्यच आहे. भारतावर उपकार करण्यासाठी ते आलेच नव्हते तरीही सुरुवात काळात येथील अनेक स्थानिक संस्थानिकांना (तेव्हा भारत असा देशच नव्हता हे आपल्याला माहिती आहे - शेकडो छोटी छोटी संस्थाने होती, त्यांच्यात  सतत लढाया होत असत) ब्रिटिश म्हणजे परमेश्वराने पाठवलेले प्रेषित आहेत, असे वाटायचे आणि त्याबद्दल त्यांची कृतज्ञ भावना होती.

ब्रिटिशांनी (लॉर्ड मेकॉले) भले त्यांना कारकून हवेत म्हणून शिक्षण व्यवस्था सुरू केली परंतु त्यामुळे राजा राम मोहन रॉय, दादासाहेब नवरोजी, महात्मा फुले (अगदी गांधीजीही )यांना नवे पाश्चात्य विचार-फ्रेंच राज्यक्रांती (त्यातील समता,बंधुता, स्वातंत्र्य) ही विश्व मानवतेची तत्त्वे समजली. लोकशाही मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला चालना मिळाली.

जहाज बांधणी माहीत असली तरी परदेश गमनाला बंदी होती. समुद्र संचार केल्याबद्दल टिळकांना प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. टिळकांना तर ब्रिटिशांकडे चहा बिस्किटे खाल्ली म्हणूनही प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. इतिहासात हे पंचहौद प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे.

अगदी आजही आपले (अगदी सर्वसामान्य माणसाचेही) भौतिक जीवन सुखकर करणारे मोटर-मोबाईल-इलेक्ट्रीक दिवा-संगणक वगैरे बहुतांश शोध पाश्चात्यांनी लावले आहेत. इंग्रजी राजवट नसलेल्या जपान-चीन यांनीही चांगली प्रगती केली. त्यामुळे ब्रिटिशांचे आभार मानायचे नसले तरी आपल्या कपाळकरंटेपणाचा दोष त्यांना देता कामा नये. आपल्या इतिहासाचा अभिमान हवाच; पण आपण अंधभक्तही असता कामा नये. इतिहासाची कठोर चिकित्सा झाली तरच भविष्यकाल उज्ज्वल राहील. अभिमान हवा पण अभिनिवेश नको.

Monday, August 10, 2020

विरोधातूनच विकास होतो

विरोधातूनच विकास होतो - जेट जगदीश.

जेव्हा प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजात काही करायचं असतं तेव्हा समाजाकडून विरोध हा होतोच, आणि अंधभक्त प्रवाहपतीत मेंढरांच्या भावना दुखावल्या जातातच. त्यामुळे समाज माध्यमातून नकारात्मक टीका-टिप्पणी होणे... राग व्यक्त होणे स्वाभाविक असते. पण भावना दुखावल्याशिवाय केव्हाही समाज वा धर्म सुधारणा होऊ शकत नाहीत, हेही तितकेच खरे. 

काहीतरी वेगळं करू पाहणारी माणसं ही नेहमी मुठभरच असतात. ते आपल्या विचारांशी प्रामाणिक असल्यामुळे इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. म्हणून ते अंधभक्तांच्या भावना दुखावल्याच्या कांगावखोरपणाला भीक न घालता ठामपणे आपला विचार मांडत रहातात. परिणामी जी परिघावरील विचारी माणसे असतात ती नक्कीच विचार समजून घेत बदलत असतात, तर विचारांना घाबरून पाळणारे... परंपरेच्या अस्मितेला कुरवळणारे जे अंधभक्त असतात ते भावना दुखावल्याची कोल्हेकुई सुरू करतात. तेव्हा ज्यांना समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे त्यांनी ह्या न बदलण्याचा वसा घेतलेल्या सांभावितांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करून जे बदलण्याच्या प्रक्रियेत आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून सक्षमपणे विवेकी विचारांची बीजे पेरत राहिले पाहिजे. चुकीच्या प्रथा-परंपरांवर बोलून त्या बंद होण्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेत त्यांना आणले पाहिजे. 

वैचारिक बीजे पेरतांना दहातील एक माणूस जरी बदलला तरी समाजात मोठी सुधारणा होत असते, हे लक्षात ठेवले म्हणजे हे काम पिढ्यांच्या परिमाणातच मोजता येते याचे भान येते. त्यामुळे स्थितीशील अंधभक्तांच्या विरोधाला सामोरे जायचे बळ प्राप्त होते. म्हणून  कोणत्याही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी आजची सामाजिक बजबजपुरी पाहून निराश न होता खंबीरपणे काम करत राहणे आवश्यक आहे. कारण विरोधातूनच विकास होतो हे गेल्या 150 वर्षातील सुधारकांनी दाखवून दिल्याचा इतिहास आहे.

Sunday, August 9, 2020

राम मंदिराची श्रध्देपेक्षा राजकीय गरज आहे

1 लोकांच्या श्रद्धेची भूक भागवण्यासाठी देशात मंदिरांची, बुवा - बाबांची वानवा होती काय? 
     
2 लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा वैयक्तिक पातळीवरचा आहे सार्वजनिक नाही. 
   
3 लोकांच्या धार्मिक श्रध्दास्थानांची निर्मिती करणे हे राज्य संस्थेचे काम नाही. संविधानामध्ये प्रार्थनास्थळांच्या रक्षणाची, नियमनाची जबाबदारी राज्य संस्थेकडे आहे निर्मितीची नाही. 
   
4. मंदिरं जशी काही प्रमाणात सेवा कार्य करतात तशीच काळा पैसाही रिचवतात. देणगी कोणाकडून आली हे सांगण्याचं बंधन नसतं. देणगी देणारालाही पैसा कुठून आला कसा आला हे कोणी विचारत नसतात. 
   
5 मंदिरे त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग सेवा कार्यासाठी जरी खर्च करत असले तरी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हा सजावट, सोने, रत्ने यात अनुत्पादक भांडवल म्हणून पडून राहतो. उदा पद्मनाभन मंदिर, शिर्डी. 
    
6 मंदिरे श्रद्धास्थाने आणि हॉस्पिटल्स यांचं प्रमाण जर समतोल असेल तर एकवेळ मान्य करता येईल की आस्तिकांच्या श्रद्धेसाठी काहीतरी असावं, पण मुळातच हे प्रमाण आपल्या देशात खूप व्यस्त आहे. शिवाय काळ कोणता आहे, आपली गरज काय आहे, आपला प्राधान्यक्रम काय असावा याचा सारासार विवेकी विचार करावा लागतो. म्हणून मंदिर नको हॉस्पिटल हवं. *पण मुख्य मुद्दा आणि स्पष्ट मुद्दा असा की, अयोध्येचे राम मंदिर हे काही भारतातील श्रद्धावान लोकांची गरज नव्हती. मंदिर नव्हतं (आणि अजूनही निर्माण झालेलं नाही) म्हणून भारतातील श्रद्धावान लोकांच्या भक्तीभावात भक्तीच्या आनंदात काही कसर राहिली नव्हती किंवा त्यांची श्रद्धा पातळ झालेली नव्हती. रामाचं मंदिर नव्हतं म्हणून लोकांनी राम राम म्हणायचं सोडलेलं नव्हतं की, रामायणाची पारायणे बंद केलेली नव्हती. 

7 रामाचे मंदिर ही भारतातील श्रद्धावान लोकांची कमी आणि आरएसएस प्रणित मोदी सरकारची जास्त गरज आहे. तो त्यांच्या धार्मिक राजकारणाचा भाग आहे हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. लोकांच्या भक्तीच्या पडद्याआड लपून चाललेलं हे राजकारण आहे हे संघालाही ठाऊक आहे, आणि विरोधकांनाही ठाऊक आहे. उगीच ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?
   
8 अशा धार्मिक राजकारणामुळे भारताची भौतिक प्रगती जरी झाली तरी भारत मध्यपूर्वेतील सौदी अरब सारखा भौतिक दृष्ट्या चकचकीत देश होईल(तशी शक्यता कमी) मात्र मुल्यांच्या पातळीवर मधूयुगीन मागास समाज म्हणूनच ओळखला जाईल.

Monday, August 3, 2020

तेजोमय तेजोवलाय(ऑरा): एक भंपक अंधश्रद्धा

 तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे औक्षण - ओवाळणे

Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ”
पण – ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे - एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे , I don’t believe this ” 

अहो , न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं. देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते! सत् - चित्आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही! 
परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “ अनादीअनंत ” 
“ माझा देवावर विश्वास नाही  ” हे आताशा चालतं. पण " माझा उर्जेवर विश्वास नाही " असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा.हकालपट्टीच होईल खास ! असो.
मनुष्य हा एक अनंत उर्जेच्या  कणांनी बनलेला उर्जेचा गोळामात्र आहे. त्याचे अस्तित्वही उर्जा आणि त्याच्या भोवतालीही एक उर्जाच विद्यमान आहे.ज्या उर्जेला नाव आहे “ऑरा” हा ऑरा जर संतुलीत असेल , तर आपले अस्तित्व संतुलीत! हे कसे जमेल? यावर विचार करत असताना (कदाचित्) आपल्या पूर्वजांना अनंत मार्ग सापडले – जसे स्तोत्र-मंत्र पठण, रुद्राक्ष व मंत्र धारण, अलंकार धारण, औषधी वनस्पती धारण, गंध व भस्म लेपन इ.इ.इ.
त्यातीलच एक महत्वाचा ’ऑरारक्षक ’ उपाय म्हणजे ’ओवाळणे’ अर्थात् ’औक्षण करणे’

कुणाचा वाढदिवस असेल, कुणी परीक्षेला चाललं असेल, कुणी महत्वाच्या कामावर चाललं असेल, कुणी काही विशेष पराक्रम करून परतलं असेल तर ’ओवाळणे’ हा एक अगदी हमखास करावयाचा वैज्ञानिक विधी होता. आताही आहे, पण त्याचे अस्तित्व आता अंध:श्रद्धेपुरते राहीले आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की जीवजंतू-बाधा-अरिष्ट यांपासून मानवाचे संरक्षण करणे हे औक्षण विधीचे काम आहे.

प्रतिकारक क्षमता अल्प असलेली लहान मुलं,सतत कामानिमित्त बाहेर असणारी घरातली कर्तीमंडळी यांना  So called Exposure पुष्कळ आहे. परीणामी त्यांच्या भोवतालचे उर्जावलय क्षीण होते.त्यामुळेच महाप्रचंड उर्जेचे लघु-रूप असलेल्या निरांजनाने – अक्षता-सुवर्ण-सुपारी इ.उर्जावस्तू वापरून अत्यंत सकारात्मकतेने आणि विशेष प्रेमादराने ज्यांचे हृदय ओथंबून आले आहे अशाच व्यक्तीने जर त्यांना ओवाळले तर आभावलय पुन्हा मजबूत होते आणि शरीरातील उर्जाकेंद्रे आणि सप्तचक्रे पुन्हा Activate होतात आणि व्यक्ती बरी होते, दुरूस्त होते आणि बाधामुक्त होते.
वारंवार आजारी पडणार्‍या आणि प्रतिकारशक्ती कमी असणार्‍या मुलांना अथवा मोठ्यांनासुद्धा या उपायाने आराम पडताना दिसतो. जरूर अनुभव घ्यावा.

श्रावणातलं पावसाळी वातावरण, आभाळी हवा आणि जीवजंतू व रोगराई यांचे वाढलेले प्रमाण, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी-शुक्रवारी मुलांना ओवाळणे तसेच काही ना काही निमित्ताने पुन्हा-पुन्हा ओवाळणे हे विशेष संयुक्तीक आहे.
आयुष्यवान – आयुष्यमान – आयुष्यवंत अशा शब्दातून कदाचित्  औक्षण आणि औक्षवंत असे शब्द तयार झाले असावेत.
त्यामुळे घरातल्या सर्वांचे जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर अगदी डोळसपणे काही प्रथा आपण पाळाव्यातच ! असे माझे स्वच्छ मत आहे. त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजेपर्यंत कदाचित् उशीर होतो. म्हणून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर ’औक्षण’ या विषयी लिहावेसे वाटले.

जिज्ञासू  आणि आक्षेप कर्त्यांचे स्वागत! पण ‘ Electro-somatographic scaning ’ या Test मधून प्राप्त निष्कर्षांचा अभ्यास असेल तर !!!

बाकीच्यांनी आवर्जून ओवाळून घ्या! ओवाळा! मोठं उर्जादायी काम आहे ते! उर्जा अमूल्य आहे  आणि हो ओवाळणीही घाला मोबदल्यात! धन्यवाद !

डॉ. सुनील थिगळे, ऑरा तज्ञ 
सार्थक होलिस्टीक हेल्थकेअर सेन्टर
५,तारांगण सोसायटी पौडरोड
पुणे 411038
मो. 9595553007

सदर लेख लिहिणारी व्यक्ती कदाचित एकतर काल्पनिक ईश्र्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मुर्खतेचा कळस करतेय कींवा अवैज्ञानिक विचारधारा न्युटनच्या नावाखाली खपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय. ती व्यक्ती असा लेख लिहुन स्वत: अतिविद्वान आहे असे दर्शवून, बाकीचे बावळट किवा मुर्ख आहेत असेच समजतेय. यात लेखकाने दोन मुद्दे लिहिलेत. पहिल्या मुद्द्यात त्याने उर्जेलाच काल्पनिक ईश्र्वराचे स्वरुप म्हटले व दुसऱ्या मुद्द्यात त्याने औक्षण हे वैज्ञानिक पातळीवर तर्कसंगत ठरवण्याचा फोल प्रयत्न केलाय. आणि या दोन्ही विज्ञान साठी त्यांनी छद्म विज्ञानाचा आधार घेतला आहे. आपण या दोन्ही मुद्द्यांवर जरा समिक्षा करुया...

पहिला मुद्दा, काल्पनिक ईश्वराची उर्जेशी तुलना करुन, त्याला ऊर्जे समान मानणे. स्वतःला तज्ञ म्हणवणार्‍या या महाविद्वान महाशयाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे *उर्जा निर्माण करता येत नाही किवा नाशही पावत नाही, तर ती एका रुपातून दुसऱ्या रुपात परीवर्तीत करता येते, हा सिद्धांत सर्वप्रथम न्युटनने नव्हे तर Emilie du Chatelet (1706 - 1749) याने प्रयोगानीशी मांडला व सिद्ध केला.* त्याच्या आधी काही तत्ववेत्त्यांनी त्यावर संशोधनाचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अगदी इ.स. पुर्व पाचव्या शतकापासुन म्हणजेच बुद्धांच्या काळापासून सुरु होता. पण त्यास ठोस स्वरुप दिले ते Albert Einstein ने १९०७ ला. उर्जा एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरुपात परावर्तीत होताना, काही अंशी वाया जाते, हे त्याला आकाळले म्हणून आलबर्ट आईन्स्टाईनने सखोल अध्ययन करुन व सिद्धांत मांडून या संशोधनाला पुर्णविराम दिला. त्याने त्यासाठी एक सुत्र दिले, जे जगभरात विज्ञानात शिकवले जाते, E = mc^2.

आता आपण काल्पनिक ईश्र्वराची या ऊर्जेशी केलेली तुलना बघू. खरंच हास्यास्पद आहे, ही तुलना किवा समानता. गेली ५००० वर्षे, या देशात ब्राम्हणांनी सनातन वैदिक परंपरा निर्माण केली होती. या परंपरेनुसार गेल्या ५००० वर्षांत या देशात, याच वैदिक परंपरेच्या नावाखाली अब्जावधी ब्राम्हणेतर स्त्रियांना सतीच्या प्रथेखाली जिवंत जाळण्यात आले, पण एकाही स्त्रिचे रक्षण एकाही काल्पनिक देवाने केले नाही. तसेच गेल्या ५००० वर्षांत कोट्यावधी ब्राम्हण स्त्रियांचे पती निधनानंतर केशवपन केले गेले, एकाही स्त्रिला या विद्रुपतेपासून वाचवायला, एकही काल्पनिक देव पुढे आला नाही. या पुढची गोष्ट म्हणजे, गेली ५००० वर्षे याच सनातन धर्माने जाती व्यवस्था निर्माण करून ब्राम्हणेतरांचा शिक्षणाचा अधिकार व मनाप्रमाणे व्यवसाय आणि नोकरीचा अधिकार काढून घेतला. तसेच ब्राम्हणेतरांना संपत्ती संचयनाचा अधिकारही नाकारला. तसेच जो ज्या जातीत जन्माला, त्याने त्याच जातीप्रमाणे कार्य करायचे, अन्य कोणतेही उद्योग करायचे नाहीत, असे धर्मशास्त्रात लिहून कट्टर जातीव्यवस्था लादली. हे नष्ट करुन अधिकार द्यायला एकही काल्पनिक देव का पुढे आला नाही. 

प्रबोधनकारांनी 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकात लिहील्या प्रमाणे काही जातींवर आद्य शंकराचार्याने सातव्या शतकात अस्पृश्यता लादली, जे आजचे SC, ST, NT, DT, VJ आहेत, परंतु एकही काल्पनिक देव ही चुकीची व्यवस्था नष्ट करण्यासाठी ना पुढे आला, ना अवतरला. अगदी राजे शिवछत्रपतींसारख्या महान राजाची विषप्रयोगाने होणारी हत्याही, काल्पनिक देव वाचवू शकला नाही. या देशात इंग्रजांचे राज्य आले व  इ.स. १८२७ ला लाॅर्ड विलीयम बेंटीकने सतिप्रथेस कायद्याने बंदी घातली. न्हाव्यांचा संप घडवून केशवपन प्रथेस ज्योतिबांनी विरोध केला. तर बाबासाहेबांनी समाज सुधारणेचा कळस गाठला. त्यांनी ५००० वर्षांची सनातन जाती व्यवस्थाच मोडकळीस आणली व ब्राम्हणेतरांना शिक्षणाचे अधिकार, मनाप्रमाणे नोकरी व व्यवसायाचे अधिकार, तसेच संपत्ती संचयनाचे अधिकार दिले. स्त्रियांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय, माहेर व सासरच्या संपत्तीत हिस्सेदारी, घटस्फोटाचे व पुनर्विवाहाचे अधिकार दिले. 

दुर्दैव हेच की एकही काल्पनिक देव भारतीय समाजाला या जातीव्यवस्थेच्या दलदलीतून बाहेर काढू शकला नाही तसेच वरील अधिकार देण्यासाठी अवतरला नाही. या देशात दुर्दैवाने कृतघ्न लोकांची संख्या जास्त असल्यामुळे बाबासाहेबांच्या उपकाराची जाण त्यांना नाही, उलटपक्षी द्वेशच आहे. असो. हा ज्यांच्या त्यांच्या कुसंस्कारांचाच व अल्पबुद्धीचा भाग आहे. जवळजवळ सगळ्याच वैज्ञानिकांनी ईश्र्वराचे अस्तित्व नाकारले. कुणीही काल्पनिक ईश्वराला ऊर्जेचे प्रतिस्वरूप म्हणुन मांडण्याचा मुर्खपणाचा प्रयत्न केला नाही.

दुसरा अवैज्ञानिक मुद्दा, औक्षणाने सारे सभोवतालचे जिवजंतू मरतात. हे जर सत्य असेल तर ज्यांना हा आत्मघातकी सिद्धांत पटतो, त्यांनी आजच्या Corona च्या काळात मास्क न लावताच, घरातून स्वत:चे औक्षण करवून घेऊन थेट कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही अन्य सुरक्षा न घेता रुग्णांची सेवा करावी. त्यांनी  मास्क वापरू नये, सॅनिटायझर वापरू नये, कोरोनाचा PPT पोशाख घालू नये, केवळ स्वत:चे औक्षण करवून घेऊन थेट रुग्णसेवा करावी आणि स्वत:च्या या मुर्ख सिद्धांताचा प्रत्यय घ्यावा. नंतरच आपला अनुभव येथे मांडावा. उगाच छद्म विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा पसरवू नये.

सारेच ईश्वरवादी अंधभक्त बोलतात की, देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हलत नाही. तर मग सध्याच्या कोरोनाला व त्यामुळे पसरलेल्या भयाला तसेच होणाऱ्या मृत्युंना तो काल्पनिक देवच जबाबदार असला पाहिजे- त्यांच्याच या सिद्धांतानुसार. राजे शिवछत्रपती व शंभुराजांची हत्या देखिल त्या काल्पनिक ईश्र्वराच्या मर्जीनेच झाली असली पाहिजे. 

वरील मुद्द्यांवर केवळ ज्यांची सद् विवेक बुद्धी जागृत आहे, तेच विचार करतील व त्यांनाच ते पटेल... निर्बुद्धांना नाही.